बटाटावडयाच्या खालोखाल महाराष्ट्रातला प्रसिद्ध पदार्थ कोणता असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर येतं ते मिसळ. प्रत्येक गावातली मिसळ वेगळी, ती करणा-या प्रत्येक माणसाप्रमाणे त्याचं स्वरुप बदलतं. असं असलं तरी प्रत्येकाला ती आवडतेच आवडते. त्यातले घटकही अगदी साधे. एक मोठा डाव गरमागरम उसळ, त्यात चार बोटात मावेल इतकं फरसाण, वर बारीक चिरलेला कांदा व थोडी भुरभुरलेली कोथिंबीर. मात्र मिसळ इतकीच नसते. त्याला असतो एक चटकदारपणा. या चटकदारसाठी खवय्ये कुठेही जाऊन वाट्टेल तितके पैसे देऊन खायला तयार असतात. अशाच प्रकारची एक खास कोकणी मसाल्यातल्या मिसळीची ही साठा उत्तरी सुफळ कहाणी..
वास्तुशास्त्राचा सध्या बराच बोलबाला आहे. त्याचे अनेकांना अनेकदा प्रत्यय येत असतात. या वास्तुशास्त्रातल्या काही नियमांप्रमाणे कोणत्याही व्यवसायाची बांधणी ही पूर्ण चौकोनी असावी, असा एक नियम आहे. ती गोलाकार वा त्रिकोणी असू नये, असं वास्तुशास्त्र म्हणतं. ती त्रिकोणी असेल तर त्या व्यवसायात बरकत येत नाही असं म्हटलं जातं. या नियमाला एक अपवाद आपल्याला पाहायला मिळतो तो टिटवाळयात. गणपतीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या टिटवाळयाला धार्मिक स्थळाचं महत्त्व आहे. त्यामुळे साहजिकच इथे अनेक जण सतत येत असतात. टिटवाळा हे तसं पाहायला गेलं तर एक लहानसंच गाव. या गावाला या गणपती मंदिरामुळे अनेकांचं वास्तव्य लाभलं. आता या सा-यांच्या येण्या-जाण्यानं इथला व्यापार वाढला असला तरी या भाविकांची काळजी घेण्याचीही जबाबदारी स्थानिकांवर आली. पाहता पाहता टिटवाळयाचं रूपांतर एका लहानशा शहरात झालं.
याच टिटवाळा स्टेशनपासून आपण मंदिराकडे निघालो की, एका कोप-यावर आपल्याला भेटते ती बाबुराव मिसळ. या मिसळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नव्या माणसाला ती शोधावी लागते. एकदा का ती त्याला सापडली की मग तो त्याचा कायमचा गुलाम होऊन जातो. या ठिकाणी केवळ मोजकेच पदार्थ मिळतात. हॉटेलला स्वत:चं असं व्यक्तिमत्त्व नाही. कोणतीही सजावट नाही. रंग उडालेल्या भिंती व त्रिकोणी आकार. लहान इतकं की एका वेळेस केवळ सात ते आठ लोकच बसू शकतील. त्यातही भिंतींना मारलेल्या फळया व त्यासमोर ठेवण्यात आलेले स्टुल अशी एक रचना. आतमध्ये किचन तयार करण्यात आलंय ते मात्र स्टीलचं आणि स्वच्छ. अशा या काहीशा न आवडू शकणा-या श्रेणीत बसणा-या या हॉटेलला वरदान आहे ते चवीचं. या ठिकाणी बटाटावडा, कांदाभजी व उसळ-मिसळ असे चार-पाचच पदार्थ मिळतात. मात्र या पदार्थाची चव इतकी लाजवाब असते की त्यासाठी इतर सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केलं जातं.
