पती-पत्नीचं नातं नेमकं कसं असतं, त्याला किती कंगोरे असतात, त्यातही श्रेष्ठ कोण की दोन्ही समतल, त्यांच्यातील प्रेमाची खोली कशी मोजायची, नात्यांचा अर्थ कसा आजमावयचा.. याचा शोध सृजनशील साहित्यकार नित्य घेतच असतात. काळानुरुप, पिढय़ांनुसार, बदलत्या वास्तवानुसार या नात्यांचे रंग बदलत असतात, निकष बदलतात. मात्र या नात्याची बैठक ही, ‘विश्वास’, परस्परांवरील ‘प्रेम’, एकमेकांना दिलेला आदर, त्यांच उभयतांमधील ‘जाणून’ घेणे, समजून घेणं, आधार देणं-घेणं.., यावर अवलंबून असते. या निकषांपैकी एक जरी डळमळीत झाला, तरी या नात्याला तडे जाऊ लागतात.
प्रतिम आणि नीलम या जोडप्याच्या नात्यातील दुराव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखक- दिग्दर्शक संतोष आंबेरकर यांनी ‘प्रेम.. प्रेम असतं’ या नाटकात केला आहे. पती-पत्नीतील आत्यंतिक प्रेमापोटी त्यांच्या संसाराची काय अवस्था होते, त्याचं एक आरस्पानी चित्र आंबेरकर यांनी सुज्ञ नाटय़रसिकांसमोर ठेवलं आहे.
प्रतिम सृजनशील आहे, पण त्याच्या प्रतिमेच्या दुनियेत तो लेखक आहे. कादंबरीकर, नाटककार आहे. त्याच्या साहित्याचे चाहकारही आहेत. वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर मात्र त्याची सृजनात्मकता कळलेली नाही. नीलमचं मात्र प्रीतमवर जीवापाड प्रेम. प्रीतमच्या साहित्याच्या विश्वापेक्षा तिला ‘तिचा नवरा’ म्हणून तो अधिक प्यारा. आत्यंतिक प्रेम, इतकं की त्याच्यावर तिचा पूर्ण अधिकार. तिला दोघांच्या प्रेमात ‘तिसरा’ कुणीच नको. त्याच्याशी कुणीही सलगी केलेली, जवळीक केलेली तिला असहय़ होते. प्रीतमविषयी नीलम खूपच पझेसिव्ह आहे.
अर्थात, असा पझेसिव्हतेस असण्यामागेही एक खास घटना आहे. ती त्या दोघांमध्येच फक्त. त्यांनी ती परस्परांच्याच ‘ठरावा’द्वारे पुन: न उच्चारण्याचं ठरल्यामुळे नीलम सतत साशंक. त्या ‘घटने’मुळे प्रतिम आपल्याला दुरावणार नाही ना, आपल्याला सोडून तर देणार नाही ना?.. अशी तिला सतत असुरक्षिततेची भावना सतावत असते. मग त्यातूनच सुरू होतं, बारीक- सारीक गोष्टींवरून संशय घेणे. खरं तर हा तिचा, त्याच्यावरचा अविश्वास नसतो, तर स्वत:च्या पायाखालची जमीन शाबूत आहे की निसटतेय, आपलं स्थान आपण गमावतोय का.. ही धास्ती! या धास्तीनं ती अधिकाधिक त्याला आपल्या प्रेमानं, वागण्यानं, बोलण्यानं जखडून ठेवू पाहाते. नात्यात दुरावा येऊ नये, याचा सतत प्रयत्न करते.
पण.. गाळात रुतलेल्या व्यक्तीच्या प्रयत्नातही तो अधिक वेगानं रुतत जातो.. तसं नीलमचं होतं. नीलमच्या मनातली धास्ती, असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी, परस्परांमधील नातं ‘अबाधित’ राहाण्यासाठी प्रीतम तिच्यासमोर एक ‘पर्याय’ ठेवतो. तो काही नीलमला मान्य होत नाही. तिचं संशय घेणं सुरूच राहातं.
अशा नात्यांमध्ये पत्नी नावाचं टोक आत्यंतिक संशयी होऊन संबंध ताणलं जातं. तर पती नावाचं होऊन संबंध तुटू नयेत म्हणून खूप कसरती करू लागतं. संशयानं पार आंधळं केलेल्या आणि ‘त्या’ घटनेच्या आधारानं पूर्वग्रहदूषित विचाराच्या पत्नीला सारं नातं ‘काविळी’सारखं दिसतं. मग दोघं समोरासमोर येताच उडणारे खटके, वाद, परस्परांबरोबर राहाणं असहय़ होणं.. पण एकमेकांशिवाय ‘जगणं’ दोघांनाही अशक्य. हा ‘सहजीवना’चा, परस्परांच्या ‘सहवासा’चा परिणाम.
पती-पत्नीच्या नात्यात शिरलेल्या या संशयाची परिणती काय होते? काडीमोड? प्रीतम- नीलमच्या आयुष्यातील ती ‘घटना’ कोणती, ज्यामुळे नीलम आत्यंतिक प्रेमानं संशयी होते आणि ‘वास्तन’ स्वीकारून प्रीतमनं सकारात्मकतेनं जीवनाला सामोरं जायचं निश्चित केलं! प्रीतमच्या आयुष्यात आलेली पूनम कोण? आणि नीलमच्या आयुष्यात आलेला राहूल कोण? या दोघांच्या, त्यांच्या आयुष्यातील आगमनानं प्रीतम- नीलमच्या जीवनात काय घडामोडी होतात?.. या सा-या प्रश्नांची उत्तरं उत्तरांकात अखेरीस मिळतात.
