जैवविविधतेकडे दुर्लक्ष करून वाघांचे किती कौतुक करायचे, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांनी शुक्रवारी पुण्यात केला.
पुणे – राज्यातील वनांची टक्केवारी घटत चालली आहे, याची मला काळजी वाटते. वाढत जाणारी घरे, रस्ते आणि कारखानदारीमुळे झपाट्याने जंगले नष्ट होत आहेत.जैवविविधतेकडे दुर्लक्ष करून वाघांचे किती कौतुक करायचे, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांनी शुक्रवारी पुण्यात केला.
भारती विद्यापीठाच्या १८ व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात चितमपल्ली बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलसचिव जयाकुमार, कार्यवाह विश्वजीत कदम, आमदार उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. भारती विद्यापीठातर्फे देण्यात येणारा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ दलित पँथरचे संस्थापक, ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली, संपादक मुरलीधर शिंगोटे, अभिनेत्री उषा चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
लोक जंगल पहायला, अनुभवायला जात नाहीत, तर फक्त वाघ बघायला जात आहेत. त्यामुळे नागपूरला आता ‘वाघापूर’ असेच नाव द्यावे लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे निसर्ग आणि गाव यातले अंतर कमी होत चालले आहे, अशी भीती चितमपल्ली यांनी या वेळी व्यक्त केली.
सरकारकडून अनुदान पाहिजे, मात्र समाजाची शिस्त हरवली आहे, असे अधोरेखित करत सरकार काय देते, यापेक्षा गावकरी काय करू शकतात, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले. समाजात नतिक दबदबा राहिला नसून स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी नैतिक बळ असणा-या व्यक्तींनी सामाजिक पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन माजी न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. अलिकडच्या काही घटनांमुळे पुणे स्त्रियांसाठी सुरक्षित राहिले आहे काय, असा सवालही धर्माधिकारी यांनी उपस्थित केला. तसेच महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली.
कायमस्वरूपी दुष्काळ निवारणावर भर
राज्यातील दुष्काळाचे निवारण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. टंचाईग्रस्त भागांसाठी तात्काळ टँकर पुरविणे, तसेच चारा उपलब्ध करून देण्यासाठी विभागावार बैठका घेतल्या जात आहेत. तालुका पातळीवर तहसीलदारांना टँकर पुरवण्याचे अधिकार दिले आहेत. दुष्कळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तालुकानिहाय निधी उपलब्ध करून देणार असल्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले.
‘माळ्याच्या मळ्यामंदी..’ला उपस्थितांची दाद
आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही तेवढय़ाच घडल्या. लोक चांगल्या गोष्टी विसरतात आणि नको त्या लक्षात ठेवतात. गेली चौदा वष्रे वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी मला खूप त्रास दिला. मात्र, माझे चाहते हेच माझं टॉनिक आहेत. अभिनयाच्या कलेने मला खूप काही दिले. ‘कला हा माझा नवरा आहे’, असे सांगून अभिनेत्री उषा चव्हाण यांनी ‘सोंगाडय़ा’ चित्रपटातील ‘माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी’ हे गाणं गात उपस्थितांची दाद मिळविली.
maruti chitampalli yanni khre bol sangitale..
apan kiti kal wagh wagh mhanun itar srushtikade durlaksh karnar ahot.
itr pakshi,prani ani naisargik sampatti kade suddha tevdech laksh puravle gele pahije.