पहिल्याच पावसाचा कामांना मोठा तडाखा; सिमेंट पाईपच्या मो-या कुचकामी, महामार्गावर चिखलाचे साम्राज्य; वाहतूक अत्यंत धोकादायक
सिंधुनगरी – मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अनेक तांत्रिक चुका झाल्याचे उघड होत आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच कोसळलेल्या पावसाने या कामांना मोठा तडाखा दिला आहे. पावसात पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी घालण्यात आलेल्या सिमेंट पाईपच्या मो-या कुचकामी ठरल्या असून महामार्गावर ठिकठिकाणी चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्ग सध्यातरी हा वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात झाली आणि कामाने चांगला वेग घेतला होता. मात्र यात अनेक ठिकाणी तांत्रिक चुका झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साठून राहिले आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी चिखलाचे साम्राज्य बनले आहे. छोटय़ा वाहनचालकांना तर आपला जीव मुठी घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
गोव्याकडून मुंबईकडे जाणा-या वाहनचालकांनी तर आता आंबोली मार्गे कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गाला प्राधान्य दिले आहे. पावसाची नुकतीच सुरुवात होते न होते तोच महामार्गाची ही अवस्था झाली असून पूर्ण पावसाळाभर वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह आणि मार्गाच्या रुंदीकरणाचे काम लक्षात न घेताच सिमेंट पाईपचा मो-या आणि कलव्हर्टची कामे अनेक ठिकाणी पूर्ण झाली आहेत, मात्र काही ठिकाणी त्यातून पाणी वाहून न जाता साचून राहात असल्याचे उघड झाले आहे. आणि त्यामुळेच महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी हा महामार्ग धोकादायक बनला आहे. या पहिल्या वहिल्या पावसात काही ठिकाणी अपघातही झाले आहेत. महामार्गाचीही धोकादायक परिस्थिती बदलण्याकडे सर्व विभागांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
गडकरीसाहेब दिलीप बिल्डकॉनला कंत्राट कसे दिले गेले याचा आम्हा सिंधुदुर्गवासियांना खुलासा हवाच.
कोकणातील रस्ता रुंदीकरणासाठी सुनियोजित कामाची आखणी व अनुभवी कंत्राटदारची गरज होती.
पाऊस नसताना एप्रिलमध्ये झारापच्या व्यापा-याचा अपघात झाला. या समयी बिल्डकॉनचे रस्तारुंदीकरण सदोष असल्याचेच निर्दर्शनास आले. अपघाताच्या समयी मी स्वतः तेथून प्रवास करत होतो. एप्रिल व मे मध्ये या रस्त्यावरुन मी अनेकदा प्रवास केला आहे.
त्यानंतर अनेक जणांनी तक्रारी केल्या. पण अद्यापही मात्र या बिल्डकॉनचे कंत्राट चालूच.
आता तर संपूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे. जास्त धोका आहे तो दुचाकी वाहनचालकांना.