सगळं घराणंचं कलाकारांचं असल्याने, त्याच वातावरणात लहानाचा मोठा झालेल्या नाशिकच्या प्रफुल्ल सावंतनेही चित्रकलेचीच करिअर म्हणून निवड केली. कलेची उपजत जाण आणि घरातूनच झालेले चित्रकलेचे संस्कार यामुळे त्यांच्या चित्रांमध्ये एक वेगळीच प्रगल्भता पाहायला मिळते.
वडील भीमराज आणि मोठे बंधू राजेश सावंत हे दोघंही नावाजलेले चित्रकार असल्याने नाशिकमधील प्रफुल्ल सावंत यांच्यावर लहानपणापासून चित्रकलेचे संस्कार झाले. वडील भीमराज सावंत पूर्वी इलेस्ट्रेशन आर्टिस्ट म्हणून काम करायचे. शिवाय चित्रकार म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक आहे. ते गणपती डेकोरेशनचंही काम करत असत. सहाजिकच दोन्ही मुलं त्यांना या कामात मदत करत असत. वडील आणि भाऊ या दोघांचं काम पाहून मोठे झालेल्या प्रफुल्ल यांना आपण नेमकं चित्रं कधी काढू लागलो, हे आठवत नाही. पण शाळेत असल्यापासून या दोघांसारखी कलाकारी करण्याचा ते प्रयत्न करायचे. मोठय़ा भावाला याच क्षेत्रात करिअर करायचं होतं, मात्र प्रफुल्ल यांना पोलिस खात्यात जाऊन नाव कमावण्याची इच्छा होती. राजेश नेहमी त्यांना वेगवेगळ्या स्पर्धाना सहभागी व्हायला लावत. त्यात राजेश आणि प्रफुल्ल यांची चित्रं उजवी ठरत. या स्पर्धाना जाऊन त्यांचा चित्रकलेचा उत्तम सराव होत होता. आकारांचं, रंगांचं ज्ञान वाढत होतं. शालेय जीवनातच राजेश यांनी चित्रकलेसाठी जवळपास २००, तर प्रफुल्ल यांनी १५० बक्षिसं मिळवली होती. चित्रकलेतच आपली कारकीर्द करण्याच्या निर्णयाबद्दल प्रफुल्ल सांगतात, ‘बारावीनंतर पुढे पोलिस खात्यात नोकरी करण्यासाठी परीक्षा देण्याचा माझा विचार होता. त्या वेळी माझ्या मोठय़ा भावाने मला समजावलं. माझी चित्रकला उत्तम असल्याने मी चित्रकलेचाच करिअर म्हणून विचार करावा, असं त्यांचं आणि घरच्यांचं मत होतं. त्यांच्या आग्रहाखातर मी नाशिकमधील ‘कला निकेतन चित्रकला महाविद्यालयात’ दोन वर्षाच्या ‘आर्ट टीचर डिप्लोमा’साठी प्रवेश घेतला. तिथे माझा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि या चित्रकलेशिवाय आपण राहू शकत नाही, याची खात्री झाली. त्यानंतर मी चित्रकलेतच करिअर करण्याचा निर्णय पक्का केला.’
नाशिकमधील महाविद्यालयात डिप्लोमा पूर्ण झाल्यावर प्रफुल्ल यांनी त्याच महाविद्यालयात चित्रकलेतील पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. २००१पासून त्यांनी व्यावसायिक स्वरूपात चित्रं काढायला सुरुवात केली. विद्यार्थीदशेत आणि त्यानंतरची काही र्वष प्रफुल्ल जास्त करून निसर्गचित्रं काढत. २००७ मध्ये मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये त्यांनी काढलेल्या निसर्गचित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. त्यांच्या या प्रदर्शनाचं, त्यांच्या चित्रांचं जाणकारांनी कौतुक तर केलंच, पण हे प्रदर्शन आर्थिकदृष्टय़ाही यशस्वी ठरलं. पहिल्यावहिल्या प्रदर्शनाला लाभलेल्या या प्रतिसादामुळे प्रफुल्ल यांचा आत्मविश्वास दुणावला. यानंतर त्यांनी व्यक्तिचित्रं काढायलाही सुरुवात केली. त्यांच्या व्यक्तिचित्रांना अनेक संस्थांची बक्षिसं मिळाली. पुढे २००९ मध्ये मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी व्यक्तिचित्रांचं प्रदर्शन भरवलं. या प्रदर्शनातून व्यक्तिचित्रं आणि निसर्गचित्रं यावरील त्यांचं प्रभुत्व त्यांनी सिद्ध केलं. त्यानंतर २०१०मध्ये नेहरू सेंटरमध्ये आयोजित केलेल्या त्यांच्या प्रदर्शनात त्यांनी एका वेगळ्याच थीमवर चित्रं काढली. निसर्गचित्रं आणि मानवी आकृती यांचं फ्युजन असणारी ती चित्रं त्यांच्या कलेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. आतापर्यंत त्यांनी ‘बिहाइंड द ड्रीम’, ‘ब्लॉसम ऑफ ड्रीम’ यांसारख्या वेगळ्या थीम आपल्या चित्रांतून मांडल्या आहेत. विविध विषयांवर त्यांनी रेखाटलेल्या मूर्त आणि अमूर्त चित्रांमधील मानवी भावभावनांचा खेळ अनुभवणं, हा एक वेगळा अनुभव ठरतो.
