खैरलांजीची घटना २००६ मध्ये घडली होती, त्यानंतर वर्षभरानंतर माझं नाटक आलं. घटना घडल्यानंतर मी नाटक लिहिण्यापर्यंतचा वर्षभराच्या कालावधीत ज्या घटना घडल्या, त्यांनी मी नाटक लिहिण्यासाठी मी प्रवृत्त आणि प्रेरित झाले.
खैरलांजीची घटना २००६ मध्ये घडली होती, त्यानंतर वर्षभरानंतर माझं नाटक आलं. घटना घडल्यानंतर मी नाटक लिहिण्यापर्यंतचा वर्षभराच्या कालावधीत ज्या घटना घडल्या, त्यांनी मी नाटक लिहिण्यासाठी मी प्रवृत्त आणि प्रेरित झाले. खरं तर हे सगळे सामाजिक विषय आजवर माझ्या कथा-कविता आणि सगळ्याच साहित्यातून कायमच थेटपणे आलेले आहेत. परंतु खैरलांजीची घटना तिच्या वेगवेगळ्या बाजूंसकट कवितेसारख्या माध्यमातून मांडून मी व्यक्त होऊ शकेन का, अशी मला थोडीशी शंका वाटली. खरं तर मी ‘इन द टाइम ऑफ खैरलांजी’ अशी दीर्घकविताही लिहिली होती. ती माझ्या अलीकडच्या संग्रहातही समाविष्ट आहे. परंतु माझ्या असं लक्षात आलं की, हा विषय अधिक तीव्रपणे, अधिक परिणामकारकरीत्या आणि थेट प्रेक्षकांशी भिडत, त्याच्यातील सगळ्या गुंतवणुकीसहित नाटकातूनच मांडला जाऊ शकेल, कारण नाटक या माध्यमाची एक ताकद आहे, जी सगळ्यांना माहीत आहे. मी नाटक हा फॉर्म निवडण्याचं हे मुख्य कारण होतं. खैरलांजीच्या घटनेनंतर आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात संपूर्ण मोठा जनक्षोभ उसळला, संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे ही घटना कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मनावर केवळ ओरखडा काढणारीच नव्हे तर त्याला खूप अस्वस्थ करणारी ठरली. एकविसाव्या शतकातही हे असं वास्तव घडतंय, असा प्रश्न उपस्थित करणारी ठरली. यात पोलिस आणि न्यायवैद्यक यंत्रणांनी नीटपणे काम केलं नाही. काही गोष्टी इतक्या कच्च्या ठेवल्या की, ही केस नीट उभी राहू शकली नाही. अॅट्रॉसिटी लावली नाही. विनयभंग ही पहिली पायरी असते, पण या प्रकरणात बलात्कार सोडून द्या, पण विनयभंगाचा गुन्हाही लावण्यात आला नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊनही नंतर जन्मठेप ठोठावण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी जे जे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, त्यांना महाराष्ट्राच्या गृहखात्याने नक्षलवादी ठरवलं, त्याच्यावर केसेस टाकण्यात आल्या आणि त्यांचं प्रचंड मानसिक खच्चीकरण करण्यात आलं. हे सगळं मी जवळून पाहिलं, अनुभवलं आहे. म्हणून मी हे सारं नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला या नाटकाचे काही प्रयोग झाले तरी मी या नाटकासाठी एका चांगल्या ग्रुपच्या शोधात होते, जो माझ्या नाटकातील आषयाशी कुठलीही तडजोड करणार नाही. प्रयोग म्हणून जे काही बदल आवश्यक असतात, त्याला माझी मान्यता होती, परंतु आशयाशी तडजोड करणारा दिग्दर्शक मला नको होता. शिवदास घोडकेंची माझी ओळख सुबोध मोरेंमुळे झाली. त्यांना हे नाटक आवडलं आणि त्यांनी ते करायला घेतलं. ‘थिएटर अकॅडमी’तून बाहेर पडलेली विद्यार्थ्यांची अतिशय चांगली टीम या नाटकाला मिळली. या नाटकाला दिल्लीतील निर्भया प्रकरणाने आताचाही संदर्भ मिळाला. स्त्रिया, दलितांच्या संदर्भातले वगैरे हे जे सगळे इश्यू असल्यानेच या विषयाची चर्चा पुन्हा सुरू व्हावी, असं मला वाटलं.
