पावसाळा सुरू झाला की लगेचच कोकणात भातशेतीसह इतर शेती उत्पादनांच्या कामांना सुरुवात होते.
सिंधुदुर्ग- पावसाळा सुरू झाला की लगेचच कोकणात भातशेतीसह इतर शेती उत्पादनांच्या कामांना सुरुवात होते. गावोगावच्या शेतात शेतकरी कधी एकटा तर कधी सहकुटुंब, शेजारपाजा-यांसह राबताना दिसतो. या भूमिपुत्रांसोबत अनेकदा नेहमीच्या वापरातील कपडय़ांसहित चिखलात बिनधास्त वावरणारे युवक-युवतीही दृष्टीस पडतात. साहजिकच पाहणा-यांची नजर वळते आणि ज्यांना हे माहीतच नसते, त्यांना कुतूहल निर्माण होते.
ही मंडळी असतात दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत विविध कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी मंडळी. या विद्यार्थिनी कृषिकन्या बनून शेतक-यांच्या शेतबांधावर पोहोचतात. शेतक-यांना शेतीविषयक विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान केले जाणारे शेतीकाम, मशागत शिकवतात.
याद्वारे शेतक-यांना त्यांच्या कामात मदत होतानाच त्यांच्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचेल, शेतक-यांना शास्त्रोक्त माहिती मिळेल आणि भविष्यात शेतकरी मिळालेल्या मार्गदर्शनाचा वापर करून पुढे शेतीत प्रगती करतील. कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीत भर घालून सुखी होतील, हा या मागचा हेतू.
मात्र या कृषिकन्यांसाठी ही प्रात्यक्षिके म्हणजे त्यांच्या अभ्यासक्रमातील आर्टिकल असतात. योग्य पद्धतीने माहिती दिली की नाही यावर त्यांची पुढील वाटचाल ठरत असते. त्यानुसार अणाव गावातील कृषिकन्यांनी परिसरातील शेतक-यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
चैनीची सवय, मोबाईल टॅब हातात अशा काही शहरी संस्कृतीच्या मुलांना शेतात काम करणे सोडाच पण हातापायांना साधी माती लागली तरी त्यांचा जीव जातो. अशांना कपडे खराब होऊन चालत नाहीत. ऊन-पावसात कंबर मोडून काम करणे तर त्यांच्या जीवावर येत. मात्र या कृषिकन्यांचे असे काही नसते. ही मंडळी गरीब कुटुंबातील असतात. तशीच यातील काही पैसेवालीही असतात.
मात्र असे पैसेवाले कृषिकन्या केवळ शेतीची आवड शेतीविषयक पूरक व्यवसायांची आवड म्हणून या क्षेत्राकडे वळतात. अभ्यासक्रमाचा भाग असल्याने शेती करण्याची सवय त्यांना लावून घ्यावीच लागते आणि ते तशी सवय लावूनही घेतात. अगदी बिनधास्त, सध्या अणाव येथे कृषिकन्यांकडून शेतक-यांना मातीचे परीक्षण धडे दिले जात आहेत. माती परीक्षण करणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व कृषिकन्यांकडून शेतक-यांना पटवून देण्यात आले.
कृषिकन्यांनी अणाव गावातील शेतकरी विश्वनाथ राणे, सुरेश बांबुळकर, मोहन परब, विठ्ठल परब, सुधाकर आपटे, राठीवडेकर यांच्या शेतात माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवून मातीचे नमुने गोळा केले. हे करत असताना या मुलांच्या चेह-यावर कुठे कमीपणाची भावना नव्हती की शेतात काम करताना कुठेही संकोच नव्हता. आपल्या घरची शेती कामे असल्यासारखी ही सारी मुले वावरताना ओरोस येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांकडून विविध बियाण्यांची बिजांकुरण क्षमता कशी पडताळून पाहावी याचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली.
