आताचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी भाजपाचे सरकार आल्यानंतर उघडपणे मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
श्री. मोहन भागवत हे सरसंघचालक आहेत. आतापर्यंत गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, सुदर्शन असे जे जे सरसंघचालक झाले त्यापैकी कोणीही राजकारण आणि समाजकारण याच्याबद्दल आपली मते जाहीरपणे व्यक्त केली नाहीत. आणि क्वचितप्रसंगी बाळासाहेब देवरस मते व्यक्त करीत. पण व्यक्त केलेल्या मतांपासून त्यांनी कधी माघार घेतली नाही. आताचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी भाजपाचे सरकार आल्यानंतर उघडपणे मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील ज्येष्ठ नेते अगदी गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शहा ही मंडळी संघाच्या मुख्यालयात, रेशीम बागेत भागवतांना भेटायला जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात, संघाकडून जे आदेश मिळतील त्यानुसार सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराज अजून नागपूरच्या रेशीम बागेत गेलेले नाहीत. पण संघाचा दबाव वाढला तर तेसुद्धा जातील. या भागवतांनी काही दिवसांपूर्वी आरक्षणावर मत व्यक्त केले.
संघ आरक्षणाच्या विरोधी आहे, हे काही लपून राहिलेले नाही. संघ प्रामुख्याने मध्यमवर्गीयांचा आणि त्यातल्या त्यात उच्चवर्णीयांचा. हे सगळय़ांना माहिती आहे. संघाचा आजपर्यंतचा सरसंघचालक एका विशिष्ट जातीखेरीज होऊ शकला नाही. संघाला ते मान्य होणार नाही. उच्चवर्णीयांच्या हातातच संघ राहिला पाहिजे, ही भूमिका १९२५ ला संघ स्थापन झाला तेव्हापासून होती. ती आजही कायम आहे. संघाच्या शाखेवर कधीही स्वातंत्र्यदिनाचा झेंडा फडकला नाही आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन संघवाल्यांनी जोशात कधी साजरा केला नाही.
भारतीय घटनेबद्दल संघाला आदराची भावना कधीच नव्हती आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही संघाला आत्मियता कधीच नव्हती. आता जे काही संघ आणि सरकार आंबेडकरांबद्दल बोलतो आहे, दाखवतो आहे ते सगळे उबळ या थाटाचे आहे. तो काही उमाळा नाही. संघामध्ये एक प्रात:स्मरण शिकवले जाते. या प्रात:स्मरणात कुठेही डॉ. आंबेडकरांचा उल्लेख नाही, महात्मा फुले यांचा उल्लेख नाही आणि महात्मा गांधींचाही उल्लेख नाही. हे सर्व नेते त्यांना वज्र्य आहेत. पण दाखवता येत नाही आणि बोलताही येत नाही. म्हणून मोदीही गांधी-आंबेडकर यांची नावे घेतील. पण ती नाईलाजापोटी आहेत.
संघाच्या प्रात:स्मरणात शेवटच्या चरणात
‘केशवम् हेडगेवार
वंशरत्नम् दृढम् रतम्’
असा उल्लेख आहे. पण फुले, गांधी, आंबेडकर यांचा उल्लेख नाही. एवढेच काय तर संघाला सावरकरही ताज्यच आहेत. अशा या संघाचे सरसंघचालक असलेले श्री. मोहन भागवत यांनी केलेली सामाजिक निवेदने ही नुसतीच वादग्रस्त नाहीत तर या देशाच्या काही संकल्पनांच्या पूर्णपणे विरोधात आहेत. आरक्षणाबद्दल भागवतांना मोठा राग आहे. दलित, दुबळे, भटके, आदिवासी हे उच्चवर्णीयांच्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत, या संकल्पनेतून घटनाकारांना आरक्षणाची तरतूद केली आणि त्याविरोधात भागवतांनी मत व्यक्त केले. ‘आरक्षणाची गरज काय?’ असा त्यांचा सवाल होता. त्यावर जोरदार टीका झाली. तेव्हा त्यांनी आपले निवेदन मागे घेतले. परंतु त्याचा जो संदेश जायचा तो गेलाच. संघाचा आरक्षणाला विरोध आहे. दीन, दलित आणि गावकुसाबाहेरचे यांना न जुमानणारी जी उच्चवर्णीय प्रवृत्ती आहे, ती संघाची मूळची वैचारिक बैठक आहे. आता नाईलाजाने काही गोष्टी संघ बोलतो आहे. पण त्यातील गंभीरपणा लोकांना कळतो.