प्रफुल्ल जास्त करून वास्तववादी चित्रकलेवर काम करतात. त्यांनी रेखाटलेल्या मूर्त आणि अमूर्त चित्रांमध्ये त्यांच्या कलेची प्रगल्भता दिसून येते. मूर्त चित्रांमधील त्यांनी रेखाटलेल्या वस्तू, खाणाखुणा, व्यक्तिचित्रांच्या भावभावना या आपल्याला अगदी जवळच्या वाटतात, तर अमूर्त चित्रांमधील कल्पनांचं वास्तवाशी जोडलेलं नातं थक्क करून जातं. या कलाकृतींविषयी प्रफुल्ल सांगतात, ‘ब-याच दिवसांपासून एखाद्या गोष्टीवर किंवा घटनेवर आपण केंद्रित झालेलो असतो. त्यासंबंधी मनात सतत विचार चालू असतो. त्या अमूर्त विचारांना मूर्त स्वरूप येण्यासाठी विशिष्ट कालावधी जाऊ द्यावा लागतो. जेव्हा हे विचार परिपक्व होतात तेव्हाच त्या चित्रातील आशयाला एक खोली आणि रंगसंगतीला उंची प्राप्त होते’.
प्रफुल्ल निसर्गचित्रं रेखाटण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रदेशांचा, ठिकाणांचा दौरा करतात. त्या वेळी अनुभवलेलं निसर्गाचं रूप मनात साठवून नंतर कॅनव्हासवर उतरवतात. त्यांच्या मते, एखादी गोष्ट पाहिल्यावर ती चित्रात उतरवताना माझ्या स्मृतिपटलावर तिचं जे प्रतिबिंब पडलेलं असतं त्याचा उपयोग केवळ ३० टक्के होतो, तर कलाकाराच्या कल्पनाशक्तीचा, त्याच्या दृष्टिकोनाचा सहभाग ७० टक्के असतो. कलेविषयी आपलं मत व्यक्त करताना प्रफुल्ल सांगतात, ‘कलेतून निखळ आनंद मिळाला पाहिजे. जीवनासाठी कला नसून कलेसाठी जीवन आहे हे लक्षात घ्यायला हवं. कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय जी कलाकृती आपल्या हातून साकारते, तेव्हा ती करतानाचा आनंद हा अतिशय वेगळा असतो’.
कामाबद्दलची आत्मीयता, प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर कलाक्षेत्रात यश संपादन करणा-या प्रफुल्ल यांच्या मते, कलाकारासाठी त्याच्याकडून पुढे आकाराला येणारं चित्र सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे, तरच त्याच्याकडून सर्वोत्तम काम होऊ शकतं. प्रफुल्ल यांनी त्यांच्या चित्रांसाठी आजपर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. जगातील निरनिराळ्या देशांत आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवलेल्या प्रफुल्ल यांनी जवळपास १५ राज्य-राष्ट्रीय तर १५ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. २०११ मध्ये जर्मनीतील मानाचा समजला जाणारा ‘पाम अवॉर्ड’ त्यांनी पटकावला. जर्मनीतील एका पोस्टकार्डवर त्यांचं चित्रही छापण्यात आलं आहे. याशिवाय जगभरातील अनेक कलाविषयक नियतकालिकांनी त्यांच्या चित्रांची दखल घेतली आहे. अमेरिकेतील ‘वॉटर कलर’ या प्रसिद्ध मॅगझीनच्या मुखपृष्ठावरही त्यांचं चित्रं छापण्यात आलं होतं.
चित्रकलेत वशिष्टय़पूर्ण काम करणारे प्रफुल्ल चित्रकलेला आणि कलाकारांना मात्र हक्काचं व्यासपीठ मिळत नाही, याबाबत खेद व्यक्त करतात. अभिनय, नृत्य, संगीत अशा विविध कलाप्रकारांना प्रसिद्धी देणारा मीडिया चित्रकलेसारख्या कलेला दुय्यम वागणूक देताना दिसून येतो, असं त्यांना वाटतं. याबाबत मत व्यक्त करताना ते म्हणतात, ‘लोकांना बुद्धिवादी खाद्य पुरवण्याऐवजी चंगळवादी बनवण्याकडे आजच्या मीडियाचा कल वाढतो आहे. सामान्य लोकांपर्यंत या कला पोहोचाव्यात म्हणून शासनही काहीच ठोस पावलं उचलताना दिसत नाही. खेडोपाडय़ातील चित्रकारांचं शहरातील आर्ट गॅलरीजपर्यंत पोहोचण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहिला तरी या गोष्टीचं गांभीर्य कळेल. एखाद्या संगीतकाराचं किंवा बॉलिवुडच्या अभिनेत्याचं नाव आजची पिढी जितक्या सहजतेनं लक्षात ठेवेल, तितक्या सहजतेनं त्यांना एखाद्या चित्रकाराचं नाव माहीत असेल का, याबाबत शंका आहे. म्हणूनच सर्वसामान्यांनीच या कलांना आश्रय देण्याची गरज आहे.’
beautiful
beautiful paintings…nice imagine
nice and beautiful paintings