पहिला पाऊस आणि सर्वत्र मातीचा मन वेडा करणारा सुगंध हे पिढय़ान् पिढय़ा अनुभवलेले आनंदसंचित आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, पण तरीही आमच्या समाजात त्याविषयी ना खेद ना खंत. वाढत्या शहरीकरणाने पहिला पाऊस आणि कांदाभज्यांचा खमंग वास हे नवे समीकरण तयार केल्यामुळे असेल, पण आम्ही सगळेच मृदगंधांचा पाऊस ओला आनंद विसरत चालतो आहोत, हे दुर्दैवाने खरे आहे. एकीकडे नशिबाने लाभलेल्या विपुल निसर्गसंपदेची बेफाम उधळपट्टी आणि दुसरीकडे निसर्गाला मारक ठरेल असे बेफाट चंगळवादी जगणे, या आधुनिक जीवनशैलीला आम्ही चटावलो आहोत. ‘ग्लोबल वॉर्मिग’च्या एका मागोमाग एक ‘वॉर्निग’ मिळत असताना, निसर्गाने दाखवलेल्या धोक्याच्या इशा-यांकडे दुर्लक्ष करून आमची विकासाऐवजी विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. आमची ही आत्मघातकी चाल वेळीच सुधारली नाही तर येणा-या पिढय़ा आपल्याला माफ करणार नाहीत.
निसर्ग आपल्या अवती-भवती पसरलेल्या अफाट आणि अतक्र्य निसर्ग मनुष्यजातीचा खरा ‘गुरू’ मानला पाहिजे. निसर्गाच्या प्रत्येक खेळाकडे पाहत, त्याच्याशी जुळवून घेत, तर कधी त्यावर मात करीत मानवाने प्रगती केली, पण गुहेत राहणारा, कंदमुळांवर गुजराण करणारा माणूस जेव्हा ज्ञान-विज्ञानाच्या बळावर बलवान झाला तेव्हा बदलला. माणसांनी सगळ्यात प्रथम ‘गुरूची विद्या गुरूला शिकविण्याचा’ वेडाचार सुरू केला. त्याचे परिणाम आता जगभर दिसताहेत. इंग्लंड-अमेरिकेसह अनेक देशांत पडलेली कडाक्याची थंडी असेल, आपल्याकडील वाढते तापमान असेल किंवा समुद्राची वाढती पातळी असेल. निसर्ग दिवसेंदिवस आक्रमक होत चाललाय. गतवर्षी केदारनाथ आणि त्याच्या आसपासच्या परिसरात झालेल्या निसर्गप्रकोपाचे तांडव आम्ही अनुभवले, पण त्यातून काही शिकलो नाही. म्हणूनच असेल कदाचित केदारनाथच्या नैसर्गिक आपत्तीला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले त्याच दिवशी, मुंबईच्या महापौरांचे दादर समुद्रकिना-यावरील निवासस्थान सलग चार दिवस कच-याने वेढलेले दिसले. पहिल्या दिवशी थर्माकोलच्या वस्तू समुद्राने साभार परत दिल्या. दुस-या दिवशी प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि तत्सम कच-याचा ढीग चौपाटी गमावलेल्या दादरच्या समुद्राने थेट महापौर निवासालगतच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पसरवला. वादळी वा-यांमुळे आलेल्या उधाणाने भरतीचे पाणी जसे शिवाजी पार्कजवळच्या रस्त्यापर्यंत आले तसे या कच-यामुळे परत समुद्रात गेले नाही.
मुंबई महापालिकेची पावसाआधी तारांबळ उडाली. त्यातही महापौरांचे निवासस्थान असणारा परिसर कच-यामुळे भरलेला असल्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.. सगळ्या वरिष्ठाधिका-यांची धावपळ सुरू झाली. तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या जोडीला झटपट प्रसिद्धीची संधी आहे, हे जाणून काही राजकीय नेते पाहणी करायला आले. मोठय़ा संचित मुद्रेने महापालिकेतील मान्यवर दादरच्या किना-यावरील कच-याचे ढीग पाहत उभे होते.
