शहर व उपनगरांत आजही खड्डय़ांचे साम्राज्य पसरलेले असताना मुंबई महापालिकेकडून मात्र खड्डय़ांकडे सर्रास डोळेझाक केली जात आहे.
मुंबई – शहर व उपनगरांत आजही खड्डय़ांचे साम्राज्य पसरलेले असताना मुंबई महापालिकेकडून मात्र खड्डय़ांकडे सर्रास डोळेझाक केली जात आहे. ‘मुंबईत फक्त पावसाळ्यातच खड्डे निर्माण होतात’, असा अजब शोध लावत सध्याच्या खड्डय़ांकडे पालिकेने ढुंकूनही पाहिलेले नाही. महापालिकेचा हा बेजबाबदारपणा आणि रस्त्यावरील खड्डय़ांकडे होत असलेले दुर्लक्ष याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
[poll id=”916″]
पालिकेच्या वतीने खड्डय़ांसाठी सुरू केलेल्या संकेतस्थळाचाही वापर होत नसल्याचे निदर्शनास आल्याने विविध ठिकाणच्या खड्डय़ांची माहिती घेऊन प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.मुंबईतील खड्डय़ांचा प्रश्न गेली अनेक वर्षे सुटलेला नाही. दरवर्षी हे खड्डे बुजवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर पालिकेकडून केला जातो. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती ‘जैस थे’ आहे. त्यामुळे या खड्डय़ांचा विषय उच्च न्यायालयात पोहोचला आहे. शौकतअली बेटगिरी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे व न्यायालयानेही ‘स्यू मोटो’ दाखल करून घेऊन प्रकरणाची सुनावणी सुरू केली. न्यायाधीश अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी सुरू आहे. पालिकेच्या वतीने खड्डय़ांसाठी ‘रोड मास्टरप्लॅन’ आखण्यात आल्याचे सांगण्यात आले. तीन वर्षासाठी हा आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डयांची तपासणी पालिकेकडून केली जात असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. तसेच खड्डय़ांसाठी पालिकेच्या वतीने www.voiceofcitizen.com हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. खड्डय़ांचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्याची व तक्रार दाखल करण्याची सुविधा या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे पालिकेने न्यायालयात स्पष्ट केले.
मात्र, पालिकेचा दावा खोडून काढत या संकेतस्थळाचा वापरच होत नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच अनेक ठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्याचे विविध छायाचित्रांच्या साहाय्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणा-या ‘सेंट्रल रिसर्च रोड इन्स्टिटय़ूट’ने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत कमी दरात ‘सोल्यूशन’ उपलब्ध करून देण्याचे पालिकेला सुचवले असतानाही त्याला नकार देत काही विशिष्ट कंत्राटदारांनाच खड्डे बुजवण्याचे कंत्राट पालिका देत असल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले. शहरासह पूर्व द्रुतगती मार्ग, बीपीटी रोड, फ्री वेचा मागील व पुढील भाग, नाहूर व मुलुंड दरम्यानचा परिसर याठिकाणी आजही खड्डे पहायला मिळत असल्याचे न्यायालयात छायाचित्रांसह स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, विविध याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या छायाचित्र व यादींचा तपशील पाहता यासंबंधी माहिती घेण्याचे निर्देश न्यायाधीश अभय ओक यांनी पालिकेला दिले आहेत. पालिकेच्या संकेतस्थळावर नोंद केलेल्या तक्रारींचा आणि त्याला दिलेल्या उत्तरांचा तपशील न्यायालयाला सादर करण्याचे पालिकेला निर्देश देऊन सुनावणी तहकूब करण्यात आली.
माणूस जेव्हा दिवसभर कार्यरत राहण्यास आपली पोट पूजा करतो आणि त्याचे विसर्जन करण्यास एक मार्ग मोकळा ठेवतो. त्याचप्रमाणे रस्त्यावर पावसाळ्यात जमा होणारे पाणी ते फक्त रोडवरच साचून राहता कामा नये, ते पाणी जाण्यास कोठूनतरी मार्ग असावा. नाहीतर खड्डे पडतात म्हणून आणले डांबर, टाकली खडी कि रस्ते फक्त काही दिवसाकरिता खड्डेमुक्त होतात, पण पुन्हा जेव्हा पावसाळा येतो तेव्हा तेच रस्ते पाण्यामुळे खड्डे निर्माण करतात. जागो जागचे रस्त्याजवळील गटारे पूर्णपणे “पेटीप्याक” करून रस्ता मोठा करण्यात आला. आपल्या घरात शुभ्र लाद्या बसवा आणि त्यावर सारखे पाणी ओतत राहा आणि ते पाणी जाण्यास कोणतीच मोकळीक ठेवू नका. पाहा आपल्या घरातील लाद्याही पाण्यावर तरंगू लागतील, नाहीतर तेथे चिखल जमा होईल. मग जर त्या लाद्या तुटल्या फुटल्या किंवा त्याच्या खालील कोबा पुन्हा वर आला., कि पुन्हा नव्या लाद्या बसवा आणि पुन्हा लाद्या बसवून झाल्या कि त्यावर पुन्हा पाणी ओतत राहा, मग पाहा तुमच्या घरातच तुम्हाला चमत्कार दिसतो कि नाही? २६ जुले च्या पावसात तुंबलेल्या गटारा- नाल्यातील घाणवर आली आणि त्या घाणीच्या पाण्यातून जनतेस यावे लागले, तरी महानगरपालिका गटारे नाले ९० टक्के साफ झाल्याचे आश्वासन मुंबईच्या जनतेस पावसाळ्यापूर्वी देते, यात कितपत सत्यता येथील जनतेने बाळगावी.