चेन्नईमध्ये काही दिवसांपूर्वी २० महिलांनी त्यांच्या पतींच्या उपस्थितीत ‘या पुढे आम्ही मंगळसूत्र कधीच घालणार नाही,’ असे स्पष्ट करून ते कायमचे गळयातून काढून टाकले. या महिलांना ते ओझे, ताण याच्यापलीकडे महिलांच्या गुलामगिरीचे प्रतीक वाटत होते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. माणसाचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर सगळया गोष्टी ठरतात. मंगळसूत्रातून पतीदेव वजा करण्याचा हा प्रकार आहे. आतापर्यंत मंगळसूत्र म्हणजे सौभाग्यलेणे असा समज महिला आणि समाज करून घेत होता. आता या काळात मंगळसूत्र आणि नव-याचा अर्थाअर्थी संबंध उरलेला नाही आणि मंगळसूत्राचे रूपांतर एका स्वैच्छिक दागिन्यात झालेले आहे, हेच या घटनेवरून दिसते.
गळयात मंगळसूत्र घालण्याची भारतीय परंपरा कधी सुरू झाली ते कोणालाही खात्रीने सांगता येत नाही. रानटी, भटका समाज एकत्र नांदू लागला तरी महिलांवरील बलात्कार कमी झाले नाहीत. हे रोखण्यासाठी लग्नाचा मार्ग समाजाने स्वीकारला. त्यासाठी लग्न करताना गावभर गाजावाजा करण्यात येऊ लागला. ढोलताशे वाजवून लग्नाची दवंडी पिटवून देण्यात येऊ लागली.
लग्नाला सगळाच्या सगळा गाव येत असे. त्या माध्यमातून या महिलेचे लग्न आता झाले असून ती विवाहित आहे, असे समाज ठरवू लागला. अशा महिलेशी तिच्या पतीखेरीज अन्य कोणी लैंगिक संबंध ठेवत नसे.
तरीही तिच्यावर बलात्कार झालाच तर त्याला सगळा गाव मिळून शिक्षा सुनावत असे. मुलीचा विवाह झाला आहे, या दर्शवणा-या खाणाखुणा म्हणजे मंगळसूत्र, हातात बांगडया आणि कपाळावरील कुंकू. अशा महिलेच्या मार्गात राजा किंवा राज्यकर्ताही आडवा येत नसे; पण मुख्य म्हणजे बलात्कारापासूनही तिचे संरक्षण होऊ लागले. त्यामुळे महिलांना संरक्षण देण्याचे पहिले काम विवाहसंस्थेने केले. पुढे विवाहाच्या माध्यमातून महिलांचे शोषण सुरू झाले, ते वाढले आणि त्याने एक टोक गाठले.
एका महिलेने भागत नाही म्हणून पुढे दोन दोन बायका काही वेळा तर ठेवायची बाई वेगळी अशी पद्धत रूढ झाली. बाईचे शोषण वाढतच गेले. मधल्या काळात शोषित महिलांनी या विरोधात बंड गेले. या अन्यायकारक चालीरिती असून त्यांचा त्याग केला पाहिजे, हे ठरवून समजून उमजून त्याचा त्याग केला. पुरुषी समाजही त्यांना समजून घेऊ लागला. पण आज महिलांची लग्नाकडे बघण्याची वेगळी मानसिकता बनली आहे.
मंगळसूत्र म्हणजे सर्वस्व हे सूत्र आजच्या मुलींमध्ये आढळत नाही. आजच्या मुलींनी मंगळसूत्राला स्वैच्छिक दागिना बनवला आहे. असे करून त्यांनी पतीदेवाला मंगळसूत्रातून वजा केले आहे. आज मंगळसूत्र घातले नाही तर विवाहितेला कोणी नावे ठेवत नाही किंवा वापरलेच पाहिजे म्हणूनही जबरदस्ती करत नाही. विकसित देशांमध्ये असा काही प्रकार अस्तित्वात नाही. बोटातली अंगठी काही वेळा ग्राहय़ मानली जाते. पण तीही स्वैच्छिक आणि फॅशनेबल अशीच असते.
