भारतात जन्माला आलेले सर्व धर्म हे अत्यंत उदारमतवादी आणि सहिष्णू आहेत. ते कधीही इतर धर्मियांना कमी लेखत नाहीत.
भारतात जन्माला आलेले सर्व धर्म हे अत्यंत उदारमतवादी आणि सहिष्णू आहेत. ते कधीही इतर धर्मियांना कमी लेखत नाहीत. सत्य केवळ एकाच काळात आणि एकाच व्यक्तीला प्रकट करण्यात आले आहे आणि तेही केवळ अमुकच मार्गाने इतर व्यक्तींना उपलब्ध होऊ शकते असा विश्वास बुद्धिवादी भारतीय धर्मपरंपरेत बसत नाही.
कोणत्याही भारतीय मुळाच्या धर्माचा स्वत:च्या बाबतीतसुद्धा कधीही असा दावा नसे की केवळ याच धर्माद्वारे मानवजातीचे कल्याण शक्य आहे. त्यामुळे आपल्या धर्माचा प्रसार हा भारतीय धर्मसंस्थापकांना कधीही आवश्यक वाटला नाही.
जैन, शीख, लिंगायत, बुद्ध किंवा हिंदू धर्माच्या धर्मगुरूंनी कधीही धर्मप्रसार हे आपले ध्येय मानले नाही. त्या सर्वानी जगाला नक्कीच एक नवा विचार दिला, अंतिम सत्य काय आहे या प्रश्नांची स्वतंत्र आणि वेगळी उत्तरे शोधली, नवनव्या आणि प्रसंगी जुन्या विचारांचीही कालसुसंगत अशी नवी स्वतंत्र मांडणी जरूर केली. तिचे निवेदनही केले, मात्र धर्मप्रसार हा भूमिका म्हणून त्यांना गरजेचा वाटला नाही. कारण सत्यापर्यंत पोहोचायचे एकापेक्षा अधिक मार्ग असू शकतात या भारतीय उदारमतवादी विचारांवर सर्वाचीच दृढ श्रद्धा होती. या पार्श्वभूमीवर भारतात जन्माला येऊही संपूर्ण आशिया खंडात पसरलेला भगवान बुद्धांचा बुद्ध धर्म एक आगळावेगळा विक्रम निर्माण करून गेलेला दिसतो.
तथागत भगवान बुद्धांना सत्य सम्यकज्ञान झाल्यावर हा धर्म अनेक राजांनी आणि सम्राटांनी त्यांचेकडून स्वत:हून स्वीकारला. एवढेच नाही तर तो संपूर्ण जगभर पसरला. आज तर पाश्चिमात्य देशात सर्वात जास्त आकर्षण ज्याबद्दल आहे तो भारतीय मुळाचा धर्म म्हणजे बुद्धधर्म ! कारण बुद्ध धर्म निर्माण झाला तो कोणत्याही ईश्वरी योजनेने नव्हे तर एका मुमुक्षू राजाच्या हृदयात दाटून आलेल्या मानवजातीविषयीच्या पराकोटीचीच्या करुणेतून ह्या धर्माची निर्मिती झाली. त्यामुळे नव्या प्रगत, विद्याननिष्ठ समाजाला चटकन भावू शकणारा हा धर्मविचार आहे. म्हणूनच पाश्चिमात्य जगाला त्याचे आकर्षण वाटते.
ईश्वराला वजा करून निर्माण झालेला धर्मविचार
बुद्ध धर्माचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हा ईश्वराची पारंपरिक संकल्पना नसलेला धर्म आहे. या धर्मात चक्क ईश्वरच नाही! त्यामुळे ईश्वराचे दलाल म्हणून काम करणारे पुरोहित आणि त्यांनी केलेले भोळ्याभाबडया समाजाचे शोषण नाही, सतराशे साठ दैवते आणि त्यांची व्रतवैकल्ये, गंडेदोरे, माणसावर येणा-या संकटावरचे अघोरी उपाय, शिवाय जातींची विषमतावादी उतरंड या धर्मात नाही. निखळ ज्ञानार्जनाशिवाय दुसरी कोणतीही उपासना नसल्याने चमत्कार किंवा कोणत्याही अंधश्रद्धांना वाव नाही. खरे तर बुद्ध धर्म हा भारतात जन्माला आला ही भारतासाठी अत्यंत अभिमानाचीच बाब आहे.
तथागत गौतम
चंद्रगुप्तांचा नातू आणि राजे बिम्बिसार यांचा पुत्र असलेल्या सिद्धार्थ गौतमांचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ साली सध्याच्या नेपाळमधील लुम्बिनी नगरीत झाला. योग्य वेळी विवाह होऊन त्याने राज्यकारभाराबरोबर स्वत:चा संसारही सुरू केला. मात्र एका दिवशी या तरुण आणि अत्यंत संवेदशील राजपुत्राला एक असहाय्य वृद्ध मनुष्य दिसला, त्यानंतर त्याला त्याच दिवशी एक प्रेतयात्रा दिसली आणि त्याचे मन विचारात खोल गढून गेले.
