नाटयकलेतील नावीण्याचा शोध घेऊन ती नाटके रंगभूमीवर सादर करण्यापासून तर त्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा शिबिरे घेण्याचे काम ‘आविष्कार’ ही संस्था गेल्या ४५ वर्षापासून करत आली आहे. ही संस्था आता एक वेगळा उपक्रम राबवून ‘तरुण नाटककारांच्या शोधात..’ निघाली आहे. या शोधमोहिमेसाठी पाच महिन्यांचा कार्यकाळ त्यांनी जाहीर केला आहे.
नाटकावर गंभीरपणे विचार करणारी माणसे वेगवेगळ्या उपक्रमांमधून आपल्या रंगमैत्रीची विण घट्ट करत असतात. अशाच नाटयवेडया माणसांची एक संस्था म्हणजे आविष्कार. या नाटय संस्थेने आजवर वेगळ्या आशया-विषयावरची नाटके निर्मित करून ती रंगभूमीवर आणली. प्रायोगिकता हा या नाटकांचा आत्मा राहिला आहे. असे प्रयोगशील असंख्य नाटककार आजही लिहिताहेत.
वेगवेगळ्या रंगजाणिवा नव्या कलाकृतींतून मांडण्याची ताकद त्यांच्यात आहे. मात्र ते लेखक कुणीतरी शोधले पाहिजे. त्यांच्या लेखनकौशल्याची पारख झाली पाहिजे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले पाहिजे. त्यातून त्यांचा हुरूप वाढेल हा आशावादी दृष्टिकोन ठेवून ‘आविष्कार’ आता नाटककारांच्या शोधात निघाली आहे.
प्रयोगशील नाटयनिर्मिती, विविध नाटयप्रशिक्षण आणि अन्य कार्यशाळा आयोजित करण्यासाठी ‘आविष्कार’ने आपली वेगळी प्रतिष्ठा कमावली आहे. गेल्या ४५ वर्षात या नाटयसंस्थेने महाराष्ट्रात नाटयजाणिवा प्रगल्भ करण्यात तसेच नाटकाच्या सर्वागांमध्ये नव्या पिढया तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. याच परंपरेतील ‘नाटककाराच्या शोधात..’ हे आविष्कारचे पुढचे पाऊल म्हणावे लागेल.
कार्यशाळेतून नाटककार शोधण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहेच. त्यातही दुबेंच्या शाळेचा आजही वेळोवेळी उल्लेख होत असतो. त्यानंतर थिएटर अकादमीने निवडक लेखकांना लिहिते करून त्यांना घडवले. त्यातले प्रशांत दळवी, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, मकरंद साठे, जयंत पवार आदी त्या कार्यशाळेतील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची नाटयक्षेत्रातील कारकीर्द प्रयोगशील नाटककार म्हणून नाटयक्षेत्रात चमकली आहे. अगदी अलीकडच्या १५ वर्षापासून प्रेमानंद गज्वींनी बोधी नाटय परिषदेच्या माध्यमातून नव्या नाटककारांना शोधण्याचा उपक्रम सुरू आहे. या कार्यशाळेत सुमारे सव्वाशे नाटकांचे वाचन करून, त्यातील काही लेखक नाटककार म्हणून लिहिते झाले आहेत.
त्यात सिद्धार्थ तांबे (जाता नाही जात), अरुण मिरजकर (निब्बाण), अशोक हांडोरे (एतं बुद्धानं शासनं), भगवान हिरे (साधू), स्वप्नील गांगुर्डे (‘कॅनव्हास’ हे नाटक मिलिंद इनामदार यानी ‘तो अलबेला’ नावाने दिग्दर्शित करून व्यावसायिक रंगभूमीवर आणले.), आशुतोष पोद्दार (एफ १/१०५), सांध्य (चौकट) अशा काही नाटककारांच्या नावाचा उल्लेख करता येईल.
बोधीच्या या कार्यशाळेच्या निमित्ताने अनेक प्रसिद्ध नाटककारांनीही आपल्या संहिता वाचल्या. त्यातून नवीन लेखकांचा हुरूप वाढला. नाटयक्षेत्रात नाटयवाचनाची एक चळवळ म्हणून गज्वींनी हा उपक्रम राबवला आहे. अलीकडेच मुंबई विद्यापीठाच्या थिएटर ऑफ अकादमी आर्टच्या वतीने प्रा. वामन केंद्रे, डॉ. मंगेश बन्सोड, शफाअत खान, मिलिंद इनामदार यांच्या टीमने काही नाटककार निवडून त्यांच्याकडून नाटकं लिहून घेतली होती.
