बोलले! अखेर बोलले! कोण बोलले? मोदी बोलले! गेले कित्येक महिने मोदी बोलत नव्हते. म्हणजे भाषणे देत होते. हातवारे करत होते. नौटंकी सुरू होती; पण देशातल्या मुख्य प्रश्नांची चर्चा सुरू झाली की, मोदी बोलत नव्हते.
बोलले! अखेर बोलले! कोण बोलले? मोदी बोलले! गेले कित्येक महिने मोदी बोलत नव्हते. म्हणजे भाषणे देत होते. हातवारे करत होते. नौटंकी सुरू होती; पण देशातल्या मुख्य प्रश्नांची चर्चा सुरू झाली की,
मोदी बोलत नव्हते.
संसदेतही बोलत नव्हते. ‘व्यापम’ घोटाळय़ात ४८ माणसे मारली गेली. पुराव्यानिशी आरोप झाले. मोदी बोलत नव्हते. सुषमा स्वराज आणि वसुंधराराजे यांनी हद्दपार ललित मोदीला बेकायदेशीररित्या मदत केली.
मोदी बोलत नव्हते.
संसदेमध्ये अनेक आरोप झाले. पुरावे दिले गेले; पण एवढे महत्त्वाचे मुद्दे सोडून बाकी सगळी भाषणे मोदी करत होते. पण मुख्य आरोपांबद्दल
मोदी बोलत नव्हते.
लोकसभा निवडणुकीत मोदींनी सगळा देश पिंजून काढला. लंबीचौडी भाषणे केली. तिकीट लावूनही भाषणे झाली. लोकांनी गर्दी केली. महागाई कमी करू म्हणून आश्वासने दिली. परदेशातला काळा पैसा आणू, अशीही आश्वासने दिली. बँकेत खाते असलेल्यांच्या नावावर या काळय़ा पैशातले प्रत्येकी १५ लाख रुपये खात्यावर चढवू, अशीही आश्वासने दिली गेली. भ्रष्टाचार थांबवण्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्याला चांगला भाव देऊ, असेही सांगण्यात आले. लोकांनी मोदींना सत्तेत बसवले. यातला एकही प्रश्न सुटला नाही. म्हणून लोक प्रश्न विचारू लागले. ‘कुठे आहेत अच्छे दिन?’ महागाई कमी का होत नाही? परदेशातून काळा पैसा का आणत नाही? लोक प्रश्न विचारू लागले. पण
मोदी बोलत नव्हते..
सोळा महिन्यांत ४६ देश मोदींनी पालथे घातले. आपल्या देशाची बदनामी परदेशात होईल, अशी भाषणे केली. स्वत:ची जाहिरातबाजी केली. मोठी गुंतवणूक आणू, असे सांगितले. आपल्या देशातल्या खजिन्यातल्या देणग्या दुस-या देशांना वाटून टाकल्या. ४६ देश फिरून झाले. मौजमजा झाली. देशाला काही फायदा झाला नाही. मोदी महाराज परदेशातून परत आले. किती गुंतवणूक आणली? लोक प्रश्न विचारू लागले. परदेश दौऱ्यावर दीडशे कोटी खर्च केले; पण पाच पैशाची गुंतवणूक काही आणली नाही. मग टीका होऊ लागली. पण,
मोदी बोलत नव्हते.
असे सोळा महिने गेले. त्यांनी झाडू हातात घेतला. त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यांनी योगा करून दाखवला. त्याला प्रसिद्धी मिळाली. ‘मन की बात’ सुरू झाली. त्याचीही जाहिरात झाली. ‘दिल की बात’ झाली. त्याच्याही पान पान जाहिराती झाल्या. ‘काम की बात’ काही होत नव्हती. त्यावर टीका झाली. तरी
मोदी बोलत नव्हते.
पण, परवा बोलले.. काय बोलले! तर दादरीमध्ये एका निरपराध मुस्लीम माणसाला दोनशे जणांच्या जमावाने मारून टाकले. याबद्दल देशभर संताप व्यक्त होत असताना घडलेल्या घटनेनंतर देशाच्या पंतप्रधानांची वाचा उघडली आणि ते बोलले. काय बोलले! तर दादरीची घटना वाईट; पण त्याला केंद्र सरकार जबाबदार नाही..
मोदींकडे सगळी यंत्रणा तयार असेल. त्यांचा ‘पीआर’ चांगला आहे. त्यामुळे दादरी प्रकरणातला छापलेला प्रत्येक शब्द त्यांच्या टेबलावर गेलेला आहे. यात कोणीही, कधीही दादरी येथील हत्येला केंद्र सरकार जबाबदार आहे किंवा मोदी जबाबदार आहेत, असे चुकूनही म्हटलेले नाही. तेव्हा जे म्हटले नाही त्याबद्दल मोदींनी खुलासा करणे निर्थक आहे. देशातील लोकांचा मुख्य आक्षेप कशावर आहे? आक्षेप आहे तो दादरीची घटना घडण्यामागे देशात मोदींमुळे जे धार्मिक उन्मादाचे आणि असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्याला. त्यातूनच ‘व्यापम’मधील हत्या होत आहेत. त्यातूनच दादरीमध्ये घरात गोमांस शिजवल्याच्या अफवेतून मुस्लीम बांधवाची हत्या करण्यात आलेली आहे. मोदींवरचा पहिला आक्षेप असा आहे की, त्यांनी या समाजात दिवसाढवळय़ा धटिंगणपणा केला तरी, कायदा हातात घेतला तरी, कोणाचीही हत्या केली तरी, आपले काहीही वाकडे होणार नाही, अशी जी भावना निर्माण करण्यात आलेली आहे, त्या भावनेच्या मागे सरकार आहे. आक्षेप त्याला आहे. प्रत्यक्ष मोदी हत्या करायला आलेले, असे कोणीच म्हटलेले नाही. व्यापम घोटाळय़ात मोदींचा थेट संबंध आहे, असेही कुणी म्हटलेले नाही; पण समाजजीवनात हे जे कोणालाही न जुमानण्याचे, कायद्याबद्दल बेफिकीर राहण्याचे आणि ‘आता आपले सरकार आहे. आपले कोण वाकडे करू शकणार आहे?’ अशी गुर्मी निर्माण झाली आहे, याच्यामागे मोदींची सत्ता आहे. पंतप्रधानांचा देशाला धाक वाटत नाही. सरकारचा धाक वाटत नाही, कायद्याचा धाक वाटत नाही. ‘आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही,’ अशी बेलगाम प्रवृत्ती समाजात जेव्हा निर्माण होते तेव्हा नकळत अराजकाची स्थिती सुरू होत असते. मोदींच्या राज्यात हे अराजक अलगदपणे या देशात अवतरलेले आहे. त्या अराजकाची मानसिकता मोदींच्या धटिंगणपणामुळे निर्माण झालेली आहे आणि म्हणून दादरी घटनेला केंद्र सरकार थेट जबाबदार नाही; पण दोनशे लोक एकाची हत्या करायला जेव्हा तुटून पडतात तेव्हा तो धटिंगणपणा मोदींनी निर्माण केलेला आहे. त्याबद्दल मोदी बोलत नाहीत आणि जे बोलतात ते संदर्भहीन बोललेले आहेत. त्यामुळे मोदी बोलले; पण जे बोलायला हवे ते बोललेले नाहीत.
अहो, त्यांच्या पक्षातल्या लोकांनीच त्यांची कोंडी केली आहे. विकासाच्या राजकारणाला सुरुंग लावण्यासाठी, मोदींना हटवण्यासाठी हे सर्व चालू आहे…