माणूस त्याच्या उत्क्रांतीपासून स्वत:चे जीवन सुलभ करण्यासाठी धडपडत आलेला आहे. शेती हे तर सुरुवातीपासून त्यांच्या जगण्याचे माध्यम आहे. शेतीची सुरुवात, निसर्गातून मिळणा-या कंदमुळांवर आणि फळांवर जगण्यापेक्षा, स्वत:च अन्नधान्य निर्माण का करू नये, या विचारातून झाली असावी. माणूस समुद्री आणि गोडय़ा पाण्यातील माशांवर उपजीविका करू लागला आणि ब-याच ठिकाणी ते त्याचे आवडते खाद्य बनलं, यानंतर आपणच माशांची पैदास का करू नये, हा विचार तयार झाला आणि त्यातून सुरुवात झाली ‘मत्स्यशेती’ या व्यवसायाची.
मत्स्यशेती म्हणजे कृत्रिमरीत्या नसर्गिक वातावरणात केली गेलेली माशांची पैदास. मत्स्यशेतीची संकल्पना माशांचे पुनरुज्जीवन कसं होतं, याचा अभ्यास करून त्यासदृश स्थिती निर्माण करून देण्यावरून झाली. उत्तम मत्स्यशेतीचा हा कणा आहे. मत्स्यशेती करू पाहणा-याने अगोदर उत्तम माशांची पैदास कशी करता येईल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. व्यवसाय म्हणून तो का करायचा, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, मासे हा अनेकांच्या जेवणातील आवडीचा पदार्थ आहे. चवीने मासे खाणारे, त्यासाठी अनेक ठिकाणी फिरणारे खूप आहेत. समुद्रात माशांची पैदास प्रचंड प्रमाणात होते, मात्र खाण्याजोग्या माशांची संख्या कमी होत असल्याचे मासेमारी करणा-यांचे म्हणणे आहे. जगभरातील मासेमारीमुळे आणि समुद्राच्या वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या संख्येत घट होत आहे, मात्र या तुलनेत मासे खाणारे खवय्ये वाढत आहेत. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवताना व्यवसायाची एक नामी संधी चालून आली आहे.
मत्स्यशेतीची सध्याची स्थिती
मत्स्यशेतीचे दोन प्रकार पडतात.
गोड्या पाण्यातील
निमखा-या पाण्यातील
गोड्या पाण्यातील मत्स्यशेती
गोड्या पाण्यातील मासे हे किनारपट्टीव्यतिरिक्त इतर भागांत चवीने खाल्ले जातात. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर भारतात त्यांना प्रचंड मागणी आहे. याव्यतिरिक्त गोव्यातील परदेशी पाहुण्यांनाही ते आकर्षित करतात. कोकणातही चवीत बदल म्हणूनही हा खाण्यासाठी पर्याय ठरू शकतो. त्यामुळे गोडय़ा पाण्यातील माशांना भारतातच उत्तम मार्केट आहे. निर्यातीसाठीसुद्धा हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे, हे ओघाने आलेच.
भारतात तीन प्रकारचे मासे प्रामुख्याने घेतले जातात
कोळंबी
रोहू
कोटला
याव्यतिरिक्त चौथा प्रकार लोकप्रिय होत आहे आणि ज्यात ब-याच संधी आहेत, तो म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण-रोहा भागांत मिळणारा जीताडा हा मासा.
या सर्वाच्या वाढीसाठी लागणारी यंत्रणा आणि कालावधी जवळजवळ सारखाच आहे. तसेच सर्व माशांची एकत्र एकाच तळ्यात शेती करता येण्यासारखी आहे.
आपण कोळंबी उत्पादनाची साधारण माहिती घेऊ.
गोड्या पाण्यातील कोळंबीला ‘जम्बो प्रॉन्स’ म्हणतात कारण ती आकाराने मोठी असते. तिचे शास्त्रीय नाव आहे ‘माक्रोब्रेकिअम रोझेंबर्गी’. म्हणूनच हॉटेलांमध्ये हिला अधिक मागणी आहे. एक कोळंबी ६०० ग्रॅमपर्यंत वजनदार होऊ शकते.
या कोळंबीला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं अन्न चालतं.
ती काटक आहे आणि रोगाला सहजी बळी पडत नाही.
तलाव व धरणे यात वाढवता येते.
अतिरिक्त पाणी, शेती आणि इतर कारणाने क्षारपड आणि नापिक झालेल्या जमिनीत तळे खोदून या कोळंबीचे उत्पादन घेता येते.
उत्पादनाची पद्धत
कोळंबीच्या उत्पादनाचा कालावधी साधारणत: आठ महिने असतो. यात थोडी अनियमितताही असते. काही कोळंबी लवकर मोठय़ा होतात. त्यामुळे सहा महिन्यांनंतर सतत चाचपणी करणे गरजेचे असते.
सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे उत्तम प्रतीचे बीज. कोळंबीचे बीज चांगले असेल तरच उत्पादन निरोगी आणि सुदृढ असेल. बीज विशिअस्थ वातावरणात आणि विशिष्ट ठिकाणी तयार केले जाते त्याला ‘हॅचरिज’ म्हणतात. रत्नागिरी येथील सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्रात ही बिजं विकत मिळतात.
