शिवसेना-भाजपा युतीचा घोळ अखेर मिटला असला तरी शिवसेनेत घडलंय-बिघडलंय नाटय़ सुरू झाले आहे.
मुंबई – विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यापासून होणार होणार म्हणून सुरू असलेला शिवसेना-भाजपा युतीचा घोळ अखेर मिटला असला तरी शिवसेनेत घडलंय-बिघडलंय नाटय़ सुरू झाले आहे. युती घडली मात्र शिवसेना बिघडली, अशी सध्या स्थिती आहे. जनतेने निवडून दिलेल्या शिवसेनेच्या ६३ आमदारांऐवजी जनतेने नाकारलेल्या तसेच मागच्या दाराने आमदार झालेल्या चार जणांना कॅबिनेट मंत्रीपदे मिळण्याच्या शक्यतेमुळे शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर धुसफूस सुरू आहे.
शिवसेनेला मिळणा-या पाच कॅबिनेट मंत्रीपदांवर शिवसेनेकडून दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या पाचपैकी केवळ एकनाथ शिंदे हे लोकांतून निवडून आलेले आहेत. सुभाष देसाई तर या वेळी निवडणूक हरले आहेत. त्यामुळे, ज्यांना स्वत:ला निवडून येता येत नाही, ते पक्ष काय बळकट करणार, असा सवाल निवडून आलेल्या सदस्यांकडून विचारला जात आहे. तसेच, नीलम गोऱ्हे यांनीही कधीही निवडणूक लढवलेली नाही. बाहेरून आल्या आणि तिखट झाल्या अशी त्यांची गत आहे. तरी, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद का, असा प्रश्न निर्माण करत दबाव वाढतोय. त्यामुळे, शेवटच्या क्षणी त्यांच्याऐवजी विजय शिवतारे किंवा विजय औटी यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागून गो-हेबाईंना राज्य मंत्रीपदावर समाधान मानावे लागेल, असेही समजते. मिळणा-या ७ राज्यमंत्रीपदांचे वाटप विभागवार करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यात सर्वात कसोटी कोकणातून आणि मुंबईतून निवड करताना लागणार आहे.
कोकणात शिवसेनेला चांगले यश मिळाले असले तरी निवडून आलेल्या उमेदवारांपैकी मंत्रीपदाच्या पात्रतेचा एकही उमेदवार नाही. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे दोघे दावा सांगत असले तरी ते नुकतेच राष्ट्रवादीतून आले आहेत. बाहेरून आलेल्यांना संधी दिल्यास जुने शिवसैनिक नाराज होतील. त्यामुळे, महाड मतदारसंघातून निवडून आलेले भरत गोगावले यांची वर्णी लागू शकते. मुंबईनेही शिवसेनेला चांगली साथ दिलेली आहे. परंतु कॅबिनेट मंत्रीपदी ज्यांची नावे चर्चेत आहेत, ते सर्व विधान परिषद सदस्य मुंबईत राहणारे आहेत. म्हणूनच मुंबईतून निवडून आलेल्या आमदारांपैकी रवींद्र वायकर, सुनील प्रभू, सदा सरवणकर आदी नेते नाराज आहेत. तर, दीपक सावंत आणि अॅड. अनिल परब हे विधान परिषद सदस्यही राज्यमंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून धडपडत आहेत. कोल्हापूरमधून सुजित मिणचेकर आणि राजेश क्षीरसागर यांच्यात स्पर्धा आहे, तर पुणे परिसरातून विजय औटी आणि विजय शिवतारे यांच्यात स्पर्धा आहे. विदर्भातून संजय राठोड यांना संधी मिळण्याची शक्यता असून मराठवाडय़ातून अर्जुन खोतकर इच्छुक आहेत. मंत्रीपदे बारा आणि इच्छुक बाराशे असल्याने शिवसेनेतील असंतोषाचा ज्वालामुखी फुटीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.
शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी तीन दिवस अगोदर म्हणजे ५ डिसेंबर रोजी विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी विधान भवनाच्या प्रांगणात होणार आहे. राज्य दुष्काळात होरपळत आहे. शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी फडणवीस यांचे सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तारात गुंतले आहे आणि त्यावर कोटय़वधी रुपये खर्च केला जाणार असल्याचे समजते. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता २२ मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजते.
आहो,सेनेचे आमदार ६३ आणि मंत्रिपदे ८ ते १० म्हणजेच इतर आमदार नाराज होणारच आणि हेच तर पाहिजे बिजेपिवाल्याना ,म्हणजेच जे नाराज आमदार आहेत ते काही वेळेने बीजेपी मध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही ,म्हणजेच बिजेपिची चाल यशस्वी होत आहे.सेनेचे नाराज आमदार बिजेपिवले फोद्णारच .