विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधकांकडून सरकारला जेव्हा जेव्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा- तेव्हा उद्योगमंत्री नारायण राणे विरोधकांना सडेतोड उत्तर देतात.
कधी कधी त्यांच्या विभागाचा प्रश्न नसला तरी संबंधित मंत्री अडचणीत येत आहेत, असे दिसले की राणे त्यांच्या मदतीला धावून जातात. त्यांच्या या क्षमतेवर सर्वानाच विश्वास आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी त्यावर जणू शिक्कामोर्तबच केले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चा सुरू झाली. पहिलीच लक्षवेधी सूचना भाजपचे सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थितीत केली.
राज्य रस्ते व रेल्वे वाहतुकीवर पडत असलेला ताण आणि तो कमी करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार याविषयीची ती लक्षवेधी होती. ही लक्षवेधी बंदरे विभागाला उद्देशून विचारली असली तरी त्यात अनेक खात्यांचा संबंध आहे. त्यावर उत्तर कोण देणार, असा प्रश्न विचारत सरकारविरोधात लोढा यांनी आक्रमक होण्याचा प्रयत्न केला.
कोण उत्तर देणार आहे, असे त्यांनी विचारताच सभागृहात उपस्थितीत असलेले बंदरेमंत्री राणे म्हणाले, ‘मैं हूँ ना!’ राणे यांनी ज्या जोशात प्रतिसाद दिला ते ऐकून लोढा यांचा आवाज आपोआपच कमी झाला. त्यावर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे म्हणाले की, या लक्षवेधीतील बराचसा भाग हा, नगरविकास विभागाशी संबंधित असल्याने मुख्यमंत्र्यांना या सभागृहात बोलवावे. मग ही लक्षवेधी सुरू करावी. त्यावर अध्यक्ष म्हणाले मुख्यमंत्री वरच्या सभागृहात आहेत. त्यामुळे त्यांना वेळ लागेल. म्हणून ही लक्षवेधी मागे ठेवायची का, असा सवाल त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना विचारला.
या लक्षवेधीवर अधिक खुलासा करताना राणे म्हणाले, मुळात यात अनेक विभागांचा संबंध आहे. एक लक्षवेधी किती खात्याशी संबंधित असावी याचा काही विचार झाला पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.
त्यावर अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, ‘मी हतबल आहे.’ राणे म्हणाले की, असे म्हणून कसे चालेल अध्यक्ष महोदय. त्यावर काहीतरी नियंत्रण असले पाहिजे. त्यावर अध्यक्ष म्हणाले, सभागृहातील लोकांना खात्री आहे, त्याचे उत्तर देण्यास आपण समर्थ आहात. मलाही विश्वास आहे की, राणेसाहेब कोणाच्याही मदतीशिवाय सर्व खात्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. त्यावर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे म्हणाले की, ‘अध्यक्ष महाराज, त्यांची क्षमता आम्हाला माहित आहे. मात्र त्यांना संधी दिली जात नाही. त्यांना संधी दिली, तर ते आपली क्षमता सिद्ध करतील.’ त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
नारायण राणे हे अफाट कार्यक्षमता असलेले मंत्री आहे.त्यांना फालतू वेळ घालवणे,कागदी घोडे नाचविणे आवडत नाही.एक घाव दोन तुकडे असा त्यांचा बेधडक दे धडक स्वभाव आहे,पण त्यांना पक्षाकडून योग्य पद,जबाबदारी दिली जात नाहीकारण पक्ष श्रेष्ठींना राणे त्यांना डोईजड होतील अशी साधार भीती वाटते.