१८ महिन्यांपूर्वी ‘मोदी मोदी’ करणा-या जनतेच्या मनातील मोदींचे प्रेम संपले असून, त्यांच्याविरुद्ध संतापाचा स्फोट आज मोदींना मुंबईत काळे झेंडे दाखवून व्यक्त झाला.
मुंबई – १८ महिन्यांपूर्वी ‘मोदी मोदी’ करणा-या जनतेच्या मनातील मोदींचे प्रेम संपले असून, त्यांच्याविरुद्ध संतापाचा स्फोट आज मोदींना मुंबईत काळे झेंडे दाखवून व्यक्त झाला. मोदींच्या लोकप्रियतेविरुद्धची पहिली लढाई आज मुंबईतूनच सुरू झाली. जेएनपीटी आणि मुंबई येथे जनतेने मोदींना काळे झेंडे दाखवून सरकारने फसवणूक केल्याचा रोष आणि संताप व्यक्त करण्यात आला.
फडणवीस सरकारातील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने पंतप्रधानांच्याच मुंबई आणि जेएनपीटी येथील सगळय़ा कार्यक्रमांवर कडकडीत बहिष्कार घालून तीव्र निषेध व्यक्त केला. राज शिष्टाचाराप्रमाणे मुंबईच्या पहिल्या नागरिक महापौर स्नेहल आंबेकर याही मोदींच्या आगमनावेळी स्वागताला फिरकल्या नाहीत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी केलेले गलिच्छ राजकारण आणि गेल्या अठरा महिन्यांत भाजपा सरकारकडून सामान्य माणसांच्या झालेल्या घोर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील संताप लोकांनी वेगवेगळय़ा माध्यमातून व्यक्त केला. उरण येथील प्रकल्पग्रस्त, मुंबईतील मेट्रोबाधित आणि गिरणी कामगारांनी तर नरेंद्र मोदी यांचा निषेध करूनच आपल्या मनातील संतापाला वाट करून दिली.
तर भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने या संपूर्ण कार्यक्रमावर बहिष्कार घालून प्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतक-यांच्या मदत वाटपासाठी बीडला निघून गेले. शिवसेनेला भाजपाने सत्तेत सामील करून घेतले असले तरी त्यांना कोणत्याही प्रकारची किंमत दिली जात नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी रणनीती आखून एक प्रकारे अपमानित केले. बीडला निघून गेलेल्या शिवसेना नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत असताना असे आपमानित केले जात असेल तर प्रसंगी आम्ही सत्तेतून बाहेर पडू अशा प्रकारचा इशारा दिला.
मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी वेळ द्यावा, अशा प्रकारची मागणी गिरणी कामगारांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र त्यांना वेळ न दिल्याने अखेर गिरणी कामगारांनी निवेदन देऊन आपला निषेध नोंदविला. तर मेट्रो २ आणि मेट्रो ७चे उद्घाटन होत असताना मेट्रोबाधितांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही तोडगा न काढल्याबद्दल प्रकल्पबाधितांनी काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला.
नरेंद्र मोदी, भाजपाचे सरकार दिलेली आश्वासने पाळत नाही. त्यामुळे सरकारवर आपला विश्वास नाही,
अशा घोषणा यावेळी मोदींच्या विरोधात प्रकल्पबाधितांनी दिल्या. एकंदर मोदी आणि भाजपा सरकारविरोधातील असंतोष जागोजाग पाहायला मिळाला.
सामान्य आंबेडकरी जनतेनेही व्यक्त केला संताप
जातीयवादी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे उद्घाटन हे केवळ श्रेय लाटण्यासाठी केलेले आहे. ही आंबेडकरी जनतेची दिशाभूल आहे. अशावेळी काही नेते या उदघाटन सोहळय़ात सहभागी झाले असले तरी खरा आंबेडकरी भक्त या जातीयवाद्यांच्या वळचणीला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आर.के. गटाचे प्रमुख राजाराम खरात यांनी व्यक्त केली.
प्रकल्पग्रस्त शेतक-यांची उरणमध्ये निदर्शने
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या चौथ्या टर्मिनल्सच्या भूमिपूजनाला उरण येथे प्रकल्पग्रस्तांनी काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. भूखंडाच्या खोटय़ा इरादापत्राचे वाटप करून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केल्याचा आरोप सर्वपक्षीय संघर्ष समितीने केला आहे.
जेएनपीटीतील चौथ्या बंदराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होत असतानाच करळ फाटय़ावर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले. शिवसेनेचे खासदार आणि आमदार यावेळी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्केभूखंड वाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे.
गेल्यावर्षी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात चार प्रकल्पग्रस्तांना इरादापत्रांचे वाटप करून दोन महिन्यात हा प्रश्न सोडवणार असल्याचे स्पष्ट केल होते. मात्र वर्ष होऊनही भूखंडाचे वाटप झाले नाही. या उलट मोदींनी प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेली इरादापत्रं खोटी असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी १६० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. मात्र हा निर्णय लालफितीत अडकला आहे. यामुळे येत्या दोन महिन्यात सरकारने हा प्रश्न निकाली नाही काढला तर जेएनपीटी बंदराचे काम होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
दिलेली वचने पाळत नाही, मुंबई कराचांच टोल अजून बंद होत नाही. CM of Maharashtra declared that from 1st October no toll tax for small vehicle but no declaration as on today.
Please come forward for the same for withdrawals of Toll tax on small vehicle on Mumbai entrance and Mumbai Pune Highway where Govt already recovered the amount.