निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल किंवा निसर्गाच्या अद्भुत आविष्काराचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला सहयाद्रीच्या कडेकपारीतून जावे लागेल.
कणकवली– निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल किंवा निसर्गाच्या अद्भुत आविष्काराचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला सहयाद्रीच्या कडेकपारीतून जावे लागेल. सहयाद्रीच्या पायथ्याशी वसलेले नाटळ गाव तसे समृद्ध. गावात भौतिक विकासाची गंगा फार वर्षापूर्वी पोहोचली आहे. या गावातील धाकले मोहूळ आणि थोरले मोहूळ हे दोन्ही मोठया लोकवस्तीचे भाग सहयाद्रीच्या दरीत वसलेले आहेत. पावसाळ्यातील इथला निसर्गसौंदर्य कुणालाही हवंहवसं वाटणारा, या दोन्ही मोहुळाच्या पर्वत कडयावरून पांढरेशुभ्र धबधबे खाली कोसळतात. पायथ्याशी या सर्वाच्या मीलनातून नाटळची नदी तयार होते. पुढे रामेश्वर मंदिराच्या बाजूने ही नदी गडनदीला जाऊन मिळते. डोंगरातून नदीचा सुरू झालेला प्रवास काठावरच्या अनेक जातीधर्माच्या लोकांना माया देणारा असाच आहे. समृद्ध आणि संपन्न कृषीक्षेत्र या नदीकिनारी पाहायला मिळते.
नाटळ गाव हा सहयाद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांपैकी एक. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला हा गाव आज विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गावातल्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, पायवाटा, पथदीप आदी सुविधा पोहोचलेल्या आहेत. या गावातील लोकांचा भातशेती हा प्रमुख व्यवसाय. आता इथल्या तरुण मुलांनी विविध व्यवसायाच्या माध्यमातून आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे. नाटळ गावातील धाकले मोहूळ आणि थोरले मोहूळ या दोन्हीही वाडया मोठया लोकसंख्येच्या आहेत. सहयाद्रीच्या द-यात गर्द वनराई, तिथली लोकवस्ती वसलेली पाहायला मिळते. भरडी शेती करण्याच्या दृष्टिकोनातून सुपीक जमिनीच्या दिशेने लोकांनी पूर्वीच्या काळात मार्गक्रमण केले. पाण्याच्या आस-याने लोकवस्ती वसत गेली. नाटळ गावच्या मोहुळामधील ही लोकवस्ती याच उद्देशाने वसली असावी असे जाणकार लोक सांगतात. तीळ, वरी, नाचणी, बरग, डुकरी, भुईमूग, कुळीथ आदी कमीत कमी पाण्यात होणारी शेती केली जायची. कालांतराने कृषीक्षेत्रामध्ये क्रांती घडली आणि आधुनिक बी-बियाणांच्या माध्यमातून कृषी उत्पन्नात वाढ झाली. यामुळे सहयाद्रीच्या पायथ्याशी केली जाणारी ही पारंपरिक शेती आता फारच कमी प्रमाणात पाहायला मिळते. पूर्वी शेतक-यांची पाळीव जनावरे मोठया प्रमाणात होती. या जनावरांना आवश्यक असणा-या चा-याच्या दृष्टिकोनातूनही जंगलाच्या जवळपास लोक जाऊन राहू लागले. नाटळ मोहुळामध्ये सध्या भातशेतीच प्रामुख्याने पाहायला मिळते. अशा या सुपीक क्षेत्राला आणखी समृद्ध करण्याचे काम केले ते इथल्या नदीने. या नदीच्या निर्मितीत धाकले मोहूळमधल्या पर्वत कडयावरून खाली कोसळणा-या पाच ओझरांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या मोहुळात अगदी शेवटच्या टोकाला राहणारे माजी सैनिक भिकाजी सखाराम सावंत यांची भेट झाली. त्यांनी या ओझरांची काही गमतीदार नावे सांगितली.
