मुंबईकरांच्या जीवावर येणारा कुठलाही प्रकल्प असो, या प्रकल्पांना विरोध करणा-या सर्वसामान्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन, असे ठाम आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिले आहे.
मुंबई- आरे कॉलनी वसाहत असो की गिरगाव असो, मेट्रो प्रकल्प असो की सामान्य मुंबईकरांच्या जीवावर येणारा कुठलाही प्रकल्प असो, या प्रकल्पांना विरोध करणा-या सर्वसामान्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन आणि जरूर तर उद्या रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करायलाही मागेपुढे पाहणार नाही, असे ठाम आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज दिले आहे.
गिरगाव चौपाटी ते ओबेरॉय हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोकांनी उभे राहून मानवी साखळी तयार केली होती. ‘आरे वाचवा, गिरगाव वाचवा, पर्यावरण वाचवा,’ असे फलक हातात घेऊन हजारो नागरिक रस्त्यावर दुर्तफा उभे होते. या सर्व आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून श्री. नारायण राणे यांनी म्हटले आहे, ‘सामान्य माणसाच्या आयुष्यावर वरवंटा फिरवण्याचे काम या मुंबईत जे कोणी करतील, त्यांना प्रखर विरोध करण्याची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही.’
५०० चौरस फुटांपेक्षा कमी असलेल्या घरांना मालमत्ता कर लावणे किंवा २०००नंतरच्या झोपडय़ांना पाणी न पुरवणे ही भूमिका महापालिकेतल्या सत्तारूढ शिवसेनेने घेतली आहे. या दोन्ही भूमिकांना प्रखर विरोध राहील, असे सांगून श्री. नारायण राणे पुढे म्हणाले की, पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी जागेत या मुंबईतला गरीब मुंबईकर राहत आहे. त्याला मालमत्ता कर लावून या गरीब माणसाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान केले जाणार असेल तर आम्ही बघ्याची भूमिका घेऊ असे कोणी समजू नये. या विरोधातही प्रखर आंदोलन उभे राहील, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.
एल.बी.टी. रद्द करून सरकारने वॅटवर २ टक्के सरचार्ज लावलेला आहे. यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील व्यापा-यांवर लावलेला एल. बी. टी.चा हा कर आता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसालाही भरावा लागणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या फसवणुकीच्या विरुद्धही महाराष्ट्रातल्या जनतेला जागरूक करणे गरजेचे आहे. कारण हा वॅट आता प्रत्येक बिलावर लागणार आहे. एल. बी. टी. रद्द करू, असे आश्वासन भाजपाने दिले होते. त्याची पूर्तता केली असे भासवून दुस-या मार्गाने म्हणजे वॅट लावून सामान्य माणसाची लुबाडणूक पुन्हा केली आहे. हेही जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्रात जनजागृती करणेही आवश्यक असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
‘हेच का ते अच्छे दिन’ असे या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला वाटू लागले आहे. लोकांचा असंतोष संघटित करून या सरकारविरुद्ध जनतेचा संताप व्यक्त करण्याकरिता शांतता मार्गाचे आंदोलन करण्यासाठी जरूर पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.
मुंबईतील मराठी दादांची दादागिरी संपली आसे मराठी माणसाना वाटू लागले होते.मुंबईत राहायचे तर मराठी मुलीना अमराठी मुला बरोबर लगन करावे लागेल असि परिस्तिथी निर्माण होत आहे. मुंबईत ajun एक मराठी दादा शिल्लक आहे.मराठी माणसाना नक्कीच आनंद झाला असेल.