दिवाळी अंकांच्या परंपरेचा वेध घेतला तर दिसते की, प्रारंभी मोजकेच दिवाळी अंक, कसदार लिखाण करणा-या नामवंत लेखकांची मांदियाळी, सकस कथालेखन, लघुकादंब-या, कादंब-या असा माहोल होता. अनेक नवे लेखक, कथाकार, व्यंगचित्रकार दिवाळी अंकांमुळे पुढे आले आणि लिहिते झाले. लेखनाचे नवे फॉर्म वाचकांपर्यंत पोहोचले. अलीकडच्या काही वर्षात परिस्थिती बदलली आहे. दिवाळी अंकांचे आर्थिक गणितही बदलले आहे.
‘मनोरंजन’कार का. र. मित्र यांनी मराठीतील पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रसिद्ध केला होता. दिवाळी अंकांच्या या परंपरेला आता ११५ वर्षे झाली आहेत. ही म-हाटमोळी परंपरा मराठी मनांमध्ये आणि जनांमध्ये चांगलीच रुजली आहे. दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण विषयांच्या साहित्यशाखांनी हा परंपरावृक्ष बहरला आहे.
दिवाळी अंकांची लज्जत कळण्याआधी आमची दिवाळी सुरू व्हायची फटाक्यांच्या धडाम्धूमने. कुणीतरी सोसायटीच्या मैदानात येऊन दणकेबाज सुतळीबॉम्ब फोडला आणि सर्वाची झोप उडाली की आमची दिवाळी ऑफिशियली सुरू व्हायची. छानशा गुलाबी थंडीतून समोर येणारी पहाट या फटाक्यांच्या धुरात उजाडण्याआधीच गुरफटली जायची. नाहिशी व्हायची. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, घातक विषारी धूर, पर्यावरणाची हानी हे सारं कळायला लागलं तेव्हा फटाक्यांमधील रस संपला आणि दिवाळी अंकांची खुमारी कळायला लागली. तेव्हा आवडीने वाचायचो त्या दिवाळी अंकांमध्ये हंस, मोहिनी, नवल, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर (नंतर एकत्र स्वरूपात ‘किस्त्रिम’), ललित, धनंजय, चंद्रकांत, मौज, दीपावली, आवाज, माहेर, मेनका, जत्रा, अबकडई अशा कितीतरी दिवाळी अंकांचा समावेश असायचा.
दिवाळी जवळ आली की लायब्ररीत नाव नोंदवायचं, आवडत्या दिवाळी अंकांची उत्सुकतेने वाट पहायची, तोपर्यंत यंदा दिवाळी अंकात काय साहित्य फराळ आहे याबद्दल बातम्यांमधून माहिती घ्यायची, पहिल्या दिवशी लायब्ररी उघडायच्या मुहूर्तावर नव्हे उघडायच्या आधीच तिथे धडक मारून धनंजय, हंस, मोहिनी, नवल, मौज, दीपावली अशा निवडक अंकांपैकी जो काही हाती लागेल त्यावर झडप घालायची आणि त्या दिवसभरात एका बैठकीत अंक वाचून काढायचा असे सुखाचे दिवस असायचे. तेव्हा नवल, धनंजय, चंद्रकांत, हंस, मोहिनी, जत्रा, आवाज, दीपावली, मौज असे अंक वाचनालयात शिरायला क्षणभराचा उशीर झाला तरी नजरेसमोर पळवले जायचे. त्यामुळे दिवसभर लागलेली चुटपूट दुस-या दिवशी एखादा चांगला अंक हाती आल्यावरच जरा दूर व्हायची.
कधी कधी याच विषयाला धरून जोरदार चर्चा झडायच्या. वृत्तपत्रातून, सार्वजनिक वाचनालयांमध्ये वा कोप-यावरील वृत्तपत्र वाचन कट्टय़ावर. दिवाळी अंक जोमात असण्याचा तो काळ होता. भरपूर दिवाळी अंक, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार भरपूर वाचायला, दर्जेदार आणि अभिरूचीसंपन्न लिखाणापासून रटाळ आणि सुमार लिखाणापर्यंत सर्वकाही.
रहस्यरंजनासाठी गेली कित्येक वर्षे वाचकप्रिय असलेल्या ‘धनंजय’शी तर माझी एक हळवी आठवण जुळली आहे. धनंजय पैलेछूट हाती पडावा यासाठी मी जीव टाकायचो. या प्रचंड लोकप्रिय दिवाळी अंकात आपलं नाव आलं तर काय झकास होईल, असं त्या वेळी वाटायचं. काही वर्षानी एका माहितीपटाच्या खेळाच्या वेळी धनंजयचे संपादक राजेंद्र कुलकर्णीशी ओळख झाली आणि त्यांनीच कमालीच्या स्नेहभावाने, ‘काहीतरी लिहा धनंजयसाठी’ म्हणत या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले. दरवर्षी ते काहीतरी लिहायला सांगायचे आणि धनंजयमध्ये लिहिणा-या नारायण धारपांसारख्या सिद्धहस्त लेखकांबरोबर आपलंही तोडकंमोडकं छापलं जातंय हा आनंद दिवाळी अंकांमुळेच मिळाला होता. आता राजेंद्र आपल्यात नाहीत ही कातर किनार या आठवणीला असली तरी, धनंजयशी जुळलेला बंध कायम राहिला आहे.
