पाहता पाहता महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलली आहेत. साडेचार महिनेच तर झाले आहेत देवेंद्र सरकारला. पण पाच वर्षाचा वादा करून आलेले हे सरकार आज पडते की, उद्या अशी धाकधूक जनतेला वाटते आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण, हेच कळेनासे झाले आहे.
सरकार लगेच पडणार नाही; पण काउंटडाऊन सुरू झाले आहे. शिवसेना एवढय़ा सहजासहजी मानणारी नाही. तिला ‘हुतात्मा’ व्हायचे आहे आणि शरद पवारांना लाल दिव्याची पडली आहे. सोनिया गांधी असोत की, नरेंद्र मोदी, शरद पवारांना गाडीवर लाल दिवा पाहिजे. सध्या जे सुरू आहे, ती सत्तेची लठ्ठालठ्ठी आहे. तसे नसते तर विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी एवढय़ा हाणामा-या झाल्या नसत्या. भाजपा सरकार सुरुवातीपासून अस्थिर होते. कागदावर बहुमत दाखवायचे तर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला जवळ करणे जरुरी होते. भाजपाचे सुरुवातीचे काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा घ्यायचा की, नाही या चलबिचलीत गेले. पुढे भाजपाने शिवसेनेला सरकारात ओढले. भाजपाला जगाला सांगायला पार्टनर मिळाला. वाघाची शिकार केल्याच्या थाटात भाजपावाले कॉलर टाइट करीत फिरू लागले; पण त्यांनी एक गल्लत केली. वाघावर स्वार होणे सोपे असते. पण उतरणे अवघड असते. आज तेच होत आहे. भाजपाने शिवसेनेला घरात घेतले खरे; पण दोघांनी मधुचंद्राची रात्र पाहिली नाही. पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा पाणउतारा सुरू राहिला. दररोज हे अंतर वाढते आहे. भाजपाला शिवसेना नको आणि राष्ट्रवादीला काँग्रेस नको, असे हे त्रांगडे आहे. ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी परिस्थिती आहे.
निवडणुकीआधी भाजपा-सेनेचे संबंध एवढे कटू नव्हते. एवढे ताणले जात नव्हते. नरेंद्र मोदींच्या हातात देशाचे राजकारण आले आणि पहिला खडा पडला. सरकारच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात शिवसेनेला उपाशी ठेवले गेले. सेनेच्या मंत्र्याकडे असलेल्या एकाही खात्यासाठी भरीव तरतूद नाही. उलट भाजपा नेत्यांच्या नावाने मात्र अनेक योजना जाहीर झाल्या आहेत. शिवसेनेचा किल्ला समजल्या जाणा-या मुंबई आणि कोकणच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार दिसतो. युती धर्म भाजपाने पाळला नाही. सारखे डिवचत गेल्याने अंतर वाढत गेले. भाजपाला झोडपून काढण्याची कुठलीही संधी शिवसेनेचे नेते सोडत नाहीत. विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेच निभावताना दिसते आहे. शिवसेनेच्या राडय़ातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सुटले नाहीत. परवा विधान परिषदेत गृहखात्याच्या कारभारावर सेनेने मुख्यमंत्र्याला ठोकून काढले. मेट्रो रेल्वेचा विषय असो की, आरे कॉलनी, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प असो, शिवसेनेने भाजपाच्या एकदम विरोधात भूमिका घेतली आहे. कुठल्याही विषयावर एकमत नाही. हा याचा दिवे काढू पाहतो तर तो त्याचा दिवा विझवू पाहतो. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर मुंबईत एलईडी दिवे लावण्यावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. नुसते लाथा मारणे सुरू आहे.
युतीमध्ये जे सुरू आहे तेच आघाडीमध्येही जोरात आहे. काँग्रेसला बुडवण्यासाठी कुणाही सोबत जाण्याची मानसिकता राष्ट्रवादीने बनवली आहे. जातीय शक्ती म्हणून भाजपाच्या नावाने बोटे मोडणारे शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाच्या जवळ जात चालला आहे. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव नाटय़ाच्या निमित्ताने तेच पाहायला मिळाले. भाजपा राष्ट्रवादीच्या सोबत गेला. उद्या पवार मोदींच्या मांडीवर दिसतील. शरद पवारांना सत्तेशिवाय फार दिवस राहता येत नाही. गेली १५ वष्रे सत्तेत राहिलेले दोन काँग्रेस पक्ष आज वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसत आहेत. पवार भाजपाच्या तंबूत घुसले म्हणून काँग्रेस शिवसेनेच्या जवळ जाताना दिसेल. राजकारण मोठे विचित्र आहे. इथे कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. मोदींना काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हवा आहे. आता मोदींच्या हिट लिस्टमध्ये शिवसेनेची भर पडली आहे. मोदींच्या घाणेरडय़ा राजकारणाच्या नादी लागून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची केस खराब करून घेतली. पक्ष म्हणून भाजपाचे काय ते नफा-नुकसान झाले ते वेगळे. फडणवीस यांना सत्तेवर पकड मिळवता