भातकापणी नुकतीच सुरू झाली आहे. सध्या शेतात पिके असल्यामुळे आपल्या गुरांची काळजी घेतली जात आहे. मात्र एकदा भातकापणी झाली की त्यांना वा-यावर सोडले जाईल.
भातकापणी नुकतीच सुरू झाली आहे. सध्या शेतात पिके असल्यामुळे आपल्या गुरांची काळजी घेतली जात आहे. मात्र एकदा भातकापणी झाली की त्यांना वा-यावर सोडले जाईल. आता चरायला मोकळी जागा नसल्यामुळे, राखणे नसल्यामुळे आणि यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे गुरे बाळगणे कमी होत आहे.
यातूनच या भाकड गायी आणि म्हातारी जनावरे या कत्तलखान्यावर जात आहेत. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे देशी गाईचे महत्त्व आल्यामुळे त्यांचे संगोपन करणारे शेतकरी भारावून गेलेले आहेत.आपल्याकडच्या गावठी गाईंची होत असलेली परवड पाहूनच आम्ही कृषी क्षेत्रातले अधिकारी, पदवीधर अस्वस्थ आहोत. यातून देशी गाईंचे संगोपन प्रचार-प्रसार करण्याच्या संस्था यांना भेट देत आहोत.
यातून असे लक्षात आले की, आपल्या भारतीय गाईची जी वैशिष्टय़े आहेत त्याबाबत सर्वच अज्ञान आहे. आपल्या गाईच्या पाठीवर खोंड असते. त्यामागे सूर्यकेतू नाडी आणि शिंगामध्ये आकाशतत्त्व असते. या अँटीनासदृश अवयवामुळेच सूर्याची शक्ती प्राप्त होऊन ती दुधामध्ये ‘कॅरॉटिन’ या स्वरूपात उपलब्ध होते.
त्यापासून व्हिटॅमिन ए, ई आणि सुवर्णक्षार प्राप्त होतात आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवतात. आपल्या गाईच्या दुधात कॅन्सरसारख्या रोगावर उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण घटक ‘ओमेगा-६ फॅटी अॅसिड’ असते. पण या निसर्गत:च उपलब्ध असलेल्या या घटकाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. आपल्या गाईच्या शरीरात घामग्रंथी जास्त आहेत. तसेच पाठीवरील मांसपेशींचे स्वयंत्स्फूर्त आकुंचन आणि प्रसारण होते. यामुळे उष्ण तापमानातील संतुलन राखून या गाई जगात कुठेही टिकून राहू शकतात. या गायीपासून आपण दूध हेच मुख्य उत्पादन समजतो. पण आमच्या या अभ्यास दौ-यात दुधापेक्षाही शेण आणि गोमूत्र यांपासूनही उत्पन्न मिळू शकते, असे लक्षात आले.
सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यामधील औदुंबर येथील तरुण शेतकरी सुहास प्रभाकर पाटील यांच्याशी दौ-यादरम्यान परिचय झाला. सुहास हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून यापूर्वी ते छायाचित्रकार म्हणून काम करत होते. एका सेंद्रिय शेतीच्या कार्यक्रमाचे फोटो काढताना ते सेंद्रिय शेतीविषयी प्रभावित झाले.
त्यातून त्यांनी देशी गाई संगोपनाची प्रेरणा घेतली. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातून चार देशी खिल्लार गाई आणल्या आणि गो-संगोपनाला सुरुवात केली. त्यात त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन विविध देशी गाईंच्या जातींचा अभ्यास केला. त्यानंतर गुजरात राज्यातील जुनागडमधून पाच गीर गाई खरेदी केल्या.
त्यांचे तूप तयार करून विकण्यास सुरुवात केली. हळूहळू या तुपाचे महत्त्व त्याच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास वाढू लागल्याने वेगळा ग्राहक वर्ग तयार झाला. तुपाची मागणी वाढली, यामुळे त्यांनी गाईंची संख्या वाढवली. सध्या त्यांच्याकडे लहान वासरांसह ४५ ते ५० जनावरे आहेत. या मोठय़ा प्रमाणातील गाईंसाठी त्यांनी हत्ती गवताची लागवड केलेली आहे.
पाटील हे पारंपरिक जळणावर दूध उकळतात. उकळून थंड केलेल्या दुधात विरजण लावतात, नंतर यांत्रिक रवीने ते दही घुसळून लोणी जमा करतात. ते लोणी चुलीवर कडवून शुद्ध तुपाची निर्मिती केली जाते. ते तूप थंड झाल्यावर शंभर ग्रॅमपासून १ किलोपर्यंतच्या छोटय़ा काचेच्या बरणीत भरून विक्री करतात.
या पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, व गोमूत्र यांचा वापर करून एक चिकित्सा पद्धतीचा अभ्यासक्रम ते चालवतात. यात वर्षभरातून विविध प्रशिक्षण देऊन या चिकित्सेचे प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यानंतर तो प्रशिक्षणार्थी देशी गाईच्या या पंचगव्याचा वापर करून विविध रोगांवर उपचार करू शकतो. याचे परिणाम खूप चांगले आहेत. आपल्याकडील गाई हेच मोठे ऐश्वर्य आहे! गरज आहे ते ओळखण्याची.
Chhan.