आरोपी नौसैनिकांना भारताच्या ताब्यात देण्यास नकार देण्याचा इटलीचा निर्णय भारताला मान्य नसल्याचे, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.
नवी दिल्ली- भारतीय मच्छीमारांची हत्या करणाऱ्या इटलीच्या दोन खलाशांना भारतात परत पाठवण्यास इटली सरकारने, आधी दिलेला शब्द फिरवून नकार दिला. इटली सरकारच्या या फसवणुकीचा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत त्यांचा हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. इटली सरकारशी या मुद्दय़ावर चर्चा करून या दोन्ही खलाशांना भारतात परत आणले जाईल आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
केरळमधील काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी मंगळवारी पंतप्रधानांची भेट घेतली आणि या खलाशांना भारतात न पाठवण्याच्या इटली सरकारच्या निर्णयावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांना यासंदर्भात इटली सरकारशी चर्चा करण्याचे आदेश दिले असून, या खलाशांना भारतात नक्कीच परत आणू, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. परराष्ट्र व कायदा खात्यांशी सल्लामसलत करून यातून योग्य तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इटलीच्या जहाजातील मस्सिमिलायनो लाटोरे आणि सॉल्वातोर गिरॉन या खलाशांनी केरळमधील मच्छीमारांवर सागरी चाचे समजून गोळीबार केला. त्यात दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला. या दोघांवर या प्रकरणी खटला सुरू आहे. मात्र इटलीतील सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यास जाण्यासाठी या दोघांनी परवानगी मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परत येण्याच्या अटीवर परवानगी दिली. पण त्यांना परत पाठवण्यास इटलीच्या परराष्ट्र खात्याने नकार दिला आहे. या प्रकरणी राजनैतिक तोडगा काढण्याच्या इटलीच्या आव्हानाला भारताने प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना परत पाठवणार नाही, असे इटलीच्या परराष्ट्र खात्याने सांगितले.
‘‘कोणत्या आंतरराष्ट्रीय कायद्याखाली इटली सरकारने हा निर्णय घेतला आहे, याचा आम्ही अभ्यास करत आहोत. त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल,’’ असे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी इटलीच्या भारतातील राजदूतांना परराष्ट्र खात्याने समन्स पाठवले असून, त्यांच्याशीही या प्रकरणी चर्चा करण्यात
येणार आहे.
[EPSB]
इटली पलटली, आरोपी पाठवण्यास नकार
दोन भारतीय मच्छिमारांना ठार मारल्याप्रकरणी भारतात अटक केलेले इटलीचे दोन नौसैनिक भारतात परतणार नाहीत, असा पवित्रा इटली सरकारने घेतला आहे.
[/EPSB]
हे होणारच होते. इटली या देशाच्या नावातच सगळे समजून येते की हे २ गुन्हेगार का सोडले गेले ते. खरोखर भारतीय नेत्यांनी दाखवून दिले आहे की सर्वसामान्य माणसाच्या प्राणाचे मूल्य कवडीमोल आहे ते