महाराष्ट्र विधानसभेने एमआयएमच्या ‘भारत माता की जय’ न म्हणणा-या आमदाराला या अधिवेशनापुरते निलंबित केले आहे. खरे तर त्यांच्या पूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दीसाठी त्यांना निलंबित करायला हरकत नाही.
‘भारत माता की जय’ न म्हणणा-या आमदाराला विधानसभेने अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात निलंबित केले आहे. आपल्या देशात ‘रिकॉल’ची तरतूद नाही. रिकॉल म्हणजे ज्या मतदारसंघातून आमदार निवडून आला त्या मतदारसंघातील मतदारांना निवडून दिलेल्या आमदाराला किंवा खासदाराला परत बोलावण्याची कायद्यात असलेली तरतूद. युरोपमधील ब-याच देशांत अशी तरतूद आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना जी सामाजिक पथ्ये पाळली पाहिजेत ती पथ्ये लोकप्रतिनिधींनी पाळली नाहीत तर मतदार त्याला परत बोलावू शकतात. म्हणजे त्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. महाराष्ट्र विधानसभेने एमआयएमच्या आमदाराला या अधिवेशनापुरते निलंबित केले आहे. खरे तर त्यांच्या पूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दीसाठी त्यांना निलंबित करायला हरकत नाही. किंवा ही निलंबनाची मुदत संपल्यानंतर पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा पुन्हा उपस्थित होऊन त्यांनी भारत मातेचा जयजयकार करण्यास नकार दिला तर पुन्हा ही कारवाई करण्यात येईल आणि ती केली पाहिजे. या देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी या देशाचा आदर करावा हे सांगण्याची गरज असू नये. देशासाठी एकनिष्ठ असावे, हे सांगण्याची गरज असू नये. ‘भारत माता की जय’ हे म्हणा असे सांगायला लागावे हेच केवढे मोठे दुर्दैव आहे! ज्याला भारतमातेचा जयजयकार करायचा नसेल त्यांनी या देशात राहू नये. राष्ट्रभक्तीमध्ये तडजोड असता कामा नये. एमआयएमचा आमदार म्हणतो माझ्यावर सक्ती करता येणार नाही. भारतमातेचा जयजयकार करण्याची सक्ती वाटत असेल तर त्याने इथे राहूच नये. या देशातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी एवढी मुजोरी करू शकतो? या देशातील लोकशाही जास्त स्वस्त झालेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशातील कोणालाही ‘मी हवा तसा वागीन’ आणि राष्ट्रीय मानचिन्हाच्या बाबतीत माझ्यावर सक्ती करू नका, हे व्यक्तिस्वातंत्र्य देणे या देशाला परवडणारे नाही. अशी माणसे टक्क्याने अगदी कमी असली तरी ही घातक प्रवृत्ती आहे. तरीसुद्धा या प्रश्नांची चर्चा ज्या पद्धतीने झाली ती चर्चा सुद्धा होऊ देता कामा नये. देशाचा जयजयकार करण्याची सक्ती माझ्यावर करू नका, असे लोकप्रतिनिधी उघडपणे सांगतोय आणि वाहिन्यावाले सातत्याने ते दाखवतात यातून काळ सोकावेल. आज एका जणाला या व्यक्तिस्वातंत्र्याचा पान्हा फुटला. यातून समाजातील काही टोळय़ा हाच मुद्दा घेतील. म्हणून आपल्या मातेच्या संदर्भात जशी कोणतीही तडजोड मान्य होणार नाही, त्याचप्रमाणे देशाच्या संदर्भात कुठलीही तडजोड मान्य होणार नाही, हे या एमआयएमवाल्यांना सांगायला हवे. या देशात जरा जास्त स्वातंत्र असल्यामुळे ओवेसी काही बोलू शकतो. मानेवर सुरी ठेवली तरी ..