आपल्या पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एखाद्या मोठया कलाकाराने कशाप्रकारे लोकांसमोर यावं, याचा एक वस्तुपाठही या चित्रपटाने घालून दिला आहे.
सहसा वर्षाच्या सुरुवातीला नव्या वर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ काही जण आपल्या प्रियजनांना भेटी देत असतात. त्यातून ते आपलं प्रेम व्यक्त करत असतात. आमिर खानचं सारं काही अगदी परफेक्ट असतं. त्यात नेहमीच काही ना काही वेगळेपणा असतो. असाच वेगळेपणा आमिरने आपल्या चाहत्यांना दिलेल्या भेटीतून जाणवून येतो. त्याने आपल्या सर्व चाहत्यांना यावेळी वर्षाअखेरची एक भेट दिली आहे. तीही अशी की जी दीर्घकाळ आपल्या सर्वाच्या स्मरणात राहील. आपल्या पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एखाद्या मोठया कलाकाराने कशाप्रकारे लोकांसमोर यावं, याचा एक वस्तुपाठही या चित्रपटाने घालून दिला आहे.
‘पीके’ची पहिल्या दिवसाची कमाई २६ कोटी!
‘पीके’च्या चार स्टाईल…
राजकुमार हिरानी हा नेहमीच एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या सर्वच चित्रपटांमध्ये लोकांसाठी एक आश्चर्याचा धक्का असतो. जो पाहण्याकरता आपण त्याच्या चित्रपटांना गर्दी करतो. याही वेळी त्याने आपल्या अपेक्षांचा भंग तर केलेलाच नाही, उलट त्या आणखी वाढवून ठेवल्या आहेत. भारतीय दिग्दर्शक सर्जनशीलतेच्या किती वरच्या उंचीपर्यंत जाऊ शकतो, हे त्याने या चित्रपटातून दाखवले आहे. या चित्रपटाचे वास्तविक परीक्षण लिहायचे झाले तर ते एका वाक्यात लिहिता येईल, ते वाक्य म्हणजे, ‘ हा चित्रपट आवर्जून पाहा’. अशाप्रकारे एखाद्या चित्रपटाकडे पाहण्याचे प्रसंग अभावानेच येत असतात. तर असो.
चित्रपटाची केवळ थोडीशी कथा सांगायला हवी कारण इतर सा-या गोष्टी या पडद्यावर पाहण्याच्या आहेत. इतक्याच नव्हे तर पुन्हा पुन्हा पाहण्याच्या आहेत. ही कथा तशी आहे एका पत्रकार मुलीची. जग्गू (अनुष्का शर्मा) ही एक पत्रकार आहे. आपलं परदेशातलं शिक्षण आटपून ती तिच्या मूळ गावी येते. त्या ठिकाणी तिला पीके भेटतो. या पीकेने आधी कधीही माणसांना पाहिलेलं नसतं. त्यानंतर सुरू होतो तो या दोघांचा एक विलक्षण प्रवास. यात पीकेला अनेक प्रश्न पडलेले असतात. त्याला त्याची उत्तरं शोधायची असतात. ही पत्रकार त्याला त्या बाबतीत मदत करत असते. त्यानंतर ते काय काय करतात याची कथा यात दाखवली आहे. हे फारच ढोबळ झालं. हा चित्रपट याच्याही पलीकडे जाऊन आपल्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तर देतोच देतो, त्याचबरोबर काही नवीन प्रश्नही आपल्या मनात निर्माण करतो. या सा-या प्रवासात हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठीचा चित्रपट न ठरता एक अविस्मरणीय असा अनुभव बनून जातो.
एखाद्या दिग्दर्शकाला चित्रपट करण्यासाठी किती विचार करावा लागत असेल हे या चित्रपटातून दिसून येतं. राजकुमार हिरानी याने आतापर्यंतच्या आपल्या प्रत्येक चित्रपटातून हेच दाखवून दिले आहे. काळाच्या ओघात विसरून गेलेल्या गांधीजींच्या तत्त्वांना जो चित्रपटासारख्या माध्यमातून पुन्हा सर्वसामान्यांच्या जीवनात आणू शकतो, तो काहीही करू शकतो. हा राजकुमार हिरानी आपल्या देशात जन्माला आला याचा अभिमान वाटावा असं जबरदस्त काम त्याने या चित्रपटातून केलं आहे. त्याच्या चित्रपटाचा प्रवाह त्याच्या चित्रपटातल्या प्रत्येक पात्राचं अस्तित्व, त्यांचे वेगळेपण, त्यातून साधण्यात आलेला परिणाम या सा-या पातळीवर तो एक विलक्षण अशी चित्रकृती आपल्यासमोर पेश करतो. या चित्रपटातल्या त्याच्या व अभिजात जोशीच्या संवादांनीही अनेकदा आपल्याला अंतर्मुख करून सोडलं आहे. त्याच्या सर्वच टीमचं कौतुक करावं तितकं थोडंआहे.
या चित्रपटातल्या अभिनयाच्या बाबतीत तर सगळ्यांनीच आमिर खानच्या परफेक्शनिस्ट असण्याचा कित्ता गिरवला आहे. या बाबतीत त्यांनी आमिरलाही टफ दिली आहे. अनुष्का असो की सुशांत सिंग वा अगदी बोमन इराणी याची अगदी लहानशी भूमिका असो. या साऱ्यांनीच आपली कामं चोख करून एका विलक्षण चित्रपटाला आपला हातभार लावलेला आहे. त्याच्यावर अर्थातच आमिरने चार चाँद लावले आहेत, हे वेगळं सांगायला नको. या चित्रपटाच्या बाबतीत एक म्हणता येईल की अगदी हे परीक्षण वाचण्यात आपला वेळ न घालवता हा चित्रपट पाहून घ्यावा. तो तुम्हाला नक्कीच आनंद देईल, याची फुल्ल गॅरंटी आहे.
“अनाथ मुलांच्या कथेवर आधारित आगामी मराठी चित्रपट #IPL- इंडियन प्रेमाचा लफडा २६ डिसेंबर पासून प्रदर्शित होत आहे. पहा #MovieTrailer
http://youtu.be/ppYdrU0sAiw“