अशी ही नाटयलेखनासंदर्भात वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करण्याची परंपरा आहेच. लेखन ही स्वयंभू प्रक्रिया आहे किंवा लेखक जन्मावाच लागतो असे म्हटले जाते. हे जरी खरे असले तरी प्रशिक्षणाने त्या-त्या कलेतील जाण, सखोल दृष्टिकोन आणि तंत्र सुयोग्य पद्धतीने विकसित करता येते, हे आजवर झालेल्या कार्यशाळांनी सिद्ध झाले आहे. याच भूमिकेतून आविष्कारने तरुण नाटककार घडवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
ही कार्यशाळा जून ते ऑक्टोबर २०१५ अशी ५ महिने चालणार आहे. या कालावधीत एकूण पाच टप्पे असणार आहेत. त्यात पहिला टप्पा व्यक्तिगत मुलाखतीचा असणार आहे. दुसरा आणि तिसरा टप्पा : ३ ते ५ दिवसांचे निवासी शिबिराचा असेल. चौथा अवलोकन आणि पाचवा टप्पा : ३ ते ५ दिवसांचे निवासी शिबिर असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
व्यक्तिगत मुलाखतीसाठी निवड झालेल्या प्रवेशकर्त्यांना मुंबईत यावे लागेल आणि त्यासाठीचा प्रवास, निवास, भोजन खर्च स्वत: करणे बंधनकारक असेल. अंतिम निवड झालेल्या प्रवेशकर्त्यांचा कार्यशाळेच्या पुढील टप्प्यांवरील प्रवास, निवास, भोजन खर्च आविष्कारतर्फे करण्यात येणार आहे.
मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, दिग्दर्शक प्रदीप मुळय़े, प्रख्यात नाटककार शफाअत खान व जयंत पवार हे या कार्यशाळेचे संचालक आहेत. या तिघांसह इतर तज्ज्ञांची समिती निवडप्रक्रियेत काम करणार आहे. आवश्यकतेनुसार इतर नाटककार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत.
ही एक नियोजनबद्ध मोहीम आहे. यात कोण सहभागी होऊ शकेल, त्यासाठीची अट काय राहणार आहे, याचे सर्व नियोजन ‘आविष्कार’ने तयार केले आहे. या नियमावलीनुसार सदर कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आजवर किमान एक स्वतंत्र एकांकिका किंवा दीर्घाक किंवा नाटक लिहिले असणे आवश्यक आहे. हे लेखक, लेखिका २५ ते ३० वयोगटातील असावे. कार्यशाळेच्या सर्व सत्रांमध्ये सहभागी होणे बंधनकारक असेल.
आजवरच्या स्वत:च्या स्वतंत्र लिखाणातील कोणत्याही एका एकांकिका किंवा दीर्घाक किंवा नाटकाची एक प्रत, त्यासोबतच नव्या एकांकिका किंवा दीर्घाक किंवा नाटकाची संकल्पना awishkar@awishkartheatre.com या मेल आयडीवर थोडक्यात लिहून पाठवणे बंधनकारक आहे.
ई-मेलमध्ये स्वत:चे नाव, पत्ता, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक यांचा उल्लेख आवश्यक. तसेच आपल्या विभागातील नाटयकलेशी संबंधित एका प्रसिद्ध व्यक्तीचे संदर्भपत्र जोडणे बंधनकारक आहे. ही माहिती १० जून २०१५ पर्यंत पोहोचणे आवश्यक. या सोबतच पुढील प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. त्यात आवडते लेखक आणि नाटककार, आवडती-नावडती नाटके, अलीकडे पाहिलेले नाटक, अलीकडे वाचलेल्या पुस्तकांची नावे, नाटक लिहावेसे का वाटते? या विषयी अधिक माहितीसाठी ०२२ २४४४५८७१ (सायं. ६ ते ९) येथे रंगमित्रांना संपर्क साधता येईल. संस्थेच्या www.awishkartheatre.com या संकेतस्थळावरही माहिती मिळू शकेल.
स्तुत्य उपक्रम! या उपक्रमामुळे भविष्यात निश्चित नवीन विषयांवरची नाटके पाहायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही.