शेवग्याच्या शेंगांचा डांबवणी (आमटी) किंवा भरलेल्या शेंगा म्हटल्या की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. गावची भेट म्हणूनही शेवग्याच्या शेंगा हमखास दिल्या जातात. कोकणात तर प्रत्येक घराच्या मागे शेवग्याचे एक तरी झाड सापडतेच सापडते. या शेंगांच्या विशिष्ट चवीमुळे त्यांना बाजारात मागणीही चांगली असून भावही चांगला मिळतो. शेवग्याची लागवड व्यावसायिक दृष्टीने करून बाजाराची मागणी पूर्ण केल्यास शेतक-यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकेल. वध्र्यात यासाठी जिल्हा कृषी अधिका-यांच्या पुढाकाराने ५०० शेतक-यांनी शेताच्या बांधावर शेवगा लागवड केली आहे. कोकणातील शेतक-यांनी शेवग्याच्या लागवडीसाठी बांधांचा आधार घेतल्यास मोठय़ा प्रमाणावर अर्थप्राप्ती होऊ शकणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधील नवरगाव, आमगाव (जंगली), रायपूर, सोंडी नवरगाव, रिधोरा, शिवनगाव, वडगाव आदी गावांतील शेतक-यांनी आपल्या शेताच्या बांधांवर शेवग्याची लागवड केली आहे. कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी वध्र्यातील जमीन शेवगा लागवडीच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे अचूक हेरले.
आजूबाजूच्या जंगल परिसरातही हे पीक जोमाने येऊ शकते याची खात्री पटल्यानंतर त्यांनी या सहा गावांत महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत ६४० हेक्टरवरील बांधांवर शेवग्याच्या बियाण्याची लागवड करण्यासंदर्भात आठवडाभर शेतक-यांना मार्गदर्शन केले. तसेच शेवगा लागवडीसाठी सहा गावांना पंधरा किलो शेवगा बियाणे कृषी विभागातर्फे उपलब्ध करून दिले. एक किलो बियाण्यासाठी ३ हजार रुपये मोजावे लागतात. यात ३५०० ते ४००० बिया असतात. याचाच अर्थ एक रोप एका रुपयापेक्षाही कमी किमतीत पडते. शेवग्याचे पीक सहा महिन्यात हातात येते. नगदी पीक म्हणून शेवगा फायदेशीर असल्याचे या शेतक-यांना बऱ्हाटे यांनी पटवून दिले. या शेतक-यांनीही बऱ्हाटे यांचा सल्ला लाखमोलाचा असल्याचे ओळखले आणि त्याला त्वरित प्रतिसाद दिला. यासाठी कृषी विभागाने ४८० शेतक-यांना शेवग्याचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे. यातून ५० हजार झाडे तयार होणार असून येत्या सहा महिन्यांत दोन हजार क्विंटल शेवगा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे.
आमगाव (जंगली) गावातील श्यामराव चावरे, बबनराव येवले, दत्तूजी चावरे, वसंतराव जावरे, प्रमोद येवले आदी शेतक-यांनी या उपक्रमात सर्वप्रथम सहभाग घेतला. आपल्या शेतात त्यांनी शेवग्याची लागवड केली आणि या पिकाची विदर्भातदेखील व्यावसायिक शेती होऊ शकते असा विश्वास निर्माण केला. यातून येत्या सहा महिन्यांत २ हजार क्विंटल शेवग्याच्या शेंगा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील, असा अंदाज या शेतक-यांनी व्यक्त केला आहे.
शेवगा या पिकास बाजारात मोठया प्रमाणात मागणी आहे. औषधीगुणयुक्त आणि चविष्ट असणारी शेवगा शेंग बाजारात नेहमीच भाव खाऊन जाते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे शेवग्याला नेहमीच बाजारात चांगला भाव मिळत असतो.
महाराष्ट्रात शेवग्याचे सर्वाधिक पीक हे अहमदनगर जिल्ह्यात घेतले जाते. ब-हाटे हे मूळचे नगरचेच. यामुळे नगरमधूनच त्यांनी कृषी विभागामार्फत दर्जेदार शेवग्याचे बियाणे शेतक-यांना उपलब्ध करून दिले आहे. शेताच्या बांधावर केवळ अवांतर झाडे उगवतात. त्यापासून कुठलेही उत्पन्न मिळत नाही. या जमिनीचा वापर शेवगा लागवडीसाठी केल्यास सहा महिन्यांमध्ये शेतक-यांच्या हाती चांगले पैसे येऊ शकतील. विशेष म्हणजे या सहा गावांच्या परिसरातील शेतीला वन्यप्राण्यांपासून मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागते. मात्र शेवग्याच्या झाडाला अशा प्रकारचा त्रास नसल्याने वन्यप्राण्यांपासून नुकसानीचा धोका नाही. शेतक-यांना नेमकी हीच बाब लक्षात आणून देण्यास कृषी विभागाला यश आले आणि ही योजना लवकर स्वीकारली. यातून शेतक-यांना मिळणारे आíथक उत्पन्नही अधिक असणार आहे. यामुळेच विदर्भात पहिल्यांदाच अशा प्रकारची लागवड करण्यास शेतक-यांनी सुरुवात केली आहे.
भाऊसाहेब ब-हाटे यांनी या पिकाला फळशेती पिकाची जोड देऊन पॅकिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग तसेच सामूहिक मार्केटिंगची जोड देऊन स्थानिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने पुढील काळात योजना राबवली जाणार असल्याचे सांगितले. बऱ्हाटे यांनी विदर्भात नव्या पिकाची मुहूर्तमेढ रोवली असून ती येथील शेतक-यांच्या आर्थिक विकासासाठी निश्चितच फायद्याची ठरेल.
कोकणात चांगला वाव
कोकणातील शेती छोटय़ा-छोटय़ा तुकडय़ांत विभागलेली असल्यामुळे बांधासाठी मोठय़ा प्रमाणावर जमीन वाया जाते. या जागेवर कोकणातील शेतक-यांनी विदर्भाचा शेवगा पॅटर्न वापरल्यास शेवग्याची मोठी लागवड होऊ शकते. विशेष म्हणजे कोकणात या पिकाला असलेली मागणी आणि मुंबईसारखी मोठी बाजारपेठ पाहता चांगला वाव आहे. ठाणे आणि रायगड मुंबईतील बाजारपेठेची मागणी पूर्ण करू शकतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील शेतक-यांनी या पिकाचा पर्याय म्हणून विचार केल्यास स्थानिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणे आर्थिकदृष्टय़ा मोलाचे ठरेल.
शेतातील बांधावरील जागेवर कुठलीच लागवड केली जात नाही. यामुळे लाखो हेक्टर जमीन अशीच वाया जाते. या जागेचा वापर शेतक-यांनी शेवग्यासारख्या रोख उत्पन्न देणा-या पिकासाठी केल्यास त्याचा शेतक-यांना आर्थिकदृष्टय़ा निश्चितच फायदा होईल. – भाऊसाहेब ब-हाटे, कृषी अधीक्षक, वर्धा
सर आपण खूप चांगल काम केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
शेतकरी मित्र सर्वेश कोकाटे