लेखक संतोष आंबेरकर यांच्या मनात या नाटकाची मांडणी कशी करायची त्याची कल्पना त्यांनी केली होती, त्याप्रमाणे नाटक ‘घडलं’ जातं. ठराविक अंतरानं येणारे धक्के नाटकाविषयी उत्सुकता वाढवतात. त्यांच्या संवादाची भाषा अनलंकृत, सहज-साधी आहे. म्हणूनच ती पटकन् मिळते. प्रसंगानुसार पात्रांचे स्वभाव, व्यक्तिमत्त्वं जी समोर येतात.. त्यास नाटय़ांतर्गत प्रसंगाचा आधार आहे. पण अखेरीस लेखकानं त्यास दिलेला ट्विस्ट त्या पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, रसिकांनी करून घेतलेल्या प्रतिमेला, छेद देतो.
या कौटुंबिक नाटय़कथेचं सादरीकरण करताना दिग्दर्शक संतोष आंबेरकर यांनी यातील ‘नाटय़’ सहजतेनं फुलवत नेलं आहे. पात्रांच्या हालचाली, दृष्यरचना या साध्या, स्वाभाविक ठेवल्या आहेत. पात्रांच्या व्यक्तिमत्त्वानुसार त्यात लय, ताल राखला आहे. म्हणूनच पूनम, राहूल यांच्या हालचालीतील द्रूत लय, चैतन्यपूर्ण वाटतं. मात्र, काही प्रसंगांनंतर, पुढचा प्रसंग सुरू करण्यापूर्वी योजलेलं ‘निवेदन’ रसिकांच्या आस्वादनात बाधा आणतं. दृष्यमाध्यमात रसिकांसमोर नाटक ‘सादर’ करायला हवं, त्याची ‘श्रृतिका’ धरायची आवश्यकता नाही. रसिकांना ‘समजावून’ सांगण्याची आवश्यकता नाही. नाटय़रसिक सुज्ञ आहेत, असतात.. असं समजून सादरीकरण हवं. (हे ‘निवेदन’ वगळूनही नाटय़परिणामात बाधा येणार नाही.)
प्रवीण गवळी यांचं नेपथ्य लेखकाच्या अपेक्षेनुसार होतं. बाल्कनीबाहेरच्या अवकाशाचाही कल्पक वापर दिग्दर्शकानं करून घेतला होता. साहित्यिकाचं ‘घर’ वाटावं, असा दिलेला ‘फिल’ लक्षात येतो. बाल्कनी जवळची ‘बार’ची जागा प्रीतमची रसिकता दाखवणारी. खिडकीतून दिसणा-या दृष्यामुळेही आणि एकूणच नेपथ्यातील अंतर्गत सजावटीनं एक प्रकारची प्रसन्नता जाणवते.
सुनील देवळेकर यांनी केलेल्या प्रकाशयोजनेतून नाटय़ांतर्गत काळाचं सूचन तर होतंच, पण प्रसंगानुरुप योजलेल्या ‘प्रकाशरंगा’नं, त्या व्यक्तीवर प्रसंगावर लक्ष केंद्रीत होतं.. प्रसंगाचा ‘भाव’ रसिकांपर्यंत पोहोचतो. तीच गोष्ट अरुण कानविंदे यांची. त्यांनी दिलेल्या पार्श्वसंगीतानं प्रसंगाला उठाव मिळतो. जगदीश शेळके यांना रंगभूषेत करण्याजोगं विशेष काही नव्हतं. सागर महाडिक यांनी चारही पात्रांची वेशभूषा कल्पकतेनं केलेली होती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार अनुरूप!
या नाटकास ‘कथा’ आहे, सांगण्याजोगं विधान आहे.. ते लेखकानं अत्यंत साध्या-सोप्या शैलीत मांडल्यामुळे सारा डोलारा कलावंतांच्या खांद्यावर आला आहे. अशोक शिंदे यांनी, पत्नीच्या भडिमारासमोर टिकाव धरणा-या संयमी, सकारात्मक वृत्तीच्या, आनंदी साहित्यिकाची प्रीतमची भूमिका अत्यंत सहजतेनं केली. शैलीबद्ध सहजता, त्यांच्या वागण्या-बोलण्यात हालचालीत जाणवते. त्रागा करतानाही त्यांनी ‘अधिकपणा’ टाकल्यानं त्यात कृत्रिमता जाणवत नाही. तीच गोष्ट नीलम झालेल्या मैथिली नारंग यांची. प्रारंभीच लावलेला चढा सूर, त्या पात्राची एकच मानसिकता व्यक्त करतो. त्यांच्या वागण्या- बोलण्यातून नजरेतून स्वत:चं चालवणं, पतीविषयी संशयी असणं, प्रेमासाठी आतुर असणं.. हे खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त झालंय. पूनम झालेल्या गौरी देशमुख आणि राहूल झालेलं पंकज खामकर यांनीही आपापल्या भूमिका, त्या पात्रांना न्याय देणा-या, चैतन्यमय केल्या.
‘प्रेम..प्रेम असतं’ हे विधान नेमकं काय हे जरूर पहायला हवं.
mastach