इतिहासाची पुनरावृत्ती कधी, कशी कोणत्या स्वरूपात होईल हे आपल्याला सांगता येत नाही. ‘भ्रष्टाचार विरोधी आंदोलना’चे प्रणेते अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टीने’ (‘आप’) ज्या पद्धतीने केवळ एक वर्षात दिल्ली विधानसभेत यश मिळवले आहे, ते पाहून इतिहासाच्या पानात दडलेल्या अशाच एका ‘आम आदमी’च्या ‘आप’ आंदोलनाची आठवण होते…
इतिहासाची पुनरावृत्ती कधी, कशी कोणत्या स्वरूपात होईल हे आपल्याला सांगता येत नाही. कधी इतिहास आपली एखादी झलक वर्तमानाच्या पटलावर उभी करतो तर कधी जुन्या काळाला आधुनिक स्वरूपात लोकांसमोर आणतो. अर्थात ही इतिहासाची पुनरावृत्ती प्रत्येक वेळेस लक्षात येतेच असे नाही. ब-याचदा अगदी अचानकपणे ही वस्तुस्थिती डोळय़ांसमोर उभी राहते आणि आपल्याला तिच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देते. ‘भ्रष्टाचार विरोधी आंदोलना’चे प्रणेते अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टीने’ (‘आप’) ज्या पद्धतीने केवळ एक वर्षात दिल्ली विधानसभेत यश मिळवले आहे, ते पाहून इतिहासाच्या पानात दडलेल्या अशाच एका ‘आम आदमी’च्या ‘आप’ आंदोलनाची आठवण होते.
वास्तविक पाहता दिल्लीतील राजकारणात ‘आप’ने मिळविलेल्या यशामुळे निवडणुकीच्या पारंपरिक प्रक्रियेला वेगळे वळण मिळाले आहे. दिल्लीत १५ वर्षे सत्तेत असणा-या शीला दीक्षित यांचा केजरीवाल यांनी पराभव करणे, या गोष्टीकडे जसा काँग्रेसला कानाडोळा करता येणार नाही, तद्वत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये बहुमत मिळविणा-या; परंतु दिल्लीत काठावर पास झालेल्या भाजपलाही या ‘आप’ क्रांतीकडे डोळेझाक करता येणार नाही. कारण राजकारणात होत असलेल्या नव्या बदलांची ही नांदी आहे.
स्वातंत्र्यपूर्वकाळात, जेव्हा प्रशासन, सोयी-सुविधा आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगण्याची साधनेही धुळे- नंदुरबार परिसरातील सातपुडा पर्वतराजीतील जंगलात पोहोचली नव्हती. त्या काळात ‘आपश्री’ गुला महाराज या आदिवासी संताने समाज परिवर्तनाची जोरदार चळवळ उभी करून दुर्गम भागातील दुर्लक्षित लोकांना ‘आवाज’ दिला होता. वारकरी संत-पंरपरा मानणा-या या गुला महाराजांनी ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ या ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीनुसार ‘आप’ या शब्दाची सर्वव्यापी संकल्पना मांडली होती. आपण सर्व परमात्म्याचे अंश आहोत, असे सांगतांना गुला महाराजांनी ‘आप’ म्हणजे जनता जनार्दन. त्याचा विकास महत्त्वाचा. या ‘जनता जनार्दना’ची आरती करा, मूर्ती किंवा तसबिरीत देव नसतो, तो असतो माणसांमध्ये. त्यामुळे जेव्हा आपण एकमेकांना भेटतो त्या वेळी इतर काही म्हणण्यापेक्षा ‘आप की जय’ म्हणा असे गुला महाराज वारंवार सांगायचे. १८ जुलै १९३८ पर्यंत, म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी ‘आप’च्या सर्वागीण विकासाची आस धरली होती. आपल्या लोककल्याणकारी आंदोलनाला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. ‘आदिवासी विकासाचे शिल्पकार’ या पुस्तकात डॉ. गोविंद गारे यांनी गुला महाराजांच्या जनता जनार्दन आरतीचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते लिहितात, ‘दिवेलागणीच्या सुमारास सर्व आरत्या पेटविल्या जात, हजारो आरत्या ‘आप’ तत्त्वास म्हणजे जनता जनार्दनास ओवाळू लागत. सर्व माणसांच्या मस्तकावर त्या हजारो दीपज्योतींचा प्रकाश येत असे. ते रमणीय दृश्य पाहून कोणाचेही मन उदात्त भावनेने उचंबळून आल्याशिवाय राहत नसे.’
आज दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ला मिळालेल्या यशाने कोटय़वधी सुजाण नागरिकांचे चेहरे उजळून निघाले आहेत. दिल्लीतील निवडणूक निकालात सत्तारूढ काँग्रेस आणि सत्ताकांक्षी भाजप या दोन्ही प्रस्थापित पक्षांना ‘आम आदमी’चे अस्तित्व दाखवून देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो पाहून देशातील राजकारणात आता ख-या अर्थाने मतदार राजा प्रकाशझोतात येईल, असे वाटते. त्याचे प्रश्न, त्याचे जगणे अर्थात त्याचे मरणेही नेहमीप्रमाणे काळाच्या काळोख्या पडद्याआड झाकलेले असायचे. ते आता नवजागृतीच्या राजकारणात प्रकाशात येईल.
