महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काही ‘हेराफेरी’ झाली असा आक्षेप आता संघटितपणे घेतला जात आहे. मतदान यंत्रात काही अशी व्यवस्था केली गेली असा आक्षेप आहे की, पहिल्या ३० टक्के मतदानानंतर, पुढच्या प्रत्येक मतदानाच्या वेळी कुणाही उमेदवाराचे बटण दाबले, तरी ते मत कमळाकडेच जाईल, अशी कमळाबाईंची गोष्ट निवडणूक बाजारात फार तेजीने चर्चेत आहे.
मतदान यंत्रात घपला करता येतो का? ‘अ’ उमेदवाराच्या समोरचे दाबलेले बटण ते मत ‘ब’ ला परस्पर फिरवू शकते का? या यंत्राच्या तांत्रिक अभ्यासकांनी असे काही प्रयोग करून मतं फिरवता येतात का? अशी चाचपणी करून पाहिली आहे का? मात्र हेराफेरी झाल्याचा आक्षेप सार्वत्रिक असल्यामुळे याची तांत्रिकदृष्टय़ा चौकशी व्हायला हवी. निवडणूक आयुक्तांकडे या संदर्भात लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. निवडणूक लढवलेली पुण्यातील काही मंडळी न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आहेत.
मुंबईच्या निवडणुकीची तर अशी गंमत सांगितली जात आहे की, अनेक अपक्ष उमेदवारांना शून्य मते पडलेली आहेत. म्हणजे त्यांनी स्वत:लाही आपले मत दिले नाही, असा त्याचा अर्थ होतो. काही अपक्ष उमेदवारांनी याबाबत त्यांच्या मतपत्रिका सीरिअलप्रमाणे हे मत उघड करण्याची मागणी केलीय. पूर्वी निवडणूक काळात मतपेटय़ा पळवण्याचे प्रकार व्हायचे. अनेक हिंदी सिनेमांत असे चित्रण असते की, गुंड लोक मतदान केंद्राचा कब्जा करतात आणि सगळ्या मतपत्रिकांवर त्यांच्या हव्या त्या उमेदवाराचे शिक्के मारून घेतात. १९६३ साली मुंगेर (बिहार) पोटनिवडणुकीत मधू लिमये यांच्या मतदान केंद्रावर अशी हेराफेरी झाली आणि त्या विरोधात लिमये तेथील केंद्राधिका-यांकडे तक्रार करायला गेले तेव्हा तेथील गुंडांनी त्यांना मारहाण केली. एकेकाळी यू. पी., बिहारमध्ये निवडणूक काळात अशी गुंडफौज मदतीला ठेवली जात असे. आता ती सगळी गुंड कंपनी भाजपाच्या वळचणीला उभी आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात अशा गुंड कंपनीला पावन करून घेण्यात आलेय. त्यामुळे उद्या काही दंगाधोपा करायचा असेल तर भाजपाजवळ प्रवेश दिलेले सर्व नामचिन गुंड चॉपर घेऊन तयार असतील.
निवडणुकीच्या धांदलीमधील आणखी काही गमती जमती अशा आहेत की, एका मतदान केंद्रातील बुथवर एकूण १००० मतदान आहेत. त्या मतदान केंद्रावर ६० टक्के मतदान झालेय म्हणजे ६०० मतदारांनी मतदान केलंय. यादीमध्ये ६०० मतदारांचा हिशोब मिळतो. तेवढय़ाच ६०० स्लिपा सोडण्यात आल्याचा हिशोब मिळतो, पण त्या बुथच्या मतमोजणीत असलेल्या एकूण उमेदवारांना पडलेल्या मतांची बेरीज ८०० पेक्षा जास्त आहे. जेव्हा मतमोजणी होते ती बुथप्रमाणे होते. पूर्वी जेव्हा मतपत्रिका होत्या, त्या सर्व मतपत्रिका पेटी ओतून मोजल्या जायच्या आणि मग, त्यामुळे कोणत्या बुथवर किती मते पडली हे समजत नव्हते. आता बुथप्रमाणे हिशोब मिळतो. पण या महाघोटाळ्याचा मुख्य आक्षेप जो आहे तो बुथमध्ये झालेल्या एकूण मतदानापेक्षा प्रत्यक्ष मोजणीत २००-३०० मते वाढली ती कशी? आणि वाढीव मते नेमकी कमळाबाईंना पडली हे कसे? वास्तविक महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त जे. सहारिया म्हणून जे कोणी आहेत ते गप्प का? त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्याचा नेमका खुलासा का करत नाहीत? निवडणुकीत निर्भयपणे मतदान व्हावे अशा जाहिराती मोठय़ा प्रमाणात आयुक्तांकडून प्रसिद्ध केल्या जात होत्या. प्रत्यक्षात मतदानात घोटाळे झाल्याचे उघड होत असताना निवडणूक आयुक्तांची काही जबाबदारी आहे की नाही? सहारिया यांनी मुख्य सचिवपदावरून निवृत्त होता होता, त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांकडून आयुक्तपद मिळवून घेतले. पण त्याची जबाबदारी ते स्वीकारण्यास तयार नाहीत, असे दिसते. अन्यथा एवढय़ा तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने स्वत:हून याची दखल घेतली पाहिजे होती. चारी बाजूंनी आक्षेप असताना लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला असता निवडणूक आयोगाकडून खुलासा आला की नाही? उद्या हा विषय कोर्टात जाणार आणि तेथे निवडणूक आयोगालाच खुलासा करावा लागणार.
आणखी एक मोठा आक्षेप घेण्यात आला आहे. तो अधिक गंभीर आहे आणि त्याची जबाबदारी थेट निवडणूक आयोगावरच आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसर पट्टय़ातील १२ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याची एक गंभीर तक्रार निवडणूक आयोगाकडे लाखो मतदारांनी केलेली आहे. मतदानाच्या दिवशी जे मतदार निवडणूक आयोगाने नाव नोंदल्यावर दिलेले ओळखपत्र आहे, त्या निवडणूक आयुक्तांच्या सहीशिक्क्याने ओळखपत्र दाखवूनही त्या ओळखपत्रावरील मतदान क्र. (सीरिअल नंबर) नावेच्या नावे गायब झाली आणि निवडणुकीच्या अगोदर हे कटकारस्थान रचले गेले, हा जाहीर आक्षेप आहे. ही १२ लाख नावे गायब होत असताना यातील ९० टक्के नावे मराठी मतदारांची आहेत, असेही उघड झाले आहे. त्यामुळे संशय अधिक बळावलेला आहे. त्यामुळे या १२ लाख मतांचा हिशोब मिळवून देणे ही जबाबदारी सहारियांचीच आहे. आज या संपूर्ण निवडणूक पद्धतीवर संशयाचे दाट धुके पसरलेले आहे. मतदान यंत्रातील हेराफेरी हा एक आक्षेप आहे. मतदार याद्या गायब करणे हा दुसरा आक्षेप आहे. पुण्यातल्या २०० पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याची प्राथमिक तयारी केलीय. मतदान केलेले मतदानही प्रत्यक्ष मतमोजणीतून गायब झाले.
एकेका बुथवर मतांचा हिशोब लागत नाही. मेळ होत नाही. एकूण पडलेल्या मतांपेक्षा ३००-३०० मते जास्त पडतात आणि त्याचा हिशोब मिळत नाही हे काय गौडबंगाल आहे? उद्या पराभूत उमेदवार न्यायालयात गेल्यानंतर हे सर्व विषय चर्चेला येणार आणि निवडणूक आयोगाला सामोरे जायला लागणार. मुंबईतील १२ लाख मतदार यादय़ा चोरीचा आक्षेप तर महाभयंकर आहे. एखाद्या निवडणूक आयुक्ताने त्या विभागातील निवडणूक थांबवली. पण सहारियांचा कोण सहारा घेतय का? ते बोलत नाहीत, खुलासा का करत नाहीत? हेराफेरी झालेली नाही असे ते का सांगत नाहीत? एकूणच मतदान, मतांचे आकडे, त्यांची बेरीज न जुळणे, अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या कुटुंबाने स्वत: मतदान केलेले असताना सुद्धा त्या उमेदवाराला शून्य मते मिळणे हा काय प्रकार आहे?
मतदानातील घोळ ,पुन्हा मतदान होउ दे ! आणि मतदान केंद्रांवर डोळ्यांचे स्कॅनिंग करून
मतदान करता येईल अशी व्यवस्था करा .जेणेकरून बोगस मतदानावर आळा बसेल .