राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांच्यासह रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर सोमवारी सकाळी कदम यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती.
चिपळूण- जलसंपदामंत्री सुनील तटकरे, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यावर भास्कर जाधव यांनी जे आरोप केले आहेत आणि खालच्या थराला जाऊन शब्दप्रयोग करीत भाषा वापरली, या सर्व प्रकाराचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्व पदाधिकारी निषेध करीत आहोत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती चिपळूण राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पक्ष कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भास्कर जाधवांविरोधात निदर्शने केली. या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पेढांबे येथील समाज मंदिराचा उद्घाटन सोहळा भास्कर जाधव यांच्या हस्ते नुकताच झाला. या वेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यासह रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पत्रकार परिषद घेऊन चोख उत्तर दिले. खताते म्हणाले की, तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी कोकण राष्ट्रवादीमय केले. माजी आमदार रमेश कदम ४० ते ४५ वर्षे तालुक्यामध्ये जनसामान्यांचे काम करीत आहेत. अशा लोकांबाबत जाधव मनात येईल ते बरळत आहेत.
पेढांबे येथील समाज मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी समाज मंदिर अथवा समाज विकासाबाबत काहीही न बोलता पोटात असलेली गरळ जाधव यांनी ओकली. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांवरच खालच्या पातळीवर जाऊन टीका, अश्लील भाषा वापरत उणीदुणी काढली. जाधव यांना कमी कालावधीत पक्षात मानाची पदे मिळाली. त्यामुळे त्यांना पदाची किंमत राहिलेली नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची काम करण्याची लायकी नाही, असे सांगताना त्यांची तक्रार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
‘जयेश बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी’
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांच्यासह रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर सोमवारी सकाळी कदम यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. या वेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांची समजूत काढत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नका, असे सांगितले. मात्र, तेथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
mala vatat ki rane sahebanni bhaskar jadhav la congress madhe ghyave