आता भागवतांनी हिंदुधर्मीयांना जे आवाहन केले आहे ते आवाहन कोणत्या कारणाने केले हे दुनियेला माहिती आहे. संघाचा असा एक प्रचाराचा भाग आहे की, मुस्लिमांची संख्या वाढत असून, कुटुंब नियोजनाचा प्रचार हिंदूंच्या मुळावर येत आहे. कोणत्याही सामाजिक प्रश्नाला एकदा राजकारणाची फोडणी दिली की मग ते विषय कितीही ताणता येतात. भागवतांनी नकळत उघडपणे असे सूचित केले आहे की, हिंदूंची संख्या वाढवण्याकरिता हिंदू कुटुंबीयांनी अधिक मुले जन्माला घालावीत.
निवेदन करून नेहमीप्रमाणे भागवत यांनी पलटी खाल्ली. ते तशी पलटी खाणार हे अपेक्षितच होते. हिंदूंची कुटुंबसंख्या वाढवायची तर आज ज्या गरीब मुस्लीम समाजात कुटुंबसंख्या वाढलेली आहे त्या कुटुंबांची आर्थिक स्थिती काय आहे, याचाही अभ्यास करा. कुटुंबसंख्या वाढवल्यानंतर त्यांना सांभाळायचे कोणी, वाढवायचे कोणी आणि आजच्या महागाईच्या जगात त्यांचे योग्य पालनपोषण करायचे कोणी याचे उत्तर भागवत यांनी दिलेले नाही. भागवत स्वत:च अविवाहित आहेत. गोळवलकर गुरुजी अविवाहित होते. त्यामुळे अविवाहितांनी दुस-यांना तुम्ही कुटुंबसंख्या वाढवा, असे सांगणे आणि त्या कुटुंबीयांच्या आर्थिक स्थितीची कल्पना नसताना भावनात्मक आव्हाने करून त्यांना भलत्या विषयात भरीला घालणे हे सगळे घडाळय़ाचे काटे उलटे फिरवण्यासारखे आहे.
‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या सामाजिक चौकटीला धक्का देण्याचा कार्यक्रम संघातर्फे सुरू झालेला आहे. भागवतांनी मत व्यक्त केले म्हणजे ते संघाने व्यक्त केलेले आहे आणि संघाने व्यक्त केलेले मत हे आता सरकारचे मत आहे, असेच मानावे लागेल. कारण सध्या सरकार संघ चालवत आहे. संघाचे आदेशच सरकारला मानावे लागत आहेत. त्यामुळे भागवत हे एकप्रकारे मोदींचे बॉस आहेत आणि संघ हा सरकारवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. ते नाकारता येणार नाही. त्यामुळे भागवतांची मते आजच्या परिस्थितीत नवा वाद निर्माण करीत आहेत आणि वाद निर्माण केल्यावर पुन्हा आपण असे बोललोच नाही, आपल्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, असे सांगतात. असे हे दुटप्पी लोक आहेत. संघ दुटप्पी आहे. सरसंघचालक दुटप्पी आहे. भागवत हे दुटप्पीच आहेत.
खोटं बोलू नका काहीपण….. जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा.. संघाचं एकात्मता स्तोत्र Wikipedia वर बघा… खाली लिंक दिली आहे…
एकात्मता स्तोत्र म्हणजे तुमच्या भाषेत प्रात: स्मरण….
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
या आहेत एकात्मता स्तोत्र च्या काही ओळी…
दादाभाई गोपबंधुः टिळको गांधी रादृताः
रमणो मालवीयश्च श्री सुब्रमण्य भारती ॥२९॥
या ओळींमध्ये महात्मा गांधी यांचं नाव आहे…
सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः
ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरुः ॥३०॥
या ओळींमध्ये पूज्य भीमराव आंबेडकर, महात्मा फुले, स्वतंत्रवीर सावरकर यांचं नाव आहे…