‘‘मराठा समाजातील गोरगरीब तरुणांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळवून देऊन त्यांच्या विकासाच्या वाटा नारायण राणेसाहेब यांनी मोकळया केल्या होत्या.
मुंबई- ‘‘मराठा समाजातील गोरगरीब तरुणांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळवून देऊन त्यांच्या विकासाच्या वाटा नारायण राणेसाहेब यांनी मोकळया केल्या होत्या. मात्र राज्यातील सरकार बदलले आणि हे हक्काचे आरक्षण रद्द झाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी या सरकारची मानसिकता आहे. आपले हक्काचे मराठा आरक्षण मिळवायचे असेल तर पेटून उठा’’, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी रविवारी नाशिक येथे मराठा समाजाच्या स्वाभिमानाचा अंगार फुलविला. मराठा समाज एकत्र येत नसल्याने आपल्यावर ही वेळ आली आहे. सर्व मतभेद विसरून मराठा आरक्षणासाठी एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले.
नाशिक येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, अविनाश खापे, सतीश चव्हाण, डॉ. संदीप कोतवाल हे उपस्थित होते. यावेळी बोलताना नितेश राणे पुढे म्हणाले, मराठा समाजाला नारायण राणे साहेब यांनी आरक्षण मिळवून दिले.
परंतु या सरकारने ते हिसकावून घेतले. ते आता आपण पुन्हा मागत आहोत. पण हे सरकार देणार आहे का? या सरकारची तशी मानसिकता आणि इच्छा आहे का? मराठा आरक्षणाची घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने केली तेव्हा ज्यांनी विरोध केला तेच आज सत्तेत आहेत. म्हणूनच ते जाणीवपूर्वक आपल्या आरक्षणाच्या आड येत आहेत.
महाराष्ट्रात ३२ टक्के मराठय़ांची एकी झाली तर या सरकारला खूप जड जाईल याची जाणीव त्यांना आपल्या एकीने करून दिली पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले.
मराठा आरक्षणाची चळवळ विशाल रूप धारण करीत आहे, असे दिसताच कार्यकर्त्यांना वेगवेळया मार्गाने धमकावले जात आहे. शांत बसविले जात आहे. याचे काय करायचे याचा विचार करा. आज फक्त धमकावत आहेत, असेच नेभळाटासारखे राहिला तर उद्या ते तुमच्या घरापर्यंत येतील. त्याचे काय करायचे याचाही विचार करा.
काही लोक मराठा समाजाच्या नावाने पद मिळवित आहेत. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. ज्यांनी मराठा आरक्षण चळवळीचे नाटक केले ते विनायक मेटे आज सरकारमध्ये जाऊन थंड बसले आहेत. ते मेटे नाही तर चाटे आहेत. आता केवळ मागून चालणार नाही, आंदोलन करून भागणार नाही तर आपल्या हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येक मराठा तरुणाने पेटून उठले पाहिजे, अशा शब्दात नितेश राणे यांनी मराठा तरुणांना प्रेरणा दिली.
मराठा आरक्षण पाहिजे हे आजची गरच आहे ………………………………………………………………
मराठय़ांची एकी झालीच तर पाहिजे