२६ नोव्हेंबर, २००८.
नेहमीप्रमाणे उजाडलेला दिवस. मुंबईत नेहमीचीच धावपळ, चहलपहल होती. सगळेच घाईत. थांबायला कुणाला वेळ नव्हता. सूर्य अस्ताला गेला, समुद्राचे पाणी लालरुपेरी झाले, रात्र गडद झाली, रुपेरी चषकांमधील द्रव चमचमू लागले, काचपात्रांची किणकिण वाढली. रात्रीची मुंबई जागी होत होती. दिवस मावळत होता. समुद्रमार्गे मुंबईत घुसलेल्या कसाब आणि त्याच्या साथीदारांनी घातलेल्या थैमानामुळे ही रात्र रक्तरंजीत होऊन गेली.
त्या रात्रीचे रंग नंतर उजाडलेल्या दिवसालाही रक्त फासून गेले. १६६ सर्वसामान्य आणि १८ बहाद्दर सुरक्षा कर्मचारी या दहशतवादी हल्ल्यात बळी गेले. सर्वसामान्य बेसावध, निशस्त्र आणि ज्यांनी मुंबईचे, मुंबईकरांचे रक्षण करायचे त्यांच्या हाती कुचकामी, जुनाट, ब्रिटिशांच्या जमान्यातील शस्त्रे, अंगावर कच-यात फेकावीत अशी जाकिटे. एक विषम संघर्ष. तरीही दहशतवाद्यांना मात दिली गेली. पण त्यासाठी प्राणांचे बलिदान द्यावे लागले आपल्या झुंजार पोलिसांना आणि इतर सुरक्षा कर्मचा-यांना.
या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी सहा वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी मुंबईकरांकडून या शहिदांचे स्मरण केले जाते, त्यांना आदरांजली वाहिली जाते, मेणबत्त्या पेटवून त्यांच्या साहसाला, बलिदानाला संपूर्ण मुंबई सल्यूट करते. मुंबईकरता प्राणांची कुर्बानी दिलेल्या या बहाद्दरांच्या कुटुंबीयांचे डोळे त्यांच्या आठवणीने डबडबून येतात. दरवर्षी हेच घडते आणि दरवर्षी मुंबईच्या सुरक्षेचीही चर्चा याच दिवशी होते. मुंबई किती असुरक्षित आहे, कुणीही कुठून कसा शिरकाव करू शकतो, घातपात घडवू शकतो, रक्तपात घडवून मुंबईला वेठीस धरू शकतो हे कसाब आणि त्याच्या साथीदारांनी दाखवून दिलेच आणि नंतर झालेल्या बॉम्बस्फोटांनीही दाखवले आहे. आणि तरीही मुंबईच्या सुरक्षेसाठी काहीही घडत नाही, कुठलेही उपाय योजले गेलेले नाहीत, जे अर्धेमुर्धे अमलात आणले गेले तेही कण्हतकुंथत बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कुठल्याही यंत्रणेला त्यात रस नाही, अत्यंत बेफिकिरीने तेच ते उगाळणे मागील पानावरून पुढे चालू आहे, हेच दरवर्षी २६/११ च्या निमित्ताने प्रसिद्ध होणा-या बातम्यांमुळे समोर येणारे विदारक, अस्वस्थ करणारे, मुंबईकरांचे मन खंतावणारे चित्र आहे.
बुधवारी याच अनास्थेला, भगदाडे पडलेल्या मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेला, पोलिसांना न मिळणा-या सोयीसुविधांना अनेक वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी पुन्हा एकदा वाचा फोडली. या सहा वर्षात काय घडले, मुंबईच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था अमलात आली, किती आधुनिक शस्त्रास्त्रे मुंबई पोलिसांच्या ताब्यात आली, किती सीसीटीव्ही कॅमेरे लागले, लागले त्यापैकी किती आज सुरू आहेत, मुंबईच्या किना-यांलगत समुद्रात किती बोटी गस्त घालत आहेत, सागरी पोलीस दल किती सतर्क आहे या सगळ्याची उत्तरं शोधायला गेलात तर एक भलंमोठं शून्य हाती येईल.