दिवाळी अंकांच्या परंपरेचा वेध घेतला तर दिसते की, प्रारंभी मोजकेच दिवाळी अंक, कसदार लिखाण करणा-या नामवंत लेखकांची मांदियाळी, सकस कथालेखन, लघुकादंब-या, कादंब-या असा माहोल होता. अनेक नवे लेखक, कथाकार, व्यंगचित्रकार दिवाळी अंकांमुळे पुढे आले आणि लिहिते झाले. लेखनाचे नवे फॉर्म वाचकांपर्यंत पोहोचले. अलीकडच्या काही वर्षात परिस्थिती बदलली आहे. दिवाळी अंकांचे आर्थिक गणितही बदलले आहे. अंकांनी गेल्या वर्षीच शंभरी ओलांडून दीडशे रुपयांकडे मजल मारली होती. आता तर चांगले, दर्जेदार अंक १७० ते दोनशेच्या घरात आहेत. केवळ जाहिरातींमधून कमाई करण्यासाठी थातूरमातूर जुळवाजुळव करून दिवाळी अंक बाजारात आणणारे गणंगही दरवर्षी वाढत आहेत. साहजिकच अंकांची संख्या हजाराच्या पलीकडे गेली असली तरी अंकांच्या दर्जाचे गणित साफ बिघडले आहे. याबाबतचे माझे निरीक्षण म्हणजे जुनेजाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आहेत आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक तरी अल्पस्वल्पच दिसत आहेत. प्रयोगशील अंक भरपूर येत आहेत, ऑनलाइन अंक आहेत, फेसबुकवर अंक आहेत, दृकश्राव्य माध्यमात अंक काढण्याचे उपक्रम होत आहेत, कोकणातून, छोट्या शहरांमधून, तालुका स्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण या अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्याचे काय? तिथे चांगल्या साहित्याचा अभाव अंकागणिक यंदा तरी जाणवला. हे असे चित्र अस्वस्थ करते आणि खंतही वाटते. माझे हे मत अनेकांना पटणार नाही. पण यंदाचे किमान पन्नास-साठ दिवाळी अंक (वाचून-चाळून) पाहिल्यावर मी हे लिहितो आहे. या निरीक्षणाला आणखी एक आधार आहे तो म्हणजे मी जपून ठेवलेले गेल्या काही वर्षातले दिवाळी अंक.
मात्र याच अभावाच्या काळात गेल्या काही वर्षात उत्तम अनुवाद, निसर्गसेवकाचा अभिजात, अक्षर, ऋतुरंग, मुक्त शब्द, ललित, अनुभव, पुरुषस्पंदनं, साधना, पद्मगंधा, गंधाली अशा दिवाळी अंकांनी वाचकांची निराशा दूर करण्याचे काम केले आहे. यंदाचा दीपावली चांगला आहे. नवल गेल्या वर्षीपेक्षा चांगला आहे. ललित उत्तम आहे. चंद्रकांतमध्ये दोन उत्तम कादंब-या आहेत, कादंबरीविषयीच लेखसंवाद आहे, मुक्त शब्द अख्खा वाचनीय आहे. कालनिर्णयमध्ये दोन-तीन उत्तम लेख आहेत. ‘मिळून सा-याजणी’चा यंदाचा अंक शेती विशेषांक आहे. तो अद्याप हाती आलेला नाही. पण अंक वाचनीय आहे असा रिपोर्ट आहे. ‘प्रहार’ने बाजारपेठांवर एक उत्तम अंक यंदा केला आहे. अनेक अंक संपूर्ण वाचनीय नसले तरी एकदोन कथा, लेख, परिसंवाद, कविता, अनुवाद असे काही ना काही या अंकांमध्ये निवडक वाचनीय आहे. आपल्या सगळ्यांचेच दिवाळीचे दिवस अशा दिवाळी अंकांनीच मंगल, सुखदायी बनवले आहेत. हे सगळे निवडक वाचनीय संकलित करून एक ‘निवडक दिवाळी अंक’ काढावा एवढीच इच्छापूर्ती कुणी केली तर मराठी वाचकांसारखे भाग्यवान दुसरे कुणी नसतील एवढे नक्की!
- निवडक साहित्यासाठी पहावे असे अंक
- ललित
- धनंजय
- दीपावली
- चंद्रकांत
- मुक्त शब्द
- आश्लेषा
- अनुवाद
- वयम्
आशय , पद्मगंधा , ॠतुरंग हे दिवाळी अंक वेगळं काहीतरी देणारे आहेत.
‘ निवडक दिवाळी ‘ ची संकल्पना खुप दिवसांपासून माझ्या डोक्यात आहे पण स्वामित्व हक्क , अनुमती इत्यादि अडचणी आहेतच