बाबुराव हे कोकणातल्या रत्नागिरी जिल्हयातल्या कोतवडयाच्या शेजारच्या एका गावाचे. त्यांना विद्यार्थीदशेत असताना सिगारेटचं व्यसन लागलं. एकदा त्यांच्या चुलत्यांनी त्यांना त्यापायी धोपटलं. याचा राग मनात धरून बाबुराव यांनी थेट मुंबई गाठली. सुरुवातीला घरातल्यांनी थोडी शोधाशोध केली. नंतर मात्र आशा सोडून दिली. बाबुराव मुंबईत आले ते कोणतीही आशा सोडायला तयार नव्हते. त्यांनी पडेल ते काम केलं. त्याच सुमारास त्यांचा संबंध टिटवाळयाशी आला. सुरुवातीला दुस-याच्या लायसन्सवर त्यांनी रेल्वे स्टेशनातला स्टॉल चालवला. त्यानंतर मग एका कोप-यात आपलं हॉटेल काढलं. आधीपासूनच त्यांच्या हाताला चवीचं वरदान होतं. त्यांच्या हातच्या मिसळीचे अनेक जण भक्त बनले. आज त्यांचं हॉटेल टिटवाळयातलं प्रसिद्ध ठिकाण झालं आहे. आज त्यांची मुलं त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.
त्यांच्या हॉटेलमधला सगळयात जबरदस्त पदार्थ म्हणजे मिसळ. लालभडक अशी मिसळ आपल्यासमोर येते तेव्हा प्रथम धडकीच भरते. मात्र पावाबरोबर त्याचा पहिला घास तोंडात जाताच अगदी ब्रह्मानंदी टाळीच लागते. लालभडक मिसळीचा रस्सा, त्यात वाटाण्याची उसळ, त्यात अगदी चांगल्या दर्जाचं फरसाण, यात थोडया फार प्रमाणात पोहेही टाकले जातात. त्यामुळे त्याला एक प्रकारचा दाटपणा येतो. त्यावर कांदा व लिंबू. अनेकदा इतर ठिकाणी मिसळीबरोबर लिंबाची लहानातली लहान फोड मिळते.
मिसळ खाऊन झाल्यावरही ती फोड तिथे तशीच राहाते. इथली मिसळ मात्र काहीशी झणझणीत आहे. त्यामुळे या मिसळीबरोबर लिंबाची फोड लागतेच लागते. सोबतीला एक खास पाव. महाराष्ट्रात अशी अनेक लहान लहान शहरं आहेत ज्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे पाव मिळतात. मुंबईत पावाची सर्वाधिक विक्री होत असतानाही इथं फार चांगला पाव मिळत नाही. लालसर असलेल्या या पावालाही स्वत:ची अशी एक खास चव आहे. अनेक जण मिसळ खाताना सोबत एक बटाटावडा घेतात. या बटाटावडयामुळेही यात एक वेगळीच चव आपल्यासमोर येत असते. इथला बटाटावडा खास अगदी मराठी पद्धतीचा असतो. सध्या राजकारणाचे वारे वाहत आहेत. अनेकांना निवडणुकीच्या काळात मिळणारा वडापाव आठवत असेल. अगदी तशाच चवीचा हा बटाटावडा असतो. या बटाटावडयाची खास बाब म्हणजे यातली कोथिंबीर, ही भाजी पूर्ण केल्यावर वरून टाकली जाते. त्यामुळे त्या ताज्या कोथिंबिरीचा स्वाद या बटाटावडयात आपल्याला चाखता येतो. तिसरा खास पदार्थ म्हणजे इथे मिळणारी कांदाभजी. सध्या कांदाभजी काही दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचं कारण या बंधूंना विचारलं असता ते सांगतात की, सध्या कांदे चांगले येत नाहीत, त्यामुळे आम्ही सध्या कांदाभजी ठेवत नाही. आपल्या व्यवसायाप्रती त्यांच्याकडे असलेला प्रामाणिकपणा हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. इथे वापरला जाणारा पदार्थ ताजा आणि स्वच्छ असला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो.
अगदी मिसळीतलं फरसाण असो की बटाटावडयासाठी वापरण्यात आलेलं आलं-लसूण असो. त्याच्या दर्जाशी कोणतीच तडजोड नाही. टिटवाळयाच्या अगदी मध्यभागी एका वळणावरच्या त्रिकोणात वसलेली ही बाबुराव यांची मिसळ देवळात जाण्याआधी किंवा नंतर अगदी आवर्जून खावी अशी आहे.
गणपतीच्या दर्शना साठी नाही तर बाबुराव यांची झणझणीत लज्जतदार मिसळ खाण्यास टिटवाळा अवश्य आवर्जून भेट देईन …जीवन करि जिवीत्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ।। १ ।।