त्या दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती आणि आपल्या फौजदारांकडे, हवालदारांकडे आजही दंडुकेच आहेत. या दंडुक्यांच्या जोरावर त्यांनी जमावाला थोपवायचं, टवाळखोरांना हटकायचं, बेदरकार वाहने हाकणा-या चालकांना अडवायचं. कोण जुमानतं त्यांना. मग जमाव त्यांना पळवून लावतो, प्रसंगी जिवे मारतो, कुणी त्यांना मारहाण करतो, कुणी त्यांच्या अंगावर गाडी घालतो. शस्त्रास्त्र समिती तात्काळ नेमा असे सांगताना परवाच्या मंगळवारी कोर्टाने याच अनास्थेचे, वरिष्ठांच्या बेफिकिरीचे वाभाडे काढले. निकृष्ट दर्जाच्या शस्त्रांमुळे, दर्जाहीन संरक्षक जाकिटांमुळेच या हल्ल्यात पोलिसांचे हकनाक बळी गेले अशी अब्रू काढली. तरीही शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणाची समिती नेमायला दहा महिने लागतील असे बिनदिक्कत याच कोर्टात सांगितले गेले. किरकोळ अपवाद वगळता मुंबई पोलिसांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे आलेलीच नाहीत. जुन्या, निकामी रायफली घेऊन लढा आणि मरा, आम्हाला काय त्याचे, याच बेफिकिरीने कोर्टात हे उत्तर दिले गेले हे उघड आहे. महागाई वाढलीय, पण या पोलिसांना आजही आठच रुपये प्रोत्साहन भत्ता मिळतो. आज आठ रुपयांत कटिंग चहा येत नाही की वडापावही येत नाही. तरीही पोलिसांनी त्यात भागवावे आणि मुंबईच्या सुरक्षेसाठी धावावे, प्राण खर्ची घालावेत ही अपेक्षा मग अमानवी, क्रूरच म्हणावी लागेल. याच संवेदनाशून्य यंत्रणेच्या निगरगट्ट कारभारामुळे तत्कालीन उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचा प्रसंगावधानी मोटारचालक लतिफ तडवी, सदानंद दाते यांच्याबरोबर कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांशी सामना करणारे पोलीस निरीक्षक विजय पोवार, विजय शिंदे, हवालदार मोहन शिंदे व कॉन्स्टेबल सचिन टिळेकर यांना त्यांच्या साहसाचे उचित श्रेय, गौरव नाकारला जात आहे.
कुठे काही घातपात घडला, मुंबईच्या सुरक्षेकडे लक्ष वेधले गेले की आपल्या सुरक्षा व्यवस्थेची तुटपुंजी डागडुजी केली जाते. वेळ भागवून नेली जाते. पण, मुंबई पोलिसांकडे पुरेशी बुलेटप्रुफ जाकिटे नाहीत, स्फोटकशोध प्रवीण श्वान पुरेसे नाहीत, सागरी सुरक्षेसाठी आणलेल्या नौका गंजत पडल्या आहेत, सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रस्ताव फायलींतून आणि मंत्रालयातून पुढे सरकलेला नाही, रेल्वे स्थानकांवर उभारलेली धातुशोधक यंत्रणा-चौकटी ‘मौनात’ आहेत. सीएसटी स्थानकात कुणीही कुठून शिरू शकते ही अवस्था लपवता येणे अशक्य आहे.
पोलिसांचे असे तर सागरी सुरक्षेचे आणखीच हसे. प्रतीक ठाकूर या पत्रकाराने मुंबईच्या सागरी किना-यावरील निद्रीस्त सुरक्षा व्यवस्थेची चांगलीच टोपी उडवली. वसईपासून पालघपर्यंत अनेक किना-यांवर हॉटेल, लॉज आहेत. समुद्रातून आलेले कुणीही या लॉजमध्ये कुठल्याही ओळखपत्राविना जागा मिळवू शकतात. तुम्ही अगदी कसाब नाव लिहूनही कुणी तुम्हाला हटकत नाही, ओळखपत्र मागत नाही. तुम्ही विचारलेत तर लॉजवालाच सांगतो, पोलिसांना हप्ता देतो, काय प्रॉब्लेम नाही. त्याने हे स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड केले. जिथून कसाब आणि त्याचे साथीदार शिरले त्या कुलाबा परिसरात अनेक बोटी लाटांवर स्वार होऊन मुंबईकडे येत असतात. त्या समुद्रावर नजर ठेवण्याऐवजी बधावार पार्क येथील सागरी चौकीतील पोलीस समोरच्या रस्त्यांवर नजर ठेवून आहेत.
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणा-या शहिदांच्या स्मृतिस्तंभाची साफसफाई सुरू असल्याचा एक फोटो ‘प्रहार’ने छापला होता. या शहिदांच्या स्मारकावरील धूळ झटकायला २६/११चा दिवस यावा लागत असेल तर मुंबईची सुरक्षा कशी असणार याचे उत्तर, ‘२६/११ आणि मुंबईचा बकरा’ असेच असणार आहे.
मुंबईवरील हल्ला हा एक ईव्हेंट होता त्याची सांगता कसाबच्या तथाकथित लटकवण्याने झाली . झाले सरकारचे काम झाले ,आता राहिली जनतेची सुरक्षितता ती त्यांची त्याने बघून घ्यावी मंत्री,़आमदार,खासदार याना त्याचे काही देणेघेणे नाही झेड+ सुरक्षा घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र
२६/११ नंतर सरकारी बेफिकीरीवर प्रहार करणारा व परिस्थिती चे अचूक विश्लेषण करणारा लेख