कोकणचे भूमिपुत्र असल्याने पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या कृपाशीर्वादाने व अंत:प्रेरणेमुळे नारायण राणेंकडून हे ऐतिहासिक कार्य घडले असावे, अशा शब्दात सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी राणेंच्या कार्याचा गौरव केला.
सावंतवाडी- १९६१ साली महाराष्ट्र राज्य स्वतंत्रपणे अस्तित्वात येऊन स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. शंकरराव चव्हाण यांच्यासारखे समाजाची जाण असणारे बुर्जग मंत्री महाराष्ट्राला लाभूनही मराठा समाजाच्या संपूर्ण उन्नतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्याकडून दुर्दैवाने ठोस प्रयत्न झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर कोकणचे भूमिपुत्र नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाकरिता उचललेले पाऊल विशेष लक्षणीय आहे. कोकणचे भूमिपुत्र असल्याने पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या कृपाशीर्वादाने व अंत:प्रेरणेमुळे नारायण राणेंकडून हे ऐतिहासिक कार्य घडले असावे, अशा शब्दात सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी राणेंच्या कार्याचा गौरव केला. सावंतवाडी राजवाडय़ात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
ऐतिहासिक व धडाकेबाज निर्णयास ख-या अर्थाने श्रेय द्यावयाचे असेल, तर त्यास सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री नारायण राणे हेच सर्वतोपरी पात्र आहेत. मात्र असे असतानाही अवघ्या महाराष्ट्रातच आणि त्याही पेक्षा त्यांच्या कोकण कर्मभूमीतही त्यांचे म्हणावे तसे कौतुक झाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण यांनी अंत्यत बारकाईने अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण का द्यावे, आरक्षण नसल्याने समाजाची प्रगती कशी खुंटली आहे याचा परिपूर्ण अहवाल सरकारला देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासनाला भाग पाडले. मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत या समिती अहवालाचा र्सवकष विचार करून मराठा समाजास १६ टक्के आरक्षणास मान्यता देण्यात आली. त्यानंतर ९ जुलै रोजी सरकारद्वारे शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. घटनेतील तरतुदींचा अभ्यास करूनच सदरहू आरक्षण लागू केल्याने भविष्यात मराठा समाजातील युवा वर्गास नोकरी व व्यवसायांच्या संधीचा मार्ग यामुळे सुलभ झालेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या या ऐतिहासीक कामगिरीमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे क्रम प्राप्त ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा सुरू असूनही आरक्षण समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास मंत्रिमंडळातील एकाही मराठी नेत्याने तयारी दर्शवली नव्हती. याचवेळी कोकणचे सुपुत्र असलेल्या नारायण राणे यांनी समितीचे हे अध्यक्षपद स्वीकारले व अभ्यासपूर्ण अहवालाद्वारे ते शासनास देणे भागही पाडले. यामुळे ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्यासारख्या धडाधडीच्या नेत्याकडे हा प्रश्न सोपविल्यानेच अस्सल मराठा आत्मियतेने त्यांनीही इतर समिती सदस्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून हा प्रश्न तडीस लावण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले. चिकित्सक अभ्यास, आरक्षणाच्या संदर्भात विविध न्याय निवाडे, समित्यांचे अहवाल, यांचे समग्र वाचन, मनन व चिंतन आणि कायदेशीर सल्लागारांचा योग्य सल्ला घेऊन प्रदीर्घ विचारमंथनाच्या माध्यमातून आपला परिपूर्ण अहवाल राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारकडे सुपूर्द केला. त्याचाच परिपाक म्हणून २५ जून २०१४ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण शासनाकडून जाहीर झाले. मात्र, त्याबाबतची म्हणावी तशी दखल समाजाने घेतली नाही. त्यासाठीच राणे यांच्यामुळे लाभलेल्या या आरक्षणाचे सर्वागिण स्वरूप व सर्वस्तरीय लाभाचे स्वरूप मराठा समाजातील प्रामुख्याने युवा वर्गास व बुजुर्गाना सुलभपणे परिचित व्हावे, याकरिता श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे ‘मराठा आरक्षण स्वरूप व अंमलबजावणी’ या विषयावर लवकरच तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राजमातांनी यावेळी दिली. यावेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्रीपंचम खेमराज महाविद्यालय संस्थेचे सचिव प्रा. मोहनराव देसाई, प्रा. जी.ए. बुवा आदी उपस्थित होते.
राणे साहिबांचे आभार शब्दात मांडू शकत नाही केलेले काम खूप मोठे आहे.