नाटकाच्या ‘धादांत खैरलांजी’ या नावातच वेगळेपण आहे. खैरलांजीत जी घटना घडली, ती तशीच्या तशी रंगमंचित करणारं हे नाटक नाही. तसं मला अपेक्षितही नव्हतं. तर या घटनेच्या मागे काय प्रवृत्ती आहेत, एक अतिशय अमानुष अशी राजकीय, सामाजिक व्यवस्था, जात व्यवस्था ही कशी प्रस्थापित व्यवस्थेबरोबर काम करते आणि विशेषत: जागतिकीकरणानंतर गावपातळीवरील वास्तवही कसं बदललं आहे, ओबीसींचा दलितविरोध कसा काम करतोय, ह सगळं मला मांडायचं होतं. खैरलांजीच्या घटनेत गावातील ब्राह्यणांनी हे कृत्य केलेलं नाही, तर ते ओबीसींनी केलेलं आहे आणि संपूर्ण गावाने एकत्र येऊन भोतमांगे कुटुंबावर हा हल्ला केला आहे. आधी काय व्हायचं की, गावातील एखादा जमीनदार, एखादा पाटील हे करायचा आणि गाव गप्प बसायचं. कारण त्याची दहशत असायची. आता संपूर्ण गाव दलितविरोधी कृत्यामध्ये एकत्र येतो आणि त्याचा इव्हेंटही केला जातो. त्यामुळे जागतिकीकरणानंतर जे जास्त क्रौर्य, जास्त हिंसा समाजात आलीय त्याचा संदर्भही नाटकाला आहे.
या नाटकात खैरलांजीची घटना केंद्रस्थानी आहे, परंतु ती तशी असताना त्याच्या भोवतीचा या घटनेसंदर्भातला परीघ आहे, तोही कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खैरलांजी फक्त दुर्गम भागात घडतं असं नाही, तर ते मुंबईसारख्या महानगरातही घडतंय. त्यामुळे प्रा. वैशाली गजभिये ही या नाटकाची मुख्य व्यक्तिरेखा आहे. ती मुंबईच्या कॉलेजमधली इतिहासाची प्राध्यापिका आहे. ती विभागप्रमुख आहे, तिच्या वाटयालाही वेगळ्या प्रकारचं खैरलांजी कसं आणि का येतं, असा सवाल नाटक उभं करतो. म्हणूनच खैरलाजीची घटनेची पार्श्वभूमी आहे, असं न म्हणता ही घटना केंद्रस्थानी ठेवून आज महानगरात काय जातवास्तव आहे, त्याचबरोबर दलित समाज जो मध्यमवर्गीय वृत्तीकडे झुकत चालला आहे, त्याचीही चिकित्सा करणं, हा नाटकाचा हेतू आहे. आज सगळ्याच चळवळी सपाट होत चालल्या आहेत. त्याचा एक टोकदारपणा नाहीसा होत चालला आहे. तेव्हा चळवळीच्या बाबतीत काय होत चाललं आहे, एका प्रकारे चळवळीचं संपत जाणं त्यामागची कारणमीमांसा, घुसमट तो सगळा संदर्भ खूप मोठया प्रमाणात या नाटकात आहे.
