शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिथे जातील त्या गावात आयोजित केलेल्या जाहीर सभेत आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात किंवा मग पत्रकार परिषदेत घोषणा करतात. पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असेही ते छातीठोकपणे सांगतात. शब्द बापुडे केवळ वारा असेच उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचे वर्णन करता येईल.
२०१४ सालच्या विधानसभा निवडणुका शिवसेनेने स्वबळावरच लढविल्या होत्या. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी युतीसाठी गयावया करूनही उद्धवजींनी त्यांना दाद दिली नव्हती. त्या निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. या पक्षाला स्वबळावर मुख्यमंत्री करायचा असेल तर विधानसभेच्या किमान १४५ जागाजिंकून बहुमत मिळवावे लागेल. प्रत्येक जागेसाठी सगळी ताकद पणाला लावून विजय मिळविण्याचा सध्याचा राजकीय काळ आहे. त्यामुळे शिवसेनेकडे सध्या