उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुंबई- उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय. डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.
मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे. भाषा हे संपर्काचे साधन आहे. भाषा माणसाला जोडते त्यामुळे भाषा हे विवादाचे माध्यम होऊ शकत नाही. हा वाद निर्माण करणे चुकीचे आहे.
मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये. मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहेच. पण याच मराठी आणि मुंबईतील संस्कृतीबरोबर उत्तर भारतीय संस्कृतीही एकजीव झाली आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सध्या मुंबईत काही लोक उत्तर भारतीय लोकांना निशाणा करत आहेत. परंतु आम्ही सक्षम असून तक्रार करण्याआधीच अशा लोकांवर कारवाई करत आहोत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मनसेला लगावला आहे. या वक्तव्यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांना भैय्या भूषण पुरस्कार
आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण नाही, तर भैय्या भूषण हा पुरस्कार नक्की मिळेल, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
Fadnavis has insulted to Marathi manus