‘काँग्रेस पक्षाला विचारांची, त्यागाची व बलिदानाची परंपरा आहे. याच विचारांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
सावंतवाडी – ‘काँग्रेस पक्षाला विचारांची, त्यागाची व बलिदानाची परंपरा आहे. याच विचारांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतरही देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत पंतप्रधानांनी देशाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला.
जागतिक मंदीचे संकट असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी त्याची झळ देशाला पोहोचू दिली नाही. भाजप मात्र मोदींच्या रूपाने व्यक्तिसापेक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकसभेचा साधा अनुभवही नसलेली व्यक्ती पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहे. विकासाच्या केवळ बढाया ते मारत आहेत. जे राज्यातील गरिबी दूर करू शकले नाहीत ते देश काय चालवणार’, अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली.
आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. निलेश राणे यांच्या प्रचारार्थ कोलगाव पाटीदार समाज हॉलमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भाजप व मोदींकडे त्यागाची भावना नाही. ते स्वार्थाचे राजकारण करीत आहेत. मोदींच्या गुजरातमध्ये गरिबी व बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. उलट आरोग्य सेवा, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र गुजरातपेक्षा अग्रेसर आहे. मात्र, असे असूनही महाराष्ट्रातील युतीचे नेते गुजरातच्या विकोसाच्या पोकळ गप्पा मारत आहेत.
युतीचे हे लोक किती धुतल्या तांदळासारखे आहेत हे मी जवळून पाहिले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांच्या नावाने ओळखल्या जाणा-या या मतदारसंघात सेनेने उभा केलेला उमेदवार लायकीचा आहे का, असा सवाल करतानाच विधानसभेत दोनदा पराभूत झालेला तर एकदा डिपॉझिट जप्त झालेला माणूस हॅटट्रिक साधण्यासाठी कोकणात आला आहे.
पराभवाची सवय असल्यानेच सेनेच्या अन्य दिग्गज नेत्यांनी येथील उमेदवारी नाकारलेली असताना विनायक राऊत पुढे आले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांना आपल्या शिक्षणाचा खुलासा करावा लागतो हे या मतदारसंघाचे दुर्दैव आहे. विकासाचे कोणतेही व्हिजन नसलेली ही माणसे केवळ निवडणूक आल्यावर उगवलेली आहेत. कोकणावरील संकटांच्या वेळी हे कधी दिसले नाहीत. सेना उमेदवाराची तर सध्या ‘दोन बायका फजिती ऐका’ अशी स्थिती असल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांना लोकसभेचा पाच वर्षाचा अनुभव आहे. मतदारसंघात त्यांनी स्वत:ची चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचीही त्यांची तयारी आहे. महाराष्ट्रात निवडून येण्याची सर्वाधिक जास्त क्षमता असलेला उमेदवार अशा शब्दांत खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीच त्यांचा गौरव केला आहे. त्यामुळे विकासाचे व्हिजन घेऊन चालणा-या डॉ. निलेश राणेंचा विजय निश्चित असून ते दीड ते दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करतानाच सावंतवाडी तालुक्यातून निलेश राणे यांना जिल्हय़ातील सर्वाधिक मताधिक्य असेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हय़ात विकासाची अनेक कामे झाली आहेत. या जिल्हय़ाचा शैक्षणिक दर्जा आज वाढला आहे. ई-ऑफिस प्रणाली जिल्हय़ाने सर्वप्रथम राबविली आहे. सी वर्ल्ड, विमानतळ, कासार्डे-दोडामार्ग एमआयडीसी यांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होत आहे. विकासाची ही प्रक्रिया सुरू असताना विरोधकांकडून मात्र केवळ द्वेषाचे राजकारणच सुरू आहे. येथील जनतेने सकारात्मक विचारातूनच मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी सदानंद काजरेकर यांनी या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावर डॉ. निलेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी मंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार प्रा. सुरेश नवले, आमदार सुभाष चव्हाण, तालुकाध्यक्ष बाळा गावडे, पक्षनिरीक्षक मधुसूदन बांदिवडेकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, जि. प. सभापती प्रकाश कवठणकर, जिल्हा सरचिटणीस संजू परब, चिटणीस मनोज नाईक, सभापती प्रियांका गावडे, विकास सावंत, संदीप कुडतरकर, दादा परब, महिला तालुकाध्यक्षा गीता परब आदी उपस्थित होते.
Bhagat Singh Sukhdev Rajguru he deshasathi shahid zale sarvjan sainik congressche nahvate. aaj hi deshasathi bordervar ladhnare sainik congress che nahit. Congress mule desh swatantra zala aase kadhi manhu naye. Karan he deshasathi shahid zale tyncha aapaman aahe. ……… Jai hind