एक काळ असा होता की, दागिने आणि वस्त्रालंकार, सण उत्सव आणि शुभकार्यासाठी वापरले जात होते. मंगळसूत्र, बांगडया आणि कपाळावरील कुंकू महिलांसाठी बंधनकारक होते. पुरुषही विविध दागिने वापरत असत. पुढे पुरुष दागिन्यांचा वापर कमी करत गेले.
आज वातावरण वेगळे आहे. मी मंगळसूत्र वापरते, कंकू लावते, हिरवा चुडा भरते, तुझासाठी मी एवढे करते मग तू माझ्यासाठी काय करतो? असा रोखठोक सवाल आजची मुलगी विचारते. आज प्रश्न विचारत आहे. उद्या मंगळसूत्र, हिरवा चुडा आणि कंकू कालबाहय़ झाले आहे ते आम्ही का म्हणून वापरायचे, असाही प्रश्न करतील. आता सुरुवात फक्त मंगळसूत्र नाकारण्यापासून झाली आहे.
अमेरिकेत आणि युरोपमध्ये स्त्रीमुक्तीचा पहिला सामूहिक लढा उभारला गेला. त्या आधी आणि आजही भारतात वैयक्तिक पातळीवर कर्तृत्ववान आणि कणखर स्त्रियांनी समाजाची बंधने जुगारून देऊन आपले वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राखले; पण असे स्वत:चे वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राखताना त्यांनी इतरांनाही प्रेरणा दिली. त्यांची ही लढाई सामूहिक नसली तरी त्यांच्या कर्तृत्वाचे, केलेल्या पराक्रमाचे गारुड आजही कायम आहे.
झांशीची राणी लक्ष्मीबाई हिने स्वत:चे संस्थान इंग्रजांकडून गिळंकृत होऊ नये, म्हणून त्यांच्याशी दोन हात केले. अहिल्याबाई होळकरांनीही पती निधनानंतर सती न जाता उत्तम राज्यकारभार केला. त्या आधीही आणि नंतरही अशा अनेक राण्या, सरदार घराण्यातील स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वातून आपले स्वत्त्व सिद्ध केले, स्वत:ला सिद्ध केले. समाजाच्या विरोधात जाणे म्हणजे पहिली गोष्ट पुरुषसत्ताक समाजाच्या, दृष्टिकोनाच्या विरोधात जाणे. अशा विरोधाला घरातूनच सुरुवात होत असते.
बाहेरच्या शत्रूबरोबर लढण्याआधी त्यांना घरातल्या माणसांशीही लढावे लागले असेल. आज लोकशाही आहे आणि आज स्त्री-पुरुष समानता आहे. पण तरीही समाजात स्त्रियांवर बंधने आहेतच. चेन्नईतील ज्या २० महिलांनी मंगळसूत्र कायमचे घालणार नाही, असे स्पष्ट केले आहे, त्या सगळया महिलांच्या पतींनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा व्यक्त केला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
मंगळसूत्र ही विवाहित असण्याची खूण आहे, असे समाज मानतो. लग्नात सगळे दागिने नसले तरी चालतात; परंतु मंगळसूत्र नसेल तर विवाह संपन्न झाला, मुलीचे लग्न झाले, असे कोणी मानत नाही. लग्न झाले की, विवाहितेच्या मंगळसूत्राचे मोठे कौतुक केले जाते.
लहान आणि मोठया मंगळसूत्रांची कलाकुसर पाहिली जाते. पुरुषांच्या हातातील अंगठीचे कौतुक केले जाते. पण अलीकडे शहरात पुरुष हातात
सोन्याच्या अंगठया घालत नाहीत आणि महिला पारंपरिक दिनावेळी मोठे मणिमंगळसूत्र वापरतात. इतर वेळी छोटे मंगळसूत्र वापरले जाते. आता तर हे छोटे मंगळसूत्र आहे की, गळयातील चेन हेही ओळखता येत नाही, इतके बदल या मंगळसूत्रात झालेले असतात. त्यातील काळे मणी नावापुरते असतात.