तलाव आणि पाणी
तलाव साधारणत: वीस गुंठय़ापासून पुढे कितीही जागेत करता येतो. यापेक्षा मोठाही करता येऊ शकतो, मात्र त्यामुळे उत्पादनाचा खर्च खूप जास्त होतो. तलावाला एका जागी उतार असावा. म्हणजे पाणी बदलण्यास आणि उत्पादन बाहेर काढण्यास मदत होते. तलावाच्या तळाशी चिकणमातीचा लेप लावावा. तसेच मृदेच्या सामूप्रमाणे चुन्याचा वापर केला जातो. मातीचा सामू ७ ते ७.५ असावा लागतो.
पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक. त्यातील क्षाराचे प्रमाण, मातीतील सामूचे प्रमाण हे पाहून शास्त्रीय परीक्षेनंतरच जागेची निवड करावी. तलावाची रचना, माती सामू, पाणी, क्षार अशा तांत्रिक गोष्टींसाठी कृषी विद्यापीठातील आणि रत्नागिरी येथील सागरी जीव संशोधन केंद्रातील तज्ज्ञ मदत करतात.
खते आणि मत्स्य अन्न
मत्स्यशेतीतील एक चांगली बाब म्हणजे सेंद्रिय पदार्थ, ज्यातून कल्शिअम, नत्र अधिक प्रमाणात मिळतं. त्याचा माशांना अन्न म्हणून उपयोग होतो. त्यामुळे पौष्टिक खतांची पिशवी पाण्यात ठेवली, पाणशेवाळ यांचा अन्न म्हणून वापर होतो. कोंबडय़ांची विष्ठासुद्धा खत म्हणून वापरली जाते.
शास्त्रशुद्ध उत्पादनासाठी उत्तम प्रकारचे अन्न वापरले जाते.
भाताचा कोंडा, शेंगदाण्याची पेंड आणि सुकट हे पदार्थ साधारणत: अन्न म्हणून वापरले जातात. हे अन्न बाजारात तयार मिळते. ते कणीच्या स्वरूपात असते.
साधारण उत्पन्न आणि नफा
तलावाचे क्षेत्र : १ हेक्टर
तलाव : २
संवर्धन कालावधी : १०-१२ महिने
बीज साठवणूक : ५०,००० नग
बीज जिवंत राहण्याचे प्रमाण : ६० टक्के
सरासरी वजन : ६० ग्राम
अंदाजे उत्पन्न : १८०० किलो
विक्री दर : २५० रुपये प्रती किलो
उत्पन्न : साडेचार लाख रुपये
भांडवली खर्च
तलाव बांधकाम : २,००,००० रुपये
मोटर शेड इतर : १,००,००० रुपये
एकूण : ३,००,००० रुपये
साधारण नफा : १,०७,००० रुपये
केंद्र आणि राज्य शासनाच्या तळे बांधकाम आणि नूतनीकरणासाठी अनेक कर्ज स्वरूपातील योजना उपलब्ध आहेत. यात साधारण २० ते २५ टक्के अनुदानाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त केंद्र, मत्स्यखाद्य उभारणी केंद्र यासाठीसुद्धा अनुदानाच्या योजना आहेत. कुठल्याही सरकारी बँकेत या योजनांची माहिती मिळते.
खा-या पाण्यातील मत्स्यशेती
खा-या पाण्यात टायगर प्रॉन्स या समुद्री कोळंबीचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनात पाण्याच्या गुणधर्मात क्षाराचे प्रमाण अधिक असावे लागते. याव्यतिरिक्त काही ठरावीक बाबी वगळता साधारण प्रक्रिया वर उल्लेखलेल्या प्रमाणेच आहे.
या कोळंबीला उत्पादन कालावधी पाच महिने इतका आहे, त्यामुळे वर्षात दोन उत्पादने शक्य होतात. एक हेक्टर जागेत साधारण १,००,००० बिजे मावतात. त्यामुळे मिळणारा उत्पादन गोडय़ा पाण्यापेक्षा दुप्पट असते. मात्र गोडय़ा पाण्यातील कोळंबीच्या तुलनेने याचं वजन कमी असते.
समुद्री उत्पादन विकास निर्यात प्राधिकरण कडून यासाठी अनेक प्रकारचे अनुदान मिळते.
या व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी भारतात ठिकठिकाणी अभ्यासक्रम चालवले जातात.
महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाने, ‘बॅचलर ऑफ फिशरिज सायन्स’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
मत्स्यशेती प्रशिक्षण देणा-या संस्था
नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय सेमिनरी हिल्स, नागपूर
कॉलेज ऑफ फिशरी सायन्स, तेलंगखेडी, नागपूर
पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई
सागरी जीव संशोधन केंद्र, रत्नागिरी
अतिशय सुंदर माहिती मिळाली।
पण मत्स्यशेती साठी खोदल्या जाणाऱ्या तळ्याची खोली किती असावी याबद्दल माहिती मिळाली तर उपयुक्त होईल।