सर्वात मोठया उजव्या बाजूने दिसणा-या ओझराला स्थानिक भाषेत ‘मुसळो ओझर’ असे म्हणतात. डोंगर माथ्यावरून कित्येक फूट खोल मुसळासारखा सरळ कोसळणारा हा धबधबा आहे. त्याच्या बाजूला ‘नागडो ओझर’ आहे. हा ओझर डोंगरमाथ्यावर सुरू होतो. तिथपासून तो खाली जेथे जमिनीला लागतो तिथपर्यंत त्याच्या आजूबाजूला एकही झाड पाहायला मिळत नाही. त्याच्या बाजूला एक छोटासा ओझर आहे. डाव्या बाजूने दुसरा असलेल्या धबधब्याला ‘पाळणो ओझर’ म्हणतात. पाळण्यासारखा झुलत-झुलत खाली कोसळणारा हा धबधबा आहे. तर डाव्या बाजूने पहिल्या असलेल्या धबधब्याला ‘उगवायचो ओझर’ म्हणतात. दाजीपूरमध्ये उगवाई मंदिराच्या मागच्या बाजूने सहयाद्रीच्या कडेकपारीतून खाली जाणारे पाणी या धबधब्याच्या माध्यमातून खाली कोसळते. पूर्वी याच धबधब्याच्या वरच्या बाजूला उगवाई नावाची वाडी होती म्हणून त्याला ‘उगवाईचो ओझर’ असे नाव पडलेले आहे, अशी माहिती भिकाजी सावंत यांनी दिली.
उगवाईवाडीमध्ये धनगर बांधवांची मोठया प्रमाणावर लोकवस्ती होती. दुभती जनावरे पाळून त्यांचे दूध नाटळ पंचक्रोशीत हे धनगरबांधव विकायचे. मेंढी पालनाच्या माध्यमातूनही आपला उदरनिर्वाह करायचे. वनविभागाच्या जाचक नियमात इथल्या रहिवाशांना त्रास होऊ लागला. आणि पुढे येथील सगळे लोक म्हैसूर येथे स्थलांतरित झाले. उगवाईवाडीच्या खाणाखुणा आजही या डोंगर माथ्यावर पाहायला मिळतात. या ओझरांच्या बाजूने डोंगर माथ्यावर कोल्हापूर जिल्हय़ात जाण्यासाठी दोन प्राचीन पायवाटा आहेत. ओझराच्या डाव्या बाजूने जाणा-या वाटेला ‘भैरीची पाज’ असे म्हणतात. या पाजेतून पूर्वी लोक राधानगरी येथून शेतीसाठी लागणारे बैल, जीवनावश्यक वस्तू आणत असत. पंढरपूरला जाणारे वारकरीदेखील याच पाजेतून ये-जा करीत असत. आजही ही पारंपरिक पायवाट चालू आहे. तर धबधब्याच्या उजव्या बाजूने जाणा-या पायवाटेला ‘टेंवजीची पाज’ असे म्हणतात. घनघोर जंगलातील ही पायवाट फारच त्रासदायक आहे. एकटा माणूस चालू शकेल अशी स्थिती या वाटेची आहे. ही वाट आजही वापरात आणली जाते. ही पाचही ओझर नाटळ नदीचे प्रमुख उगमस्थान आहे. नाटळ थोरले मोहूळ इथल्या डोंगरकडयावरून खाली कोसळणारी ओझर पायथ्याशी एकत्रित होतात. तळेवाडीतील दत्त मंदिराजवळ धाकल्या मोहुळातून येणा-या नदीला मिळतात. ही नदी पुढे नाटळच्या रामेश्वर मंदिराकडून खाली राजवाडीजवळ गडनदीला मिळते. या संगमाच्या पलीकडच्या बाजूला दारिस्ते गाव आहे. नाटळ गावचा रामेश्वर हे या भागातील प्रमुख देवस्थान आहे. गावात रामेश्वराला प्रत्येकाच्या मनात मोठे धार्मिक अधिष्ठान आहे. नाटळ गावातील विविध जातीधर्माचे लोक या नदीच्या किनारी गुण्यागोविंदाने नांदतात. दाजीपूरमध्ये प्रसिद्ध उगवाई देवीच्या समोरून खाली येत रामेश्वर मंदिराच्या बाजूने जाणारी ही नदी नाटळवासीयांसाठी उगवाई रामेश्वराची गंगाच आहे. या नदीकिनारी असलेले क्षेत्र सुपीक आणि समृद्ध आहे. डोंगर माथ्यावरून उगम पावणा-या या नदीचा प्रवास साधारणत: ८ किमीचा आहे. पावसाळ्यात खळखळणारी ही नदी उन्हाळ्यामध्ये नदीमुखाजवळचा काही भाग सोडला तर सुकून जाते. नाटळवासीयांसाठी या नदीचा प्रवास आनंदाच्या अंगणी अमृत घेऊन येणारा आहे.
सर , माझ्या नागवे गावाबतल काहीतरी लिहा , खूप चांगल बघता आणि लिहिताही.