जीन्सवर घातले जाणारे आणि साडीवर घातली जाणारी अशी दोन वेगवेगळी मंगळसूत्रे असतात किंवा जीन्स व साडीवर अशा दोन्हींवर शोभेल असे एकजिनसी मंगळसूत्र वापरले जाते. मंगळसूत्र हा आता पारंपरिक दिवशी घालायचा दागिना झाला आहे. त्याच्यावरील सौभाग्यलेण्याचा शिक्का आता पुसला जात आहे. अलीकडे मंगळसूत्र गळयातून चोरीला जाते म्हणून ते ब्रेसलेटसारखे हातात कसे घालता येईल, असे डिझाईन एका मराठी अभिनेत्रीने सादर केले. या मंगळसूत्राचा उपयोग ती एका मराठी मालिकेसाठी करणार आहे.
पुरुषांनी त्यावर टीका करण्याची गरज नाही. कारण मंगळसूत्र गळयात घालण्याऐवजी विवाहिता त्या हातात तरी घालतील, याबद्दल समस्त पुरुष वर्गाने समाधान मानायला हवे; पण महिला आजही मंगळसूत्राचा कायमचा त्याग करायला तयार नाहीत. आज विवाह आणि मंगळसूत्र दोन्हीही स्वैच्छिक बनले आहेत.
समस्त पुरुष जातीला आनंद वाटेल अशीच बातमी आहे.खरो खरच स्त्रियांनी मंगल सूत्र वापरणे बंद करायला पाहिजे. हा पुरुष ह्या स्त्री चा गुलाम आहे हे दाखविण्याचे काम मंगल सूत्र करते. त्याला साक्षी सर्व गावकरी असतात. त्या विधीला विवाह बोलतात.दोन गाव आहेत. एका गावातील स्त्रिया मंगल सूत्र वापरात नाहीत.दुसऱ्या गावातील स्त्रिया मंगल सूत्र वापरतात. दोघींचा विवाह झालेला आहे.विवाहाला गाव साक्षी आहे.दोघी गरोदर आहेत. दोघींना मुल झालीत या मुलांची जबाबदारी दोघांनी नाकारली सांगतात मुल आमची नाहीत.मुलांची जबाबदारी आम्ही घेणार नाही. तेव्हा मंगल सूत्र वापरणाऱ्या गावातील गावकर्यांनी त्याला सांगितले हे मंगल सूत्र जेव्हा हिच गळ्यात घातलेस तेव्हाच तू हिला होणार्या मुलाची जबाबदारी घेण्याचे कबूल केले आहेस. हाच नियम सर्व गावात लागू आहे ज्या गावातील स्त्रिया पतीने घातलेले मंगल सूत्र वापरतात. दुसर्या गावात निर्णय झाला. स्त्रीला सांगण्यात आले तू याचा बरोबर विवाह केलास तेव्हा हा मागेल तेव्हा त्याला शरीर सुख देण्याचे तू कबूल केले आहेस.दुसर्यांना तू तुझ्या मर्जीने देत आहेस.तुला झालेल्या मुलाची जबाबदारी तुझीच.विदेशातील पुरुष सुखी आहेत.कारण स्त्रिया काम करून मुलांचा सांभाळ करतात. भारतातील पुरुष दुखी आहेत कारण मुलांना सांभाळणाऱ्या स्त्रिया काम करत नाहीत. कारण विवाहात स्त्रीच्या गळ्यात मंगल सूत्र घालून ते त्यांचे गुलाम झाले आहेत. हि गुलामगिरी पिड्यान पिड्या चालत आली आहे.20 पुरुषांना आपण गुलाम गीरीतून मुक्त झालो याचा आनंद झाला असणार. बाकीचांच्या नशिबी आनंद केव्हा येणार. स्तीयांच्या गुलाम गीरीतून पुरुष मुक्तीची सुरुवात झाली. ह्यातच समाधान मानूया.