म्हणणार नाही, अशी भाषा या देशात करता येते. याचा अर्थ या देशाची लोकशाही जरा जास्त स्वस्त झालेली आहे. देशातील काही प्रश्नांच्या बाबत कसलीही तडजोड कधीही करता येणार नाही. भाजपाला सध्या राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रद्रोह या दोन शब्दांचा खूप मोठा सोस आहे. जे भाजपाच्या बाजूने बोलत नाहीत ते राष्ट्रप्रेमी नाहीत. जे भाजपाच्या विरुद्ध बोलतात ते राष्ट्रद्रोही आहेत, असा भाजपाने अर्थ ठरवलेला आहे. भारतमातेचा जयजयकार करणार नाही, असे म्हणणारे यांना राष्ट्रद्रोही म्हणतात. सरकारच्या चुकांमुळे सरकारवर तुटून पडणा-यांना राष्ट्रद्रोही म्हणण्याची भाजपामध्ये स्पर्धा आहे. द्रोह कुणाशी? या देशातील सरकारविरोधात बोलणे हा द्रोह असेल तर तो द्रोह करायला हजार वेळा लोक तयार होतील. सरकारविरुद्ध बोलणे वेगळे आहे आणि देशाच्या विरुद्ध बोलणे-वागणे वेगळे आहे. या दोन गोष्टींचा फरक समजून घेतला पाहिजे. हैदराबादचा ओवेसी किंवा औरंगाबादचा आमदार किंवा भायखळय़ाचा आमदार यांच्या भूमिका या घटनेला न जुमानण्याच्या आहेत. हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नये. म्हणून हा जो कोण मुजोर आमदार पठाण आहे त्याला निलंबित केले हे फार चांगले झाले. खरं तर त्याला तुरुंगाची हवा दाखवायला हरकत नाही. भारतमातेचा जयजयकार करायला नकार देणे हा गुन्हाच आहे. जी गोष्ट उत्स्फूर्त असायला हवी त्या गोष्टीला जाणीवपूर्वक विरोध करणारा माणूस तुरुंगातच जायला हवा. जिथे जिथे राष्ट्रगीत लागते.. मग ते जाहीर कार्यक्रम असोत, किंवा चित्रपटगृह असोत.. ते राष्ट्रगीत संपल्यानंतर चित्रपटगृहातील किंवा जाहीर समारंभातील नागरिक उत्स्फूर्तपणे ‘भारत माता की जय,’ घोषणा देतात. ही घोषणा द्यायला त्यांना कोणी सांगितलेली नसते. ही देशभक्तीची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. ती प्रत्येक घरात शिकवली गेली पाहिजे. आज दुर्दैवाने राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जात नाही. त्यामुळे राष्ट्रीय सण सामुदायिक सुट्टी बनवण्याचा दिवस ठरतो. त्या त्या दिवसाचे महत्त्व न समजून घेणारा जगाच्या पाठीवरचा हा एकमेव देश असावा. जगातील अनेक देशांनी आपल्या स्वातंत्र्याचा लढा तळहाताच्या फोडासारखा जपून ठेवला आहे. पण या देशातील आम्ही लोक करंटे असे आहोत की, आम्हाला १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे दिवस सुट्टीचे दिवस वाटतो. ९ ऑगस्ट हा किती मोठा क्रांती दिन आहे. पण आपल्या घरातील मुलांना, नातवांना कोणताही पालक ‘९ ऑगस्ट म्हणजे काय’ हे समजावून सांगत नाही. मुळात पालकांनाही किती माहिती आहे, हाही एक प्रश्न आहे. ज्या पिढीवर हे संस्कार होत नाहीत, त्या पिढीला देश कसा स्वातंत्र झाला हे समजणे अवघड आहे. ‘भारत माता की जय’ का म्हणायचे.. त्याच्या मागची प्रेरणा काय हे पालकांना समजले तर ते मुलांना सांगतील. ऑगस्ट क्रांतीचा लढा कसा झाला. हे सगळे अभिमानाचे विषय असताना आज त्या दिवसाचे महत्त्व आम्ही लोक जाणत नाही. मग मुलांना, तरुणांना त्याचे महत्त्व वाटत नाही. मग ओवेसी असतील किंवा पठाण असतील. हे मुजोरीने आम्ही जयजयकार करणार नाही, असे म्हणू शकतात. कारण देशभक्तीत तडजोड करण्याची मानसिकता आपण स्वीकारल्यासारखी दिसते. कसले निलंबन करता? विधानसभेत जयजयकार करण्यास नकार देणारा निलंबन झाल्यावर बाहेर आल्यानंतर जयजयकार करणार आहे का? त्याच्या भूमिकेत बदल होणार आहे का? होणार नाही. मग अमूक ठिकाणी जयजयकार न करणा-याला विधानसभेने शिक्षा दिली. बाहेर आल्यानंतर जर जयजयकार करणार नसेल तर त्याची शिक्षा काय? भायखळय़ाच्या लोकांनी आपल्या मतदारसंघातील या आमदाराला जाहीरपणे विचारले पाहिजे की, तुम्ही भारतमातेचा जयजयकार करणार आहात की नाही?
