भारताची ‘मंगळ’यान मोहीम फत्ते होण्यास आता केवळ ११ दिवसांचा कालावधी राहिला असून या यानाने पृथ्वीवर संदेश पाठवायला प्रारंभ केला आहे.
चेन्नई- भारताची ‘मंगळ’यान मोहीम फत्ते होण्यास आता केवळ ११ दिवसांचा कालावधी राहिला आहे. या यानाचा प्रवास सुरळीत सुरू असून त्याने पृथ्वीवर संदेश पाठवायला प्रारंभ केला आहे. या यानाने २११ दशलक्ष किलोमीटर अंतर कापले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) दिली.
मंगळयानातील सर्व यंत्रणा सुरळीत सुरू असून सेन्सर्सच्या सहाय्याने विविध संदेश पाठवायला त्याने सुरुवात केली आहे. मंगळयानातील २.२ मीटर उंचीच्या अँटेनाच्या सहाय्याने हे संदेश पाठवले जात आहेत. मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी या यानाला ४ दशलक्ष किलोमीटर अंतर शिल्लक राहिले आहे, असे ‘इस्त्रो’ने स्पष्ट केले.
येत्या २४ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत प्रवेश करताना ‘इस्त्रो’च्या संशोधकांसमोर मोठे आव्हान आहे. कारण गेले दहा महिने सुप्तावस्थेत असलेले यानातील ‘लिक्विड इंजिन’ सुरू करावे लागणार आहे.
गेल्यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी मंगळयान आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून रवाना झाले होते. या प्रकल्पाला ४५० कोटी रुपये खर्च आला आहे. या प्रकल्प यशस्वी झाल्यावर भारतीय संशोधकांना अधिक चांगले अंतराळ संशोधन करता येऊ शकेल.
ब्रावो इस्रो !!!
मेरा भारत महान !!!!