देशात खासगी वाहनांची संख्या कमालीची वाढली असून, रस्त्यांची अपुरी संख्या, कमी विस्तार यामुळे दररोज वाहतुकीच्या कोंडीला सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर पूर्णत: कोलमडली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. या समस्येवर मेट्रो तसेच भूमिगत रेल्वे हाच एकमेव उपाय आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते.
आपल्या देशात वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. देशातील लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. कार, दुचाकी वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. लांब अंतरावरून कामाच्या ठिकाणी जायचे तर नागरिकांना आपले स्वत:चे वाहन असण्याची गरज भासते आहे. याचे कारण म्हणजे सार्वजनिक परिवहन व्यवस्था म्हणजे बसेसचा काहीही उपयोग नसतो. एक तर त्यांची संख्या अपुरी असते आणि वेळेवर त्या मिळत नाहीत. त्यामुळे बसवर अवलंबून राहणे शक्य नसते. रिक्षा, टॅक्सी भाडे देणे परवडत नाही. अशा वेळी स्वत:चे वाहन घेणे हाच एक पर्याय आपल्याजवळ उरतो आणि तेच केले जाते. पण यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्ते अरुंद आणि व्यवस्थित नाहीत, एकाच रस्त्यावरून सर्वच प्रकारची म्हणजे लहान-मोठी वाहने धावत असतात. बस, ट्रकपासून बैलगाड्या, हातगाड्यांपर्यंत सगळी वाहने एकाच अरुंद रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे आपल्या देशातील वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. पण या समस्येकडे इतर समस्यांकडे केले जाते तसेच दुर्लक्ष केले जात आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना अनेक प्रकारच्या गरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. पण प्रशासनाला त्याची कोणतीही फिकीर नाही.
वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक आहेत ते रस्ते. रस्ते ही कोणत्याही शहरातील मूलभूत सुविधा आहे. ज्या झपाट्याने शहरे आणि गावांचा विस्तार होत आहे, त्याप्रमाणात मूलभूत सुविधांचा विकास करण्यात आलेला नाही. नगरपालिका, महानगरपालिका यांना कमालीच्या मर्यादा आहेत. त्यांच्या उत्पन्नाची साधने अतिशय मर्यादित आहेत आणि त्यामुळे या सुविधा निर्माण करणे त्यांना अशक्य होत आहे. स्वाभाविकच नागरिकांना कमालीच्या गरसोयी सोसाव्या लागतात. रस्ते हाही घटक त्यातलाच एक आहे. रस्त्यांचा विकास जेथे झाला आहे तेथेही तो व्यवस्थित अभ्यास करून केलेला नाही. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न तसाच राहिला आहे.
रस्ता बांधताना किंवा त्याचा विस्तार करताना त्या रस्त्यावरून ये-जा करणा-या वाहनांचे प्रकार आणि पादचारी या दोन्हींचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या देशात मोठ्या शहरांमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर पादचा-यांनी चालण्याची सोयच राहिलेली नाही. त्यांना चालण्यासाठी फुटपाथ बांधलेला असलाच तर त्यावर हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केलेले असते. जिथे फुटपाथ नसतात, तेथे रस्त्याच्या कडेला हे हातगाडीवाले उभे असतात. त्यात जर खाद्यपदार्थाच्या गाड्या असतील तर विचारायलाच नको. त्या गाडीभोवती खाद्यपदार्थासाठी झुंबड उडालेली असते आणि इकडे वाहने पुढे जाण्याच्या प्रतीक्षेत उभी आहेत, याचे भानही खाणा-यांना नसते. ज्या रस्त्यांवर वाहनांची कमालीची गर्दी आणि ये-जा असते अशा ठिकाणी हातगाडीवाल्यांना उभे राहू द्यायचे नाही, हे पथ्य प्रशासनाने पाळले तर ही वाहतुकीची समस्या ब-याच अंशी कमी होईल. कारण या लोकांनी रस्त्याचा मोठा भाग अडवलेला असतो. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यास अतिशय अडचण निर्माण होते. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला विविध वाहने वाट्टेल तशी पार्क केलेली असतात. त्यामुळेही वाहतुकीला अडचण निर्माण होते.
वाहनधारकांनी रस्त्यावरून जाताना थोडी जरी शिस्त पाळली तरी अनेक समस्या सुटतील. हे खरे असले तरी वाहतुकीची समस्या मुळात निर्माण झाली आहे, ती वाहनांची संख्या कमालीची वाढल्याने. वाहनांची संख्या जर कमी झाली तरी वाहतुकीच्या समस्येचे निवारण होईल. यासाठी अर्थातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय मजबूत करावी लागणार आहे. बहुतेक आशियाई देशांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी याच पर्यायावर अवलंब केला आहे. त्यांच्या वाहतूक व्यवस्थेवर लक्ष टाकल्यास त्यातून आपल्या देशातही अशा प्रकारे व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे, हे सहज लक्षात येते.