मानवी जीवनात दु:ख का आहे, आजार, वार्धाक्य, मृत्यू का आहेत? अशा अनेक मूलभूत प्रश्नांनी त्याच्या करुणामय मनाला चिंतेत टाकले. मग तरुण सिद्धार्थ सर्वाना या प्रश्नांची उत्तरे विचारू लागला. जाणते विचारवंत आपापल्या परीने उत्तरे देऊ लागले. मात्र अत्यंत प्रखर बुद्धी असलेल्या सिद्धार्थाचे पारंपरिक उत्तरांनी अर्थातच समाधान झाले नाही आणि मग त्याने सत्य शोधण्यासाठी आपले राज्य, सुंदर, सुशील पत्नी, पुत्र राहुल या सर्वाचा त्याग करून केवळ स्वत:चे घरच नाही तर अलिशान राजमहाल एका क्षणात सोडून दिला.
सत्याच्या शोधात भगवान तथागताने तपश्चर्या केली आणि एका पिंपळाच्या झाडाखाली वयाच्या २९व्या वर्षी त्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले. तोच बुद्ध धर्म. भगवान बुद्धाने सत्य शोधून काढल्यावर आपले तत्त्वज्ञान जगापुढे मांडले.
भारतातील अनेक राजांनी त्याचा विचार स्वीकारला. सुरुवातीस केवळ ५ अनुयायांनी सुरू झालेला बुद्ध धम्मविचार मग सम्राटांचा आणि साम्राज्यांचा अधिकृत धर्म झाला. जातीयवाद, पुरोहितांचे पाखंड आणि शोषण याला विटलेला मोठा समाज बौद्धमय झाला.
सम्राट अशोक राजाने किलगाची म्हणजे सध्याच्या ओडिशा राज्याची लढाई जिंकल्यावर त्या युद्धात झालेला नरसंहार पाहिला, त्याला आपल्या कृत्याचा टोकाचा पश्चाताप झाला आणि त्याने जगाला सत्य, अिहसा आणि शांतीचा संदेश देणा-या बुद्ध धर्माचा विचारपूर्वक स्वीकार केला. तो इतकेच करून थांबला नाही तर त्याने आपल्या मुलालाही भिक्खू केले. त्याच्या पुत्रानेच पित्याचा नवा धर्म श्रीलंकेत नेला. आज श्रीलंकेचे बहुसंख्य लोक बौद्ध आहेत.
विचाराने पसरलेला धर्म
सम्राट अशोकाने अगदी इजिप्त, ग्रीसपर्यंत आपल्या भिक्खूंना पाठवून तथागताचा समता, शांती आणि अिहसेचा उदात्त विचार पश्चिमेत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. थायलंडमध्ये तर प्रस्तुत लेखकाला तेथील स्थानिक बौद्ध लोकांनी सांगितले की त्याकाळी सम्राट अशोकाच्या सुराज्याची इतकी कीर्ती सगळीकडे पसरली होती की थायलंडच्या तत्कालीन राजाने निमंत्रण पाठवून स्वत:हून अशोकाचे मांडलिकत्व स्वीकारले होते.
पूर्वेकडील असंख्य देश पूर्णत: बौद्धमय होऊन गेले, ते तथागताच्या बुद्धिवादी विचारधारेमुळे! चीन, जपान, कंबोडिया, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड असे अनेक देश बुद्धाचा विचार घेऊन पुढे गेले. आज तिथे आपल्याला भगवान बुद्धाच्या भारतापेक्षा मोठया, काही ठिकाणी तर शुद्ध सोन्याच्या मूर्ती आणि पॅगोडा दिसतात.
भगवान बुद्धाची शिकवण काय होती? आणि समुद्रप्रवास हेही पाप मानणारी भारतीय परंपरा सोडून जगभर पसरू शकणा-या या जबरदस्त विचाराची ताकद कशात होती? कशामुळे हा सर्वात आधुनिक विचार देणारा धर्म भारतातून पुढे लुप्त झाला होता अलीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी कशामुळे त्याचेच पुनरुज्जीवन केले हे पुढील लेखात पाहू या.
बाबारे सिद्दार्थ गौतम हा शुद्धोधन जो शाक्य कुलीन होता त्याचा पुत्र होता….मग ब्लॉग मध्ये चंद्रगुप्ताचा नातू आणि बिंबिसाराचा पुत्र काय भांग खाऊन लिहिलंय का?