मला असं वाटतं की, आजचा तरुणवर्ग मग तो अण्णा हजारेंच्या आंदोलनातला असू दे किंवा निर्भयासाठी रस्त्यावर उतरलेला, तो सक्रिय होतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण आजच्या व्यवस्थेतील गुंतागुंत आहे, ती ते समजून घेत नाहीय. म्हणून खूप लोकानुरंजनावादी पद्धतीने सगळं होताना दिसतंय. समाजसुद्धा त्याला तितकाच जबाबदार आहे. मला असं म्हणायचंय की, निर्भयाच्या वेळी समाज मोठया संख्येने रस्त्यावर आला. या निमित्ताने जी प्रचंड घुसळण झाली आणि जी ताकद दाखवली गेली, त्याची नोंद घेऊन न्यायालयाचा निकाल दिला गेला, कारण सगळ्यांनी चांगलं काम केलं, पण हे सगळं एका निर्भयाच्या बाबतीत घडतं, शक्ती मिलच्या घटनेत घडतं, मग दलित, आदिवासी, वंचित बाईच्या बाबतीत का घडत नाही? म्हणजे आपली संवेदनशीलताही जातींमध्ये विभागली आहे काय? एक स्त्री म्हणून निर्भयाच्या वाटयाला जे आलं त्यात माझी सहवेदना आहे. पण मग असं का होतं की, काही विशिष्ट समाजातील लोकांनाच का न्याय दिला जातो? म्हणून मी म्हणते, आजचा युवा वर्ग आहे, त्याने या आजच्या जातवास्तवाबद्दल तितकीच संवेदनशीलता बाळगायला हवी. त्यांनी या सगळ्या प्रश्नाशी स्वत:ला जोडून घ्यावं, आपल्यामध्ये जी प्रचंड मोठा ताकद आहे ती दाखवावी आणि कुठेतरी या वंचितांनाही न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. आज चळवळी बोथट होत चालल्यात, त्यातही त्यांनी मोठया प्रमाणावर उतरावं, असं मला कुठेतरी प्रामाणिकपणे वाटतं. हे नाटक त्या अर्थाने आरसा आहे. त्यात प्रत्येक जण आपला चेहरा बघू शकतो.
खैरलांजीचं धादांत सत्य!
समाजमनाला मुळापासून हादरवणा-या, माणुसकीला काळिमा फासणा-या घटनांवर मराठी रंगभूमीवर आजही फारशी नाटकं आलेली नाहीत. या घटनांची दखल घ्यावी, त्यांच्या खोलात जावं, त्यांच्यावर रोखठोक प्रहार करावा, असं मराठी रंगकर्मीना वाटत नाही. जयवंत दळवींचं ‘पुरुष’ किंवा रत्नाकर मतकरींचं ‘लोककथा ७८’सारखी नाटकं हे सामाजिक भान बाळगत असली तरी ती कुठल्या एका घटनेवर आधारित नव्हती, तर ती सर्वसाधारण परिस्थितीवर भाष्य करणारी होती. एखादी घटना केंद्रस्थानी ठेवून तिची सर्व बाजूंनी झाडाझडती घेत, तिच्यातील गुंतागुंत उकलत, तिच्याभोवतीच्या इतर गोष्टींची तपासणी करत, तिच्या मुळाशी पोहोचून तिच्यावर नाटकासारखी एखादी कलाकृती लिहिण्याचं काम मूळच्या कवयित्री प्रज्ञा पवार यांनी त्यांच्या ‘धादांत खैरलांजी’ या नाटकातून केलं आहे.
२९ सप्टेंबर २००६ रोजी महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात संपूर्ण देशाला सुन्न करणारी अमानुष घटना घडली. या गावातील दलित भय्यालाल भोतमांगे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांची गावकऱ्यांच्याच जमावाने अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते आणि सारेच अस्वस्थ झाले होते. प्रज्ञा पवार यांनी वर्षभरानंतर या घटनेवर ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक लिहिलं होतं. ते ‘प्रतिशब्द प्रकाशन’ने लगेच प्रकाशितही केलं होतं. त्यानंतर या नाटकाचे काही प्रयोग झाले. ते महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेतही सादर झालं. तिथे हे नाटक दुस-या क्रमांकावर आलं आणि त्याला दिग्दर्शन व लेखन अशी दोन पारितोषिकंही मिळाली. मधल्या काळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी चर्चासत्र, वाचन यामुळे चर्चेत होते. पुण्याच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले न्यासाने यावर दिवसभराचं चर्चासत्र ठेवलं होतं. २९ सप्टेंबर रोजी खैरलांजीच्या घटनेला सात वर्षे पूर्ण होत असतानाच हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं आहे.
आपल्या कवितांमधून नेहमीच तीव्र, जोरकस सामाजिक भान व्यक्त करणा-या प्रज्ञा पवार यांना या नाटकांतून नेमकं काय विधान करायचं आहे, हे नाटक खैरलांजी या एका घटनेवर भाष्य करतं की, तिच्यामागे असलेल्या प्रवृत्तीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाष्य करतं, ‘धादांत खैरलांजी’ या शीर्षकातून त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे, या नाटकातून नेमका काय संदेश लोकांपर्यंत पोहोचावा असं त्यांना वाटतं, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारं त्यांचं हे मनोगत.
Dhadant Khairlanji Article by Sameer Karambe