महापौरांनी काळजीच्या सुरात त्या तज्ज्ञांना विचारले, ‘पण यावर काही तरी उपाय असेलच ना?’ तज्ज्ञ एकसुरात उत्तरले, ‘ होय, त्यासाठी आपली वागणूक बदलावी लागेल. आपण समुद्रात वर्षभर कचरा टाकतो, त्याने वर्षातील फक्त दोन-चार दिवस तो कचरा आपल्या किना-यावर टाकला म्हणून किती चिंता करतो, त्यापेक्षा आम्ही आपले वर्तन बदलण्याचा विचार केला पाहिजे.’ तज्ज्ञांमधील एकाने महापौरांच्या शासकीय वाहनाकडे बोट दाखवले. सगळ्यांची नजर तिकडे वळली. महापौरांचा वाहनचालक गाडीतील ए. सी. लावून छानपैकी बसला होता. तज्ज्ञ म्हणाला, ‘आम्ही किती आणि कसे निसर्गावर अत्याचार करतो हे आम्हाला ठाऊकच नाही. तुमचा वाहनचालक ए. सी. लावून आरामात बसलाय, पण त्यामुळे होणारे वायू उत्सर्जन हे ‘ग्लोबल वॉर्मिग’मागील एक कारण आहे हे त्याला ठाऊक नाही. आपल्याला ही समुद्राची वाढती पातळी रोखायची असेल, तर सर्वप्रथम त्या ड्रायव्हरला आणि त्याच्यासारख्या सगळ्यांना ‘पर्यावरणदृष्टय़ा साक्षर’ करणे गरजेचे आहे’. तज्ज्ञ बोलत होते, महापालिकेचे पदाधिकारी कान देऊन आणि मान खाली घालून ऐकत होते..
समस्त मुंबई पहिल्या पावसाची सर अंगावर घेण्यासाठी आतुर झाली असतानाच भरतीच्या उधाणाने सारे किनारे कचरामय केले होते, त्याची दरुगधी जून महिन्याच्या दुस-या आठवडय़ात वाढलेली दिसली. फक्त किना-यावरील भागातच नाही तर, मुंबईलगतच्या ठाणे, नवी मुंबई या एकेकाळी भातशेतीसाठी प्रसिद्ध असणा-या परिसरातही पहिला पाऊस मातीचा गंध घेऊन आला नाही. ठिकठिकाणी साचलेला कचरा, तुंबलेले पाणी आणि उघडय़ा गटारांमुळे पहिल्या पावसाची नवलाई संपून गेली. त्यामागील कारणमीमांसा मृदशास्त्रज्ञ प्रा. विकास धामापूरकर यांनी सांगितली.
मृगाच्या पहिल्या सरी पडल्या की र्सवदूर त्याची वर्दी देणारा मातीचा सुगंध गेल्या काही वर्षात कमी-कमी होऊ लागला आहे. शेतक-यांसाठीही हा सुगंध चांगल्या पिकांची हमी देणारा असतो. कारण, पहिल्या पावसानंतर मातीला येणारा सुगंध, शिवारात पसरलेला सुवास हा ‘अॅक्टिनोमायसिटीस’ या जमिनीमध्ये असणा-या तंतुमय जिवाणूपासून उत्पन्न झालेला असतो. निसर्गाने शेतक-यांना सेंद्रीय शेतीसाठी भेट दिलेला हा परोपकारी जिवाणू खेळती हवा असणा-या जमिनीच्या वरच्या थरामध्ये मोठय़ा प्रमाणात आढळतो. हेच जिवाणू मातीला काळा रंग देतात. वनस्पतीजन्य सेल्युलोज, लिग्निन आणि मृत कीटकांच्या बाह्य टणक आवरणामधील ‘कायचीन’ हे या जिवाणूंचे मुख्य खाद्य.