तसेच बियाणी खरेदी करताना बियाण्यांची प्रतवारी बियाण्यांबरोबर मिळणा-या बियाण्यां विषयीच्या माहिती पुस्तकाचे वाचन कसे करावे? त्यामधून आपल्याला कोणती माहिती मिळते, याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भात शेती आधुनिकीकरण सध्या महत्त्वाचे आहे. शास्त्रीय पद्धतीने बीजप्रक्रिया कशी करावी, त्याचे फायदे काय आहेत, बीजप्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
कृषिकन्या दीप्ती कदम, स्नेहल ब्रीद, राणी खांडेकर, चेतना लेंदे, सुजाता शिंदे तसेच शेतकरी सहभागी झाले होते. शेतक-यांनी या वेळी कृषी कन्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या सर्व शंकानिरसन करण्यात कृषिकन्या कुठेही कमी पडल्या नाहीत. ज्या ठिकाणी त्यांचीही अडचण झाली तेथे त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना मदत केली हे करत असताना या कृषिकन्यांच्या ठायी असलेला उत्साह पाहण्यासारखा होता.
कृषिकन्यांकडून शेतक-यांना हिरवळीच्या खताचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मात्र शेतीत आधुनिकीकरण करून उत्पादन कसे वाढवता येईल. या प्रात्यक्षिकादरम्यान यांत्रिक पद्धतीने चिखलणीचे प्रात्यक्षिक दाखवत कृषिकन्यांनी कमी वेळात जास्त लावणी हे करत असताना कृषिकन्यांनी आधुनिक पण अवजड असणारी पॉवर टिलरसारखी यंत्रे शेतात लीलया चालवली.
भूमिपुत्रांना शेतात नांगरणी करताना किती कष्ट पडतात हे चांगले ठावुक असते. अशाच पद्धतीने कृषिकन्या शेतात पॉवर टिलरसारख्या यंत्राने नांगरणीसह शेतीची इतर कामे करू लागल्या आणि उपस्थित शेतकरी कृषिकन्यांकडून सहजपणे केले जाणारे काम पाहून सगळेच थक्क झाले. याशिवाय छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथील कृषिकन्यांकडून भातशेती पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले.
चारसूत्री भातशेती (सीराटेक) कशी करावी आणि उत्पादन कसे वाढवावे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रात्यक्षिकात कृषिकन्या दीप्ती कदम, स्नेहल ब्रीद, राणी खांडेकर, चेतना लेंदे, सुजाता शिंदे यांनी प्रत्यक्ष रोप लावणी करून चारसूत्रीचे महत्त्व पटवून दिले. ही रोपे लावणी करताना कृषिकन्यांनी तर चक्क ओढणी खोवून रोपे हातात घेतली आणि चारसूत्री पद्धतीने भराभर लावणीसुद्धा केली.
प्रात्यक्षिक करताना त्यांची उडालेली लगबग आजूबाजूच्या शेतक-यांच्या औत्सुकतेचा विषय ठरला. या कृषिकन्यांनी अणाव येथील शेतक-यांच्या बागेत सेंद्रिय शेती पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच सेंद्रिय शेती केल्याने जमिनीची उत्पादनक्षमता वाढवता येते व निसर्गाचा समतोलही राखला जातो. हे शेतक-यांना पटवून दिले. या कृषिकन्यांपैकी सा-याच सिंधुदुर्गातील नाहीत.
यामध्ये दीप्ती कदम (कसाल), स्नेहल ब्रीद (ओरोस), राणी खांडेकर (कोल्हापूर), चेतना लेंदे (जेजुरी), सुजाता शिंदे (सोलापूर) अशाच प्रकारे सिंधुदुर्गातील विविध कृषी महाविद्यालयातही राज्याच्या इतर भागातून या मुली शिकायला आल्या आहेत. शिक्षणाचा भाग म्हणून या कृषिकन्या स्थानिक शेतक-यांच्या शेतात पोहोचल्या. या अभ्यासक्रमात संस्थेचे संस्थापक ब्रिगेडीअर सुधीर सावंत, प्राचार्य महेश परूळेकर, कार्यक्रम समन्वयक विजय जोईल, कृषी तज्ज्ञ बाळू गावडे, प्रा. अनुजा सोनार व इतर शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Agri