पाकिस्तान सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात उद दावा आणि हक्कानी नेटवर्कसह १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात उद दावा आणि हक्कानी नेटवर्कसह १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानवर दबाव आणल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे समजते.
लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. तर २००८ मध्ये काबूल येथील भारतीय दुतावासावरील हल्ल्यामागे जलालुद्दीन हक्कानी नेटवर्कचा हात होता. या हल्ल्यात ५८ जणांचा मृत्यू झाला. २०११ मध्ये काबूलमधील अमेरिकेच्या दुतावासावरील हल्ला आणि अफगाणमधील बाँबस्फोटांमध्येही हक्कानी नेटवर्कचा सहभाग होता. सप्टेंबर २०१२ मध्ये अमेरिकेने हक्कानी नेटवर्कवर बंदी घातली होती.
केरी यांनी शरीफ यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पाकिस्तानला दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी खडे बोल सुनावल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दबाव आणि नुकताच झालेला पेशावर हल्ला यामुळेच पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलून तेथील १२ दहशतवादी संघटनांवर बंदी लादण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये बंदीची अधिकृत घोषणा होईल, असे पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी म्हटले आहे.
तू मारल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो असा सारा खेळ सुरु आहे. ही सारी नौटंकी चालू आहे.