जमिनीमध्ये या सर्व घटकांचे ते पूर्ण विघटन करून त्यातील मूलद्रव्ये पिकांच्या मुळांना सहज उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य अव्याहत चालू असते. पण हरितक्रांतीमुळे फोफावलेल्या रासायनिक खतांनी आणि रासायनिक कीटकनाशकांनी जमिनीतील शेतीमित्र किडींचा विनाश केला. सिमेंटच्या जंगलांनी शेतीची जागा घेतली. परिणामी शेतक-यांची हजारो वर्षे सेवा करणा-या अॅक्टिनोमायसिटीसनीही त्यांना हवे ते अन्न न मिळाल्यामुळे मृत्यूची वाट धरली.
उन्हाळ्यात जमिनीमधील ओलावा कमी होतो आणि अॅक्टिनोमायसिटीसचे रूपांतर सूक्ष्म गोल कणांमध्ये होते. कोरडय़ा चिमूटभर मातीत असे लाखो जिवंत गोल कण असतात. पहिल्या पावसाच्या टपो-या थेंबांनी मातीचे कण उडतात, त्याचबरोबर अॅक्टिनोमायसिटीस हवेत दूरवर पसरतात. त्यांचा सुवास सर्वत्र दरवळत राहतो. हा सौम्य गंध मातीतून निर्माण झालेला असतो. म्हणून तो मृदगंध. अॅक्टिनोमायसिटीसचा गंध फक्त एकदाच आणि तोही पहिल्या पावसातच येतो. या घटकाचेच प्रमाण कमी झाल्यामुळे मातीचा कसही कमी होऊ लागला आहे आणि पहिल्या पावसाची वर्दी देणारा मृदगंधही.
माती आपल्यासाठी पाण्याएवढीच महत्त्वाची असते. पाणी आपली तहान भागवते तर माती आपली भूक शांत करते. तर शुद्ध हवा आपल्याला जगवते. पण फुकट मिळणा-या या तिन्ही गोष्टींची शुद्धता राखण्याऐवजी त्यांच्या विनाशाचाच आपण आजवर विचार केला, त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढय़ांना भोगावे लागणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपुरुष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी या संदर्भात खूप आधीच धोक्याचा इशारा दिला होता. एका भाषणात ते म्हणाले होते, ‘जो देश आपली माती वाचवू शकत नाही, तो स्वत:ला काय वाचवणार?’ खरे आहे. माती हे प्रत्येक राष्ट्राचे महत्त्वाचे भांडवल. ज्या देशात मातीचे प्रमाण कमी आहे, त्या देशात गेल्यानंतर आपल्याला मातीची किंमत कळते. इस्रयलमध्ये हैफा शहराकडून गोलान टेकडय़ांकडे जाणारा महामार्ग वाळवंटातून जातो.
दोन्ही बाजूला तप्त वाळूचा अथांग समुद्र आणि त्याच्यामध्ये क्षितिजापर्यंत पोहोचलेली लांबलचक रेघ वाटावी असा तो महामार्ग. विशेष म्हणजे या ओसाड, रेताड रस्त्यावर दुतर्फा खजुराची झाडे लावलेली दिसली. त्यासंदर्भात इस्रयल सरकारच्या प्रतिनिधीला विचारले असता तो उद्गारला, ‘या संपूर्ण वाळवंटात फक्त रेती आहे, आम्ही दुसरीकडून माती आणून मोठय़ा खड्डय़ात ती टाकतो आणि त्यावर ही झाडे लावतो. तुम्हाला दिसताहेत ती झाडे पाच वर्षाची आहेत. पुढील पाच वर्षात ती चांगलीच वाढतील.’ वाळवंटात हिरवे स्वप्न फुलण्याच्या त्या जिद्दीचे कौतुक वाटले आणि हिरवळीचे रूपांतर वाळवंटात करायला निघालेल्या आपल्या बांधवांच्या करंटेपणाचे वाईटही वाटले.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत आपण कोटय़वधी झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे झालेली जमिनीची धूप आणि एकंदर पर्यावरणाचे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. मात्र आमच्यावर ‘राज्य’ करणा-या इंग्रजांनी देशातील वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी खास प्रयत्न केले होते, ही वस्तुस्थिती पाहिल्यावर आपण स्वातंत्र्यासाठी नालायक होतो का, अशी शंका मनात दाटून येते. इंग्रज भारतात आल्यानंतर आपल्याकडील सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात अफाट बदल झाले होते.
