कामगारांवर अन्याय, अपमान, सूड भावनेने वागणे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी दिला.
मुंबई- कामगार घाम गाळून कष्ट करतात. त्यांना त्याचे हक्क मिळाले पाहिजेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सैन्यदलातून निवृत्त झालेले अधिकारी सक्सेना येथे आल्यापासून सैन्यातील कायदे दाखवत कामगारांवर अन्याय करीत आहेत. त्यांचा अपमान करीत आहेत. ते जर कामगारांशी सूड भावनेने वागणार असतील तर ते कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी दिला. कामगारांशी सौजन्याने वागल्यास कामगार कंपनीला प्रगतीकडे नेण्यास नक्कीच सहकार्य करतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. कंबाटामधील कामगारांनी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सहार पोलीस ठाण्यावर धडक दिली.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हॅण्डलिंगचे काम कंबाटा एव्हीएशन प्रा. लि. या कंपनीतर्फे केले जाते. या कंपनीत सुमारे २७०० कामगार आहेत. त्यातील बहुसंख्य कामगार ‘महाराष्ट्र समर्थ कामगार संघटने’चे सभासद आहेत. हे कामगार नेहमी कंपनीशी सहकार्याच्या भावनेतून काम करीत आलेले आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वी सैन्य दलातून निवृत्त झालेले अजय सक्सेना एचआर म्हणून कंपनीत दाखल झाले आहेत. ते आल्यापासून कामगारांशी अत्यंत अरेरावीने वागतात. कोणताही प्रश्न घेऊन गेल्यास त्यांना अपमानित केले जाते.
ही बाब महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली होती. तरीही त्यांच्या वागण्यात कोणताही फरक न पडल्याने बुधवारी कामगारांनी सहार पोलिस ठाण्यावर नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली धडक दिली. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणा-या कामगारांवर अन्याय केला जात आहे. किरकोळ चूक झाली तरी त्याला निलंबीत किंवा बडतर्फ केले जाते. सक्सेना यांनी अगोदर कामगार कायदा समजून घ्यावा. तुमच्या आर्मीतले नियम इथे चालणार नाहीत. कामगार आणि कंपनी यांचे नाते कुटुंबासारखे असते.
मात्र हे नाते न पाळता सक्सेना जर सूडबुद्धीने वागणार असतील तर ते कदापी सहन केले जाणार नाही, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला. यावेळी कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. त्याची एक प्रत कंबाटा एव्हीएशनचे सीओओ पॅट्रीक कॅसर्ली यांनाही पाठविण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रवीण नलावडे, उपाध्यक्ष शरद सावंत, जगदीश अमिन, संदीप राणे, बाळा कसालकर, सरचिटणीस विश्वनाथ दळवी, भाई सावंत, कार्यालय प्रमुख राजा गावडे उपस्थित होते.
‘महाराष्ट्र समर्थ कामगार संघटने’चे अध्यक्ष “नितेश राणे” साहेब यांना अशी विचारणा आहे कि जेव्हा एखाद्या कंपनीत नवीन कामगार निवडला जातो, तेव्हा त्याची योग्यता बघूनच नंतर त्या कामगारास योग्य त्या पदावर रुजू करण्यात येते. पण किंत्येक सरकारी आणि खाजगी कंपनीत एखादी व्यक्ती जी मरमर काम करते त्याच व्यक्तीकडून सारखी कामे करून घेण्याची कोणती प्रथा आहे? तसेच दुसरीकडे मला हे येतच नाही, तुम्ही दुसऱ्या कोणाकडून ते करून घ्या, अशी कारणे देऊन ते बसून महिन्याचा पगार उचलतात, अशा वेळेस जर कंपनीने त्या व्यक्तीस “Terminate” केले, तर तुमची संघटना त्या व्यक्तीस मदत करणार का? किंवा एखाद्या व्यक्तीकडून ४ ते ५ वर्षे काम करून घेतले आणि आता त्या विभागात काम नसताना इतरत्र विभागात कामासाठी बकरा मागवण्यात आला, तर त्या व्यक्तीने दुसऱ्या विभागात जाऊन कामे करावी का? कारण जेव्हा तो ४ ते ५ वर्षाआधी कामे करत होता, तेव्हा दिवसातील ८ तास नव्हे तर १२ ते १४ तास कामेकरून नंतर घरी जात होता आणि तेव्हा त्याच्या मदतीस जे विभाग टंगळ मंगळ करीत कामे करीत होती, ती कधीच आली नाही. पण भडास काढण्याकरिता तेच विभाग जर त्या व्यक्तीस साहेबाच्या धमकावाण्यावरून बोलावून घेते आणि त्याच्या विभागातील व्यक्ती पुन्हा टंगळ मंगळ करीत कामे करत सर्व कार्यभार दुसऱ्या विभागातील व्यक्तीवर सोपवून निश्चिंत जात असतील, तर त्या व्यक्ती बद्दल आपली प्रतिक्रिया काय व कशा प्रकारे असावी? संघटना असावी पण खरा खुऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता, नाहीतर उगिच कोणी तरी खोटे अश्रू वाहवत संघटनेकडे येते आणि संघटना त्या व्यक्तीच्या बाजूने उभी राहते असे होऊ नये.