मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती पाहून येथील मराठी भाषिक मुंबईकरांनी स्थलांतर केल्याने त्याचा काही राजकीय पक्षांना निवडणुकीत मोठा फटका बसला.
मुंबई – मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती पाहून येथील मराठी भाषिक मुंबईकरांनी स्थलांतर केल्याने त्याचा काही राजकीय पक्षांना निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे जुन्या मुंबईकरांना मुंबईत परवडणारी हक्काची घरे स्वस्तात देण्याचे आश्वासन भाजपा-शिवसेना युती सरकारकडून देण्यात आले होते.
मात्र या स्वस्तातल्या घरांची किंमत बिल्डरांच्या इशा-यावर चालणा-या फडणवीस सरकारने चक्क अर्धा कोटी रुपयांपर्यंत वाढवल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत स्वस्त घरासाठी आस लावून बसलेल्या मुंबईकरांच्या स्वप्नांचा युती सरकारकडून चक्काचूर होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याचा कारभार चालवणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईपासून दुरावलेल्या जुन्या मुंबईकरांना मुंबईत ११ लाख, तर उर्वरित राज्यात ७ लाख अशी एकूण १८ लाख परवडणारी घरे बांधून देईन, असे आश्वासन दिले होते.
सध्या मुंबईत लहान घरांच्या किमतीसुद्धा ३७ लाखांपर्यंत पोहोचल्याने म्हाडातर्फे २५ लाखांपर्यंत लहान घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र म्हाडाची घरेसुद्धा परवडणारी नसल्याने अखेर जुन्या मुंबईकरांनी आपली बिऱ्हाडे शहराबाहेरील वसई-विरार आणि पुढे पालघपर्यंत थाटली आहेत. या घरांमुळे जुने मूळ मुंबईकर मुंबईपासून दुरावले आहेत.
त्याचा थेट परिणाम मुंबईकरांच्या मतांवर सत्ता उपभोगणा-या काही राजकीय पक्षांवर होत आहे. त्यामुळे याचा फटका आपल्यालाही बसू नये, यासाठी फडणवीस सरकारने स्वस्त घरांचे गाजर जुन्या मुंबईकरांना दाखवले होते.
मात्र बिल्डर लॉबीच्या तालावर नाचणा-या मंत्र्यांना बिल्डरांना नाराज करत घरांच्या किमती कमी करणे कठीण दिसत आहे. म्हणूनच या स्वस्तातल्या ४०० ते ४५० चौ. फुटांच्या घरांसाठी किमान ५० लाख रुपये आकारण्याचा प्रस्ताव भाजपा-शिवसेना युती सरकारने तयार केल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
शिवाय, हा प्रस्ताव सरकारने मान्य करावा म्हणून काही बिल्डरांनी मंत्र्यांना हाताशी धरले असून लवकरच हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुन्हा मुंबईत परतण्यासाठी परवडणा-या घराचे स्वप्न पाहणा-या लाखो मुंबईकरांच्या स्वप्नांचा मात्र युती सरकारकडून चक्काचूर होणार आहे.
लाज कशी वाटत नाही ह्यांना गस सबसिडी च्या नावे पैसे लुटतात ६ महिने झाले तरी बँकेत सबसिडी जमा होत नाही, जनतेच्या पैश्यावर परदेशी जावून मज्जा मारायची चांगली जमते ह्यांना, सातेवरून हाकलून काढले पाहिजे, अरे मनाची नाही जनाचीतरी लाज ठेवा!