इंग्रजांच्या अवलोकनानुसार तत्कालीन खेडी म्हणजे, ‘स्वायत्त आणि स्वयंपूर्ण संस्थाने’ होती. अलुतेदार-बलुतेदारांच्या जातीबद्ध समाजरचनेत समाजातील सर्व घटकांचा कमी-अधिक विचार होत होता, पण इंग्रजांनी आपली ग्रामव्यवस्थाच उचकटून फेकली. परिणामी सुतार, लोहार, आदी कारागीर बेकार झाले. त्यांना काळ्या आईच्या, शेतीच्या आश्रयाला जाण्याशिवाय अन्य पर्यायच उरला नव्हता, त्यामुळे पारंपरिक शेतजमिनीसह लगतच्या जंगलात, कुरणात अगदी डोंगरातसुद्धा शेती होऊ लागली.
इंग्रजांचे जेव्हा त्याकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी १८७८ मध्ये जंगलाचा कायदा आणला. तो कायदा लोकांसमोर आणताना ब्रिटिश सरकारने स्पष्टपणे सांगितले, ‘हा कायदा आम्ही उत्पन्नासाठी करीत नसून केवळ तुमच्या फायद्यासाठी करीत आहोत. जंगल राखले असता देशात वारंवार पडणारे दुष्काळ थोडय़ा अंशाने तरी कमी करता येतील, असे आम्हास वाटते.’ इंग्रजांनी आणलेला जंगलाचा कायदा इतका कडक होता की त्यामुळे फॉरेस्ट गार्डचा धाक पोलिसांएवढाच असे. इंग्रजांची कामाची पद्धत काटेकोर असल्यामुळे जंगल कायद्यांची अंमलबजावणी तत्परतेने होत होती. आज आपल्या देशात जे काही जंगल उरले आहे, त्यामागे त्यांचे धोरणच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्याचे साधे उदाहरणच द्यायचे तर, ‘वनक्षेत्रात कुणालाही साडेतीन फुटांपेक्षा जास्त खोदकाम करता येणार नाही’ या आजपर्यंत सुरू असलेल्या नियमाचे उदाहरण देता येईल.
महाराष्ट्र आणि देशातील कोणत्याही वनकर्मचा-याला या नियमामागील कारण ठाऊक नसते. त्याचे कारण असे आहे की, जंगलाचा कायदा झाल्यानंतर इंग्रजांनी विविध वनक्षेत्राच्या सीमा तयार केल्या. त्या सीमा लक्षात राहाव्यात, यासाठी ठरावीक ठिकाणी पाच-सहा किलो वजनाचे अष्टधातूचे गोळे त्यावर क्रमांक लिहून त्या त्या ठिकाणी तीन-चार फुटांवर पुरले होते. ते अष्टधातूचे गोळे काढण्याचा कुणी प्रयत्न केला, तर हद्दीचा पुरावा नष्ट होईल, हे जाणून सावधगिरीचा इशारा म्हणून जंगलक्षेत्रात खोदकामाला सर्रास बंदी केली होती. त्यांचा आर्थिक फायदा इंग्रज सरकारला तत्काळ दिसू लागला. १८८१-८२ या आर्थिक वर्षात हिंदुस्थानचे जंगल उत्पन्न सत्याऐंशी लाख होते. १८९४-९५ मध्ये ते जवळपास दुप्पट म्हणजे एक कोटी पासष्ट लाखांवर गेले.. इंग्रजांच्या या गल्लाभरू वृत्तीमुळे जंगल टिकले हे खरे, पण त्यामुळे शेतक-यांवर फार मोठा दुष्परिणाम झाला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, पण इंग्रजांच्या जंगल कायद्यातील चांगल्या गोष्टी घेऊन आपले वनधोरण ठरवले असते, तरीही आजची स्थिती वेगळी असती.
जंगल टिकले तर माती टिकते. माती झाडांची मुळे धरून राहिली तर ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर नद्या-नाल्यांमध्ये जात नाही. ती गेली तर नद्यांचे प्रवाह बदलतात, जमिनीचा कस नष्ट होतो. धरणे गाळाने भरतात, परिणामी नैसर्गिक संतुलन बिघडते. आज भारतातील जवळपास सर्वच लहानमोठी धरणे गाळाने भरून गेलेली दिसतात. नदीचे पात्र असो वा धरणातील विशालक्षेत्र, या सगळ्याच ठिकाणची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत जाते. एकीकडे मातीची धूप होऊन जमिनीचा कस जातो आणि दुसरीकडे धरणात हा गाळ साठल्यामुळे पाणी झिरपण्याचे, साठण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
परिणामी आपण पाणी आणि माती या दोन्ही जीवनावश्यक गोष्टी गमावून बसतो. आमच्या वागण्या-बोलण्यात आम्ही भलेही नदीला ‘जीवनदायिनी गंगा माता’ आणि मातीला ‘अन्नदायी काळी आई’ म्हणून मान देतो. पूजा करतो, परंतु आमची कृती त्यापेक्षा विरुद्ध असते. मातीची किंमत वाळवंटात राहणा-या लोकांना असते. आम्हाला मातीची पर्वा करण्याचे कारणच काय? भूशास्त्रज्ञांच्या मते एक सेंटिमीटर मातीचा थर निर्माण होण्यासाठी मातीच्या प्रकारानुसार शंभर ते चारशे र्वष लागतात. विविध प्रदेशातील भौगोलिक स्थितीनुसार माती तयार होते. कुठे काळी कसदार माती, कुठे लाल-तांबडी माती, कुठे गाळ भरलेली तर कुठे खारी, तर अशी ही विविध प्रकारची माती आम्हाला अन्नधान्य द्यायला समर्थ असते, पण दर वर्षी कोसळणारा पाऊस आणि बेफाम पुरामुळे साडेपाचशे कोटी टन माती वाहून जाते. मातीपैकी ५० कोटी टन माती विविध धरणात जाते. धरणे पाण्याऐवजी गाळानेच भरतात. उरलेल्या पाचशे कोटी टन मातीपैकी जवळपास अडीचशे कोटी टन माती समुद्रात जाते. परिणामी समुद्राची पातळी वाढते, उर्वरित माती विविध नदी पात्रांत आणि सखल भागात जाऊन बसते. ही सकस माती ‘पाण्यात’ गेल्यामुळे आपल्या देशाचे दर वर्षी शंभर-सव्वाशे अब्ज नुकसान होते. कारण मातीचा कस झाल्यामुळे दरसाल शेतीचे उत्पन्न कमी कमी होत जाते. मुख्य म्हणजे माती वाहून गेल्यामुळे होणारे हे नुकसान कायमस्वरूपी असते. ते लवकर भरून येणे शक्य नसते.
१९३०च्या दशकात विख्यात कृषी संशोधक सर अल्बर्ट हॉवर्ड हे भारतात आले होते. त्यांनी चीन आणि भारतातील देशी शेती तंत्राचा खूप आस्थेवाईकपणे अभ्यास केला होता. इतकेच नाही तर या भल्या माणसाने इंदूरच्या महाराजांकडून तीनशे एकर जमीन घेऊन शेतीतील विविध प्रयोग केले होते. हे प्रयोग करताना त्यांनी स्थानिक हवामान, माती, पाऊस आणि पिकांचे उत्पादन या सगळ्यांच्या नोंदी ठेवल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी देशातील पाणी आणि माती यांचा दर्जा उत्तम ठेवणे किती गरजेचे आहे, हे आवर्जून सांगितले होते. एका ठिकाणी ते लिहितात, ‘‘मातीची तब्येत ठीक असेल तर देशाचे आरोग्य चांगले राहील.’’ १९४० मध्ये सर अल्बर्ट यांनी दिलेला इशारा आम्ही आज ध्यानात घेतला तरी खूप काही करता येईल.
Atant darjedaar lekh. Aplya mahiti sagratil ratne vishesh Aahet.