शिवसेनेला खिजवण्यासाठीच त्यांचा पाठिंबा न घेता अल्पमतातील सरकार स्थापण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला आहे.
मुंबई- कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेला सत्तेत सहभागी न करण्याचा चंग राज्यातील भाजप नेत्यांनी बांधलेला दिसतो. त्यामुळे शिवसेनेला खिजवण्यासाठीच त्यांचा पाठिंबा न घेता अल्पमतातील सरकार स्थापण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड सोमवारी केली जाणार असून मंगळवारी किंवा बुधवारी नवीन सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडिअम किंवा विधान भवनाच्या परिसरात होईल.
निकालापूर्वी भाजपवर जोरदार टीका करणा-या शिवसेनेला निवडणूक निकालानंतर भाजपच्या मागे मागे फिरण्याची वेळ आली आहे. मात्र भाजप नेते शिवसेनेला सत्तेत वाटेकरी करण्यास तयार नाहीत. सध्या भाजपकडे मित्रपक्षासह १२३ आमदार असून आणखी १० अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतासाठी केवळ १२ आमदारांच्या पाठिंब्याची गरज भाजपला आहे. त्यातच राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने भाजपची स्थिती भक्कम आहे.
त्यामुळे शिवसेनेला बरोबर न घेताही भाजपला अल्पमतातील सरकार स्थापन करणे शक्य आहे. त्याचाच विचार भाजप नेत्यांमध्ये सुरू आहे. शनिवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. त्यात अल्पमतातील सरकार स्थापण्याचे निश्चित झाले. १२ आमदारांच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेला सत्तेत मोठा वाटा देण्यास भाजपचा विरोध आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर जमिनीवर आलेल्या शिवसेनेने भाजपने पाठिंबा मागितल्यास त्याचा विचार करू, असे प्रारंभी सांगितले होते. त्याला भाजप नेत्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. सत्तेत किमान वाटा मिळण्यासाठी शिवसेना नेत्यांना दिल्लीत भाजपश्रेष्ठींच्या दारी जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे शिवसेनेची अगतिकता भाजप नेत्यांच्या लक्षात आली आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा उचलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
वानखेडे सौदेबाजीचे केंद्र
भाजप सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र त्यावर आतापासूनच सोशल नेटवर्किंग साइटवर टीका सुरू झाली आहे. वानखेडे हे सौदेबाजीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात आता कोणती नवीन सौदेबाजी झाली, अशा विचारणा होत आहे.
अल्पमतातील सरकार असे असेल
भाजपकडे सध्या १२३ आमदार असून पूर्ण बहुमतासाठी १४५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. १९ अपक्षांपैकी १० जणांचा पाठिंबा भाजपला आहे. त्यामुळे भाजपची संख्या १३३ वर जाते. बहुमतासाठी आणखीन १२ आमदारांची गरज आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. बहुमत सिद्ध करताना राष्ट्रवादीचे आमदार सरकारच्या बाजूने मतदान करतील किंवा मतदानाच्या वेळी गैरहजर राहतील. राष्ट्रवादी गैरहजर राहिल्यास सभागृहात सदस्य संख्या २८८वरून २४७ होईल. त्यामुळे बहुमतासाठी भाजपला १२४ आमदारांची गरज लागेल. त्यामुळे शिवसेनेच्या मदतीची गरजच भाजपला लागणार नाही. मात्र हे सरकार अल्पमतातील असेल.
नारायण राणे साहेब ,राज ठाकरे यांचे शिवसेना साेडणे हे पक्षाला घातक ठरले। कागदी वाघ झालेला हा पक्ष ना गुरकावु शकत,ना आता वाघ नखे , ना दात । उरली मुजाेरी । मा. बालासाहेबांचा पापड़ किती दिवस माेडुन खाणार ।८