हाँगकाँग हे आशियातील सर्वात प्रगत शहरांपैकी आहे. या शहरात राहणा-या माणसांना आपले एखादे वाहन असावे, अशी निकड कधी भासत नाही. याचे कारण म्हणजे तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय मजबूत आणि विकसित आहे. तेथील सबवे ट्रेन्स आणि बसेस या जनसामान्यांच्या सवयीच्या आहेत. अर्थात इतर शहरांप्रमाणे तेथेही मिनीबसेस, टॅक्सी आहेत. पण सार्वजनिक वाहतुकीचा बराचसा भार उचलते ती मास ट्रान्झिट रेल्वे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न ब-याच अंशी सुटतो.
कोणत्याही शहरात कुठेही ये-जा करताना लोकांना, अगदी त्यांचे स्वत:चे वाहन नसले तरी समस्या येता कामा नये. यावरूनच ते शहर राहण्यास योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. पाच मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठीही जर गर्दी आणि ट्रॅफिकमुळे पंधरा किंवा वीस मिनिटे लागणार असतील तर तेथील स्थिती किती बिकट आहे, हेच यातून दिसून येते. सिंगापूरमध्येही या समस्येची सोडवणूक करण्यासाठीच तर सबवेचे जाळे सगळीकडे पसरले आहे.
शहरांमध्ये राहणे सुसह्य व्हावे यासाठी बहुतेक आशियाई देशांची सरकारे शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक प्रबळ करण्याचा आणि विस्तारित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करणे म्हणजे रस्त्यावर केवळ बसेस, टॅक्सी किंवा ऑटोरिक्षांची संख्या वाढवणे नाही. हे एवढेच करणे पुरेसे असते तर भारतातील सगळी महानगरे जगातील अव्वल दर्जाची शहरे बनली असती. पण तशी ती नाहीत आणि वाहतुकीच्या समस्येच्या गत्रेत ती पूर्णपणे अडकली आहेत. म्हणूनच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वव्यापी आणि जलद असायला हवी. तीही जर रस्त्याच्या खालून असेल तर त्यातून वाहतुकीची समस्या निर्माणच होणार नाही.
मलेशियाची राजधानी कौलालंपूर येथील क्लँग व्हॅलीतील वाहतूक व्यवस्था अशा त-हेनेच विकसित होत आहे. तेथील बसेसचा मार्ग कमी गर्दीच्या रस्त्यांवर बदलण्यात येत आहे, रेल्वेचे नेटवर्क अधिक विस्तारण्यात येत आहे.
बसेस, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा यापेक्षा रेल्वे हा वाहतुकीचा सर्वात उत्कृष्ट पर्याय आहे. याचे कारण म्हणजे रस्त्यांवरून धावणा-या वाहनांत प्रवाशांची संख्या मर्यादित असते आणि त्यामुळे स्वाभाविकच वाहनांची संख्या वाढवावी लागते. मात्र रेल्वेचे तसे नाही. रेल्वेतून एकावेळी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू शकतात आणि रेल्वेचा मार्गच वेगळा असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यासाठीच देशातील मोठ्या शहरांत मेट्रोचे जाळे वाढणे आवश्यक आहे. आशियाई देशांतही याच पर्यायाचा जास्त करून विचार केला जातो. चीनमध्ये तर अकरा शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित करण्यात आले आहे. आपल्या देशात अजूनही विकसित शहरांमध्येही मेट्रो किंवा सबवे रेल्वेच्या पर्यायाचा विचार केलेला नाही. कोलकाता आणि दिल्ली वगळता इतर शहरांत मेट्रो नाही. मुंबईत लोकल ट्रेन्सचे जाळे चांगले आणि प्रभावी आहे. पण त्याचा विस्तार आणि विकास झालेला नाही. त्यामुळे आहे त्या रेल्वे ट्रॅफिकवर गर्दीचा ताण पडतो आहे.
आपल्या देशात गरज आहे ती विकासाच्या कल्पना स्पष्ट असलेल्या नेत्यांची आणि अभियंत्यांची. प्रत्येक बाबतीत राजकारणाचाच विचार करणा-या आपल्या देशात मूलभूत सुविधा पुरवतानाही राजकारण केले जाते. परिणामी सर्वसामान्यांचे हाल नित्याचे झाले आहेत. रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचे जाळे वाढवले तर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी संपण्याची शक्यता निर्माण होईल.
व्हेरी अँप्रेसिअतिवे सय आहे . इ salute the written.