यानिमित्ताने आणखी एक चर्चा करणे गरजेचे आहे. एमआयएमची ही विषवल्ली वाढली कशी? मुस्लीम समाजाला अलग पाडणारी एक प्रकारे ही विषारी प्रचार करणारी वृत्ती याला खतपाणी घातले कुणी? एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एमआयएम संघटना उभी करण्याकरिता पैसा पुरवला कुणी? ‘ईडी’ अनेक घोटाळय़ांची चौकशी करत आहे. ईडीकडेच हा विषय सोपवला पाहिजे की, या एमआयएम संस्थेला निवडणुका लढवण्यासाठी पैसा पुरवणारे कोण? काँग्रेसच्या सर्वसमावेशक धोरणाला पाठिंबा देणारा जो मुस्लीम समाज काँग्रेसच्या सोबत होता तो समाज काँग्रेसपासून तोडल्याशिवाय काँग्रेसला पराभूत करता येणार नाही, ही राजकीय यंत्रणा कुठून सुरू झाली? त्याच्या मागे कोण आहेत? त्याला पैसा कोण पुरवतो आहे? २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि २०१४च्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीत या एमआयएमला पैसा पुरवणारे कोण? विधानसभेत जे भाजपावाले पठाणच्या अंगावर आले त्या पठाणांनी त्याच्या एमआयएमला पठाणी व्याजानी पैसे कुणी पुरवले? खरं तर व्याज न घेताच पुरवले! पण ते कुणी पुरवले? आज एमआयएमची ही मुजोरी कोणाच्या पैशावर पोसली गेली? भारतमातेचा जयजयकार करण्याच्या मुद्दय़ावर तडजोड होण्याचा प्रश्नच नाही. पण ज्या राम कदम यांनी पठाण यांना भारतमातेचा जयजयकार करायला सांगितले त्या कदम यांनी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना सांगून पैसा कुणी पुरवला, याची जरा चौकशी करून दाखवायला सांगा? तेव्हा हे भूत उभे केले कुणी याचीही चौकशी व्हायला पाहिजे.
(टीप : आमदार राम कदम यांना एक सूचना आहे की, ‘भारत माता की जय’ म्हटले जावे हा तुम्ही जो आग्रह धरलात तो योग्यच आहे. आता अधिक जोराने आग्रह धरून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी संघ शाखेवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि राष्ट्रगीत म्हटले जाईल, याचाही तेवढाच आग्रह धरा.)
आमदार राम कदम यांना विनंती , ‘भारत माता की जय’ म्हटले जावे हा तुम्ही जो आग्रह धरलात तो योग्यच आहे. आता अधिक जोराने आग्रह धरून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी संघ शाखेवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि राष्ट्रगीत म्हटले जाईल, याचाही तेवढाच आग्रह धरा.