आली नाही. समन्वयच नाही. त्यांचे मंत्रीच त्यांचे ऐकत नाहीत. महसूलमंत्री एकनाथ खडसे मुख्यमंत्र्यावर कुरघोडी करण्याची संधीही संधी सोडत नाहीत. ‘गुड गव्हर्नन्स’ देऊ, असे फडणवीस सुरुवातीला म्हणाले होते. पण पहिल्या दिवसापासून त्यांचे सरकार रांगते आहे. पत्ते उलटे पडत गेले. फडणवीस सरकारचा पायगुण असा की, ते आल्यापासून महाराष्ट्रावर निसर्ग कोपला. मराठवाडय़ातला दुष्काळ, नंतर अवकाळी पावसाने सा-या महाराष्ट्राला त्रासून सोडले. शेतक-यांना मदतीचा हात देण्यात देवेंद्र कमी पडले. केंद्र सरकारकडून पैसे आणण्यातही त्यांना यश आले नाही. चार महिने अवकाळीचा पंचनामा करण्यातच गेले. आता या सरकारचाच पंचनामा करण्याची वेळ आली आहे, असे शेतकरी बोलू लागले आहेत. या दोन-चार महिन्यांत निवडणूक झाली तर भाजपाचे डिपोझिट जाईल इतकी खराब हवा आहे. देवेंद्र फडणवीस यांना थोडी मुत्सद्देगिरी दाखवता आली असती. सेनेला चुचकारत सांभाळून घेता आले असते. पण त्यांना कुठे स्वातंत्र्य आहे? ते मोदींच्या मागे फरफटत जात आहेत. मोदी यांच्यावर टाकलेला फाजील विश्वास त्यांना नडला. आज काय चित्र आहे? मोदींनी त्यांना एकटे सोडून दिले. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि सरकार पंचनाम्यात व्यस्त आहे. रोम शहर जळत असताना राजा नीरो फिडल वाजवत बसला होता, असे सांगितले जाते. फडणवीस हेही महाराष्ट्राचे नीरो आहेत. जनतेशी काही घेणेदेणे नाही. शेतकरी आत्महत्येबद्दल सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे एकेकाळी म्हणणारे फडणवीस आज पंचनाम्याकडे बोट दाखवत आहेत. केंद्राची मदत नाही. नतिक आधार नाही. देवेंद्र आपल्याच सोनेरी पिंज-यात चडफडत आहेत. त्यांचे सहकारी त्यांना साथ द्यायला तयार नाहीत. त्यामुळे एकहाती किल्ला टिकवताना त्यांची दमछाक सुरू आहे. गृहखाते त्यांनी स्वत:कडे ठेवून घेतले, ही मोठी चूक झाली. ते त्यांना सांभाळता आले नाही. आज राज्याची काय अवस्था आहे? गुंड मोकाट सुटले आहेत. खुद्द त्यांच्याच नागपुरात भरदिवसा खून पडत आहेत. त्यांच्या घराजवळ एका माफियाला गोळ्या घालून संपवण्यात आले, एका व्यापा-याचा भोसकून खून झाला. कोल्हापुरात गोविंद पानसरे यांचे मारेकरी अजून पोलिसांना शोधता आले नाहीत. ‘या सरकारकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे,’ असे पानसरे यांची कन्या म्हणते यावरून परिस्थिती किती बिघडली आहे, याचा अंदाज येतो. शिकाऊ पोलीस अधिकारी पैसे घेताना पकडले जात आहेत. कुणाचा कुणाला धाक नाही. सरकार नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. समाजातला एक वर्ग असा सांगा की, जो सरकारवर खुश आहे. मुख्यमंत्री म्हणतात, ‘हे सिस्टिमचे अपयश आहे.’ असेलही. मग बदलाना सिस्टीम. तुम्हाला कुणी रोखले आहे?
ही मंडळी कशाच्याच बाबतीत गंभीर नाही. नुसता टाइमपास सुरू आहे. राज्य करायला मजबूत टीम लागते. फडणवीस यांच्याजवळ टीमच नाही. एकनाथ खडसे म्हणा की, सुधीर मुनगंनटीवार, विनोद तावडे म्हणा, स्वत:च्याच मस्तीत खुश आहेत. त्यांच्या अर्थमंत्र्याने परवा काय बजेट दिले? ‘आम्ही नवे आहोत,’ असे मुख्यमंत्री म्हणतात तर मग बजेट समजते, अशा चार लोकांसोबत बसून तयारी करायला पाहिजे होती. त्या बजेटमध्ये कसलीही व्हिजन नाही. उत्पन्न वाढवण्याची दिशा नाही. ‘एलबीटी’च्या भरवशावर भाजपाला शहरात व्यापा-यांची मते मिळाली. आज तो रद्द करण्याची वेळ आली तर अर्थमंत्री पुढची तारीख देतात. तमाम व्यापारी उद्या या सरकारच्या विरोधात उभे झालेले दिसतील. तुम्ही लिहून ठेवा. ऑगस्टमध्येही ‘एलबीटी’ रद्द होत नाही. हे असेच टोलवत जातील. यांच्यात धमक नाही. सात हजार कोटी रुपयांचा खड्डा आहे. सोपे नाही. पण फसवी आश्वासने देऊन सत्तेत आलेले सरकार यापेक्षा दुसरे काय करू शकते? प्रश्न देवेंद्र फडणवीस यांचा नाही. सरकार गेले तर ते संघ शाखेत जायला मोकळे आहेत. जनतेने कुठे जायचे? विदर्भाने या आधीही राज्याला मुख्यमंत्री दिले. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक विदर्भाचे होते. वसंतराव तर तब्बल ११ वर्षे सत्तेत होते. लोक त्यांच्याशी तुलना करीत आहेत. आज विदर्भाचा कुणी नेता राज्याचे नेतृत्व करू शकत नाही, असा संदेश जाऊ पाहतो आहे. चार महिन्यांवरून कुणाचे पास-नापास करता येत नाही. पण इथे बाळाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. कुणासोबत बसायचे ते बसा; पण जनतेला स्वच्छ कारभार द्या, असे सांगायची वेळ आहे.
लेख चांगला आहे, परंतु संपादक महोदय एव्हड्याच पोटतिडकीने कॉंग्रेस दहा वर्षे सत्तेवर असताना आपण का लिहू शकले नाहीत ??