धोकादायक बनत चाललेल्या कोकण रेल्वेमार्गावर आणखी एक अपघात होताना वाचला.
रत्नागिरी- धोकादायक बनत चाललेल्या कोकण रेल्वेमार्गावर आणखी एक अपघात होताना वाचला. कोकण रेल्वेमार्गावरील करबुडे बोगद्यानजीक रेल्वे रूळ तुटल्याची बाब ट्रॅकमनच्या निदर्शनास आली. या घटनेची खबर ट्रॅकमन सचिन पाडावे याने तात्काळ रेल्वेच्या नियंत्रण कक्ष आणि उक्क्षी रेल्वे स्थानकाला दिली. मात्र, उक्क्षी रेल्वे स्थानकातून सुटलेल्या कोकणकन्यातील हजारो प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी ट्रॅकमन पाडावे यांनी ७०० मीटर धावत जाऊन कोकणकन्या एक्स्प्रेस थांबवली आणि प्रवाशांचे प्राण वाचले.
कोकण रेल्वेमार्गावर वारंवार होणा-या अपघातांनंतर रेल्वे मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न याआधीच उपस्थित करण्यात आला आहे. दोन वर्षात या मार्गावर नऊ अपघात झाले असून सर्वाधिक अपघात मालगाडयांचे झाल्याने या अपघातांची तीव्रता जाणवली नाही. मागील काही कालावधीत झालेल्या अपघातांची संख्या विचारात घेतली तर कोकण रेल्वेमार्गाचा क्षमतेपेक्षा अधिक वापर केला जातोय का आणि या मार्गाच्या देखभालीसाठी योग्य वेळ मिळत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे का, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
रविवारी सकाळी कोकण रेल्वेमार्गावर करबुडे ते उक्क्षी दरम्यान गस्त घालणा-या ट्रॅकमन सचिन पाडावे आणि त्याचा सहकारी सुजीत सावंत यांच्या तत्परतेमुळे कोकण रेल्वे मोठया अपघातापासून बचावली. रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना करबुडे बोगद्यानजीक लाजूळ येथील पुलानजीक रेल्वेचा ट्रक तुटल्याचे या दोघांच्या निदर्शनास आले. या घटनेचे गांभीर्य ओळखून सचिन पाडावे यांनी या घटनेची खबर तात्काळ रेल्वेच्या कंट्रोल रूम आणि उक्क्षी रेल्वे स्थानकाला दिली. मात्र कोकण कन्या एक्स्प्रेस पाच मिनिटांपूर्वीच उक्क्षी रेल्वे स्थानकातून सुटल्याचे उक्क्षी स्थानकातून सांगण्यात आले.
रेल्वे रूळ तुटल्याने अपघात टाळण्यासाठी ताशी ७५ कि.मी. वेगाने येणा-या कोकण कन्या एक्स्प्रेसला थांबवणे आवश्यक होते. यासाठी सचिन यांनी थेट रेल्वे रुळावरून उक्क्षीच्या दिशेने धाव घेतली. ट्रॅक तुटलेल्या ठिकाणापासून तब्बल ७०० मीटर धावत जाऊन त्यांनी बॅटरीने सिग्नल देत कोकणकन्या थांबवली. ट्रॅकमन सचिनने प्रसंगावधानाने फार मोठा अपघात टळला. सचिन यांच्या प्रसंगावधान राखत हजारो प्रवाशांचे प्राण वाचवल्याने रेल्वेनेही सचिनचे विशेष आभार मानले. या अपघातामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक तासभर ठप्प होती. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली.
दोन रूळ वेल्डिंग करून जोडण्या पेक्षा जर एक्ष्पन्शन जोइन्त्स ( जोइन्त्स) आणि फिश प्लेट्स वापरल्यात तर नक्कीच रुळला
तडे जावून रूळ तुटण्याचे प्रमाण कमी होईल , कोंकण रेल या सूचने कडे लक्ष देईल काई ??