मुख्य म्हणजे देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाच्या डोक्यात राजकीय हक्काचा-कर्तव्याचा प्रकाश पडल्यामुळे अवघी राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. आम आदमी पक्षाने आपले उमेदवार ठरविताना सर्वसामान्य माणसांना प्राधान्य दिले होते. निवडणूक चिन्ह म्हणून ‘झाडू’ची विचारपूर्वक निवड करून राजकारणातील गलिच्छ प्रकारांची ‘सफाई’ करण्याचा मनसुबा स्पष्ट केला होता. आपला निवडणूक निधी फक्त २० कोटी रुपये असणार आणि तो खुलेपणाने लोकांकडून गोळा केला जाईल, असे केजरीवाल यांनी जाहीर केले होते. ते तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी २० कोटी रुपये जमा होताच निधी घेणे बंद केले. हे सारे भारतीय राजकारणासाठी नवे होते. तीच गोष्ट प्रचार यंत्रणेची. सर्वच राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्त्यांना पैसे आणि इतर अनेक आमिषे दाखवावी लागतात; पण आम आदमी पक्षाने नव्या दमाच्या तरुणांना राजकीय प्रक्रियेत आणून एक चांगला पायंडा पाडला आहे.
समाजात सकारात्मक बदल करण्यासाठी, देशासमोरील महागाईपासून दहशतवादापर्यंतच्या विविध समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच उत्तरे शोधावी, हा या एकूण चळवळीचा हेतू होता. अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनलोकपाल आंदोलन आणि महिलांवरील अत्याचारांविरोधातील ‘निर्भया’ आंदोलनामुळे अवघी दिल्ली घुसळून निघाली होती. त्या वेळच्या जनभावना इतक्या तीव्र होत्या की, वर्षभरानंतरही त्यांची धग कायम होती आणि नेमक्या याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शीला दीक्षित यांना पायउतार व्हावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. त्याची जाण असल्यामुळे चारही राज्यांतील निवडणूक निकालानंतर काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज आहे,’ असे सांगितले आहे. तर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत सत्ता संपादण्यासाठी आवश्यक असणारे बहुमत न मिळाल्याने भाजपात बरीच अस्वस्थता आहे. त्यामुळेच असेल कदाचित भाजप प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांनी ‘आप’च्या यशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
थोडक्यात सांगायचे तर देशाच्या इतिहासात प्रथमच आपल्या राजधानीत सर्वसामान्य माणसाला केंद्रभागी ठेवून राजकारण करण्याचे स्वप्न पाहणारा पक्ष सत्तेच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. या एका घटनेमुळे जर देशातील मतदारांमध्ये आपल्या अधिकारांबद्दल, हक्क आणि कर्तव्याबद्दल जाणीव जागृती होत असेल, तर त्याचे सगळय़ांनी स्वागत केले पाहिजे.
‘आप’ने आम आदमी विधानसभेत जावा यासाठी केलेल्या प्रयत्नांचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे; परंतु दिल्लीतील विधानसभा त्रिशंकू स्थितीत राहणार असेल तर त्यांच्या ‘नवख्या’ आमदारांची भाजपच्या बनेल नेतृत्वाकडून ‘शिकार’ होणार नाही, याची केजरीवाल आणि कंपनीला काळजी घ्यावी लागेल; कारण विरोधासाठी विरोध करणे आणि पदावर आरूढ असताना व्यवस्थेला विरोध करणे या दोन्ही गोष्टी परस्पर भिन्न आहेत. त्यामुळे पुढील काळात ‘आप’ला नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.
भिल्ल आणि अन्य आदिवासी लोकांमध्ये ‘आप मंडळ’ स्थापन करून नवी जागृती निर्माण करणारे गुला महाराज यांच्या निधनानंतर त्यांची चळवळ पुढे नेण्याचे काम त्यांचे भाऊ आणि मुलाने चांगले केले होते. त्यांच्यामुळे संघटित झालेला आदिवासी आपल्या हक्कांसाठी भांडू लागला होता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या इंग्रज प्रशासनाने आणि स्थानिक पुढा-यांनी पद्धतशीरपणे त्या चळवळीचे खच्चीकरण केले. ‘आप मंडळ’ विविध आमिषांच्या मागे लागले. परिणामी उदात्त हेतूने उभी राहिलेली चळवळ मार्गभ्रष्ट झाली. त्याची पुनरावृत्ती ‘आप’च्या या आधुनिक आविष्काराची होऊ नये, एवढीच अपेक्षा!
abhyaspurna lekh…saggla thik pan pudhe kai? AAP kade leadership qualities chi maansa ahet? te ekatra kiti varsha rahu shaktil? yogya netrutva kiti mahatvacha role play karta he congress chya result kade baghun shiknyasarkha naiye ka? badal nishitach changla ahe..pan to tikun rahnyasathi ani vadhnyasathi kai kai karaila lagel yachya suchna dilyas jast prabhavi vatel…suraajya ha pratyek naagrikacha hakka ahe…pan satta tikvun thevnyatach sagli energy kharcha zali tar kaam kadhi ani kase karnar? aaj challenge k saath kuni mahaagaai ani bhrashtaachar kami karun dakhvu shakto ka? satta haasil karne ha jar uddesh navta ya lokancha tar mag raajkarnaat ka aale? raajkaran yedya gabalyancha khel ahe ka?
लेख खूप वास्तव व अपरिचित इतिहासची उत्कृठ सांगड साधणारा आहे. लेखाचा मूळ गाभा हा भारतीय मानसिकता,संघटन कौशल व आपल्या ध्येर्या धोरणाशी प्रामाणिक राहण्याकरिता मोजाव्या लागणारा त्याग बरोबरच निर्धाराचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सामाजिक विचाराची प्रचीती आली धन्यवाद.
Fakt faar avadla itkech…