परीक्षेला जाताना न विसरता देवळात जा, बाप्पाला नमस्कार कर म्हणजे पेपर सोपा जाईल, तिन्हीसांजेच्या वेळी नमस्कार केला नाही तर बाप्पा चांगली बुद्धी देत नाही, असं सांगणारे आईवडील जसे असतात, त्याप्रमाणेच नित्यनेमानं देवळात जाणं, नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजणं, गायीला चारा खाऊ घालणं या सगळ्या धार्मिक क्रिया श्रद्धेनं करणारा मुलांचा वर्गही थोडयाफार प्रमाणात समाजात दिसून येतो.
एका घरी एका शाळकरी मुलीनं कमालच केली. तिच्या घरचे सगळेच दत्तगुरूंचे भक्त होते. मुलीचे आईवडील हे दोघंही खासगी कंपन्यांमध्ये मोठया हुद्दयांवर आणि कामात अहोरात्र बुडलेले. तरीदेखील दोघंही दर गुरुवारी आपली सगळी कामं लवकर आटोपून वेळेवर घरी येत. सायंकाळी साग्रसंगीत पूजा करत आणि न चुकता नवेद्याचं जेवण होई. दोघंही हे सारं खूपच मनापासून करत होते. एरवी कामामुळे जेवण, स्वयंपाकघर यामध्ये लक्ष घालता येत नसलं तरी दर आठवडयाचा गुरुवार हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा! कधी कधी तर गुरुवारचं काम रविवारी सुट्टी न घेताही केलं जात होतं. पण अशाच एका गुरुवारी घरी आई गुरुवारच्या नवेद्याच्या गडबडीत असताना मुलीनं कहरच केला. ती आईला म्हणाली, ‘‘तुम्ही दर गुरुवारी देवाला नवेद्य दाखवता म्हणजे तुम्हालाच ‘छान जेवण’ जेवायचं असतं. नाहीतर बाकीचे दिवस घरी जेवणात ‘शॉर्टकट’ असतात.’’ या बारा-तेरा वर्षाच्या मुलीच्या तोंडचं हे वाक्य आईनं ऐकलं आणि पुढच्याच क्षणी मुलीच्या डोळ्यांसमोर तारे चमकले! या उदाहरणाबाबतीत ‘आईवडिलांचा सश्रद्ध भाव मुलीला का बरा समजू नये?’ असा प्रश्न सहजरीत्या डोक्यात आला.
हल्ली तिन्ही सांजेच्या वेळचं शुभंकरोति, परवचा या प्रकारचे मौखिक संस्कार बहुतांश घरातून गायब झालेले आहेत (निदान ‘शांघाय’ होण्याच्या वाटचालीवर असलेल्या गगनचुंबी इमारतींच्या शहरांमधून तरी!) म्हणूनच येणा-या पिढयांमधील मुलांना देव, श्रद्धा या सगळ्या गोष्टी समजावून कशा सांगायच्या? सकाळ-संध्याकाळी देवाला, घरातल्या मोठया माणसांना नमस्कार करावा, हा संस्कार कसा रुजवायचा? असं मोकळेपणानं विचारणारे अनेक पालक आढळतात.
मागील लेखात आपण पाहिलं की, जर सत्य स्वीकारण्याची आपल्या मनाची ताकद नसेल तर पळवाटा शोधल्या जातात. आहे ती परिस्थिती न स्वीकारता, स्वत:च्या कल्पनाविश्वात रमणं वा ‘एक दिवस माझा असेल’ असं म्हणत नुसतं बसून राहणं! याचं फार उत्तम उदाहरण म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडलेली आणि ज्यांच्या डोळ्यासमोर निश्चित ध्येय नाहीत अशी मुलं. जी एक दिवस सारं काही ठीक होईल, या आशेवर आपली वाटचाल सुरू ठेवतात. बरं अशा मुलांशी चर्चा केल्यावर लक्षात येतं की, त्यांच्या या मनोवृत्तीला ‘स्र्२्र३्र५ी ३ँ्रल्ल‘्रल्लॅ म्हणजेच सकारात्मक विचारसरणी’ असं गोंडस नावही दिलेलं असतं. पण प्रत्यक्षात सकारात्मक विचारसरणी आणि फसवा आशावाद यांच्यातील सूक्ष्म रेषा चटकन लक्षात येत नाही. दिवसाढवळ्या उघडया डोळ्यांनी स्वप्न पाहणं, सारं काही ठीक होईल, असा आशावाद बाळगत समोर आलेल्या ब-याचशा संधींवर पाणी सोडणं, हे कितपत योग्य आहे? पण स्वत:वरचा फाजील आत्मविश्वास आणि इतरांकडून असलेल्या अपेक्षांनी आपल्याला यश मिळणार आहे का? सत्य परिस्थिती न स्वीकारता असलेल्या फसव्या आशांसोबत अपेक्षाही जोडल्या जातात.
अगदी छोटी उदाहरणं द्यायची, तर माझ्या आईवडिलांनी परीक्षांच्या दिवसात जर माझा अभ्यास घेतला असता, तर मला नक्कीच चांगले गुण मिळाले असते, अमूक वा तमूक क्लासला गेलो असतो तर माझ्या मित्रांमध्ये मीच पहिला आलो असतो वा असते, अशी कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. कष्ट न घेण्यामागे स्वत:मधील आळशीपणा वा घेतलेल्या कष्टांमागे योग्य मार्गदर्शनाचा अभाव असेल, तेव्हा देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि मग अपयशाचं खापरही त्याच्याच माथ्यावर फोडलं जातं.
आपण जे कष्ट घेतो त्याचं फळ हे केवळ योग्य मार्गदर्शन आणि दिशा यांवरच ठरत असेल, तर श्रद्धा, विश्वास यांची नेमकी भूमिका काय? आणि त्या मुलांना कशा समजवायच्या? वर दिलेल्या उदाहरणात आईवडिलांच्या कष्टांच्या जोडीला त्यांची देवावर श्रद्धाही आहे. पण दुर्दैवानं बारा-तेरा वर्षाच्या मुलीच्या ती लक्षात आली नाही. साधारणत: बारा ते अठरा या वयोगटात देवावर विश्वास ठेवावा की ठेवू नये? श्रद्धेनं देवपूजा करणारा एखादा मुलगा किंवा मुलगी असेल. पण त्याच्या/तिच्या मित्रमैत्रिणींनी त्यांना चिडवलं, त्यांचे विचार या मुला-मुलीपेक्षा जर भिन्न असतील तर कदाचित मुलं डगमगतीलही. पण अशा वेळी पालकांचं, घरातील इतर मंडळींचं तेही मुलांच्या वाढीच्या वयात बदलत जाणारी मानसिकता लक्षात घेऊन त्यांना समजावणं, हे अत्यंत गरजेच असतं. यातून त्यांची सद्सदविवेकबुद्धीच त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. या डगमगलेल्या मुलांना समजावताना एक गोष्ट त्यांना नक्कीच सांगा. कथेचा लेखक, मूळ स्रेत काहीच माहीत नाही, पण भावार्थ मात्र कायम लक्षात ठेवण्याजोगा
पेन्सिल बनवणा-या एका माणसानं पेन्सिली बनवल्या आणि त्यांना पेन्सिलबॉक्समध्ये ठेवण्याआधी काही समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, ‘मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगेन, त्या जर ऐकल्यात तर तुम्ही जगातील सर्वात सुंदर पेन्सिल व्हाल!’
एक : तुम्हाला ब-याच अप्रतिम गोष्टी साकारता येतील, पण जेव्हा तुम्ही स्वत:ला सर्वस्वी कोणाच्या हातात सोपवून द्याल तेव्हाच.
दोन : तुम्हाला वेळच्या वेळी टोक काढताना असह्य वेदना होतील, पण एका उत्कृष्ट रेखाटनासाठी ते अत्यावश्यक आहे.
तीन : तुमच्याकडून झालेली कोणतीही चूक तुम्हाला दुरुस्त करावी लागेल.
चार : तुमच्या आत जे आहे (शिसे – रेखाटनाचा मूळ स्त्रोत), ते सर्वात महत्त्वाचं! त्याला जपलं पाहिजे.
आणि पाच : तुम्ही कोणत्याही पृष्ठभागावर वापरल्या जाल, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमची खूण ठेवायची आहे. कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता तुम्हाला फक्त लिहीत जायचं आहे.
पेन्सिलींना सारं काही समजलं आणि या पाच गोष्टी लक्षात ठेवण्याचं त्यांनी वचनही दिलं आणि एका विशिष्ट हेतूनं त्या खोक्यात शिरल्या.
आता पेन्सिलीच्या जागी तुम्ही स्वत:ला ठेवा. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हीही एक उत्कृष्ट माणूस बनू शकता. त्यासाठी फक्त पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
एक : जर तुम्ही शरणागत भावानं स्वत:ला परमेश्वराच्या हाती सोपवलंत तर तुम्ही अनेक अप्रतिम गोष्टी साध्य करू शकता.
दोन : आयुष्यात येणा-या अनेक संकटांमुळे वेळच्या वेळी तुम्हाला दु:खद टोचण्यांतून जावं लागेल, पण एक कणखर माणूस बनण्यासाठीच्या या महत्त्वाच्या पाय-या आहेत, हे लक्षात ठेवा.
तीन : तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला मान्यही करायच्या असतात आणि त्या वेळोवेळी सुधारायच्या असतात.
चार : तुमच्यातील सर्वात महत्त्वाचा घटक हा तुमच्या आतमध्ये (अंत:करणात वास करणारा परमेश्वर) आहे.
आणि पाच : तुम्हाला प्रत्येक पायवाटेवरून चालायचं आहे आणि नुसतंच चालायचं नाही तर त्यावर तुमचे ठसेही उमटवायचे आहेत. दरवेळी परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाही, म्हणूनच आहे त्याच्याशी जुळवून घेऊन तुमच्या कर्तव्यांना तुम्हाला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे.
पेन्सिलींना सांगितलेल्या या पाच गोष्टी आपण कायम लक्षात ठेवून त्या आचरणात आणून, मुलांनाही त्या समजावून सांगायला हव्यात.
Sundar lekh ahe.palakanni awarjun wachava asa!
Sanskar karayala wel hawa asato . Ajache aai-wadil swataha madhe gurphatale ahet. .Kamache thikan ani wel yanchi sangad ghalata nahi ali tar mulana wel tari kasa denar ? khary na. Mag mul kadhi mothi hotat ani tyanchya Sanskarit garaja kai ahet? he mulat samjaun ghene mahattwachhe tharel.