कल्याण शहरात कच-याची समस्या गंभीर बनल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कल्याण – शहरात कच-याची समस्या गंभीर बनल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात तातडीने जंतुनाशक व धूर फवारणी करण्यात यावी, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती प्रकाश पेणकर यांनी शनिवारी झालेल्या सभेत प्रशासनाला दिले. धूर फवारणीसाठी त्वरित भाड्याने गाडया घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या, तुडुंब भरलेली गटारे असे चित्र सध्या कल्याण-डोंबिवली शहरात आहे. शहरातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. शहरात जंतुनाशक व धूरफवारणी होत नसल्याचा आयत्यावेळचा विषय सदस्य प्रमोद पिंगळे यांनी मांडला होता. त्या वेळी सर्वच सदस्यांनी अस्वच्छतेच्या प्रश्नावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. डोंबिवलीपासून ते मोहने, आंबिवली व टिटवाळापर्यंत महापालिके चे कार्यक्षेत्र आहे.
पालिका क्षेत्रात दररोज ५५० मेट्रिक टन कचरा गोळा करते. शहरातील कचराकुंडय़ांची अवस्था बिकट असून, कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे कर्मचा-यांची संख्या वाढवण्याची मागणी शर्मिला पंडित यांनी केली. पालिकेचे उपायुक्त अनिल डोंगरे यांनी सांगितले की, धूरफवारणी करणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे. दररोज सॅनिटरी इन्स्पेक्टर हाताने औषध फवारणी करत आहेत. सध्या १८५ कर्मचारी आहेत. प्रशासनाकडे वाहने येईपर्यंत पावसाळा संपेल. त्यामुळे भाडय़ाने वाहने घेऊन फवारणी मोहीम सुरू करा, असे निर्देश पेणकर यांनी दिले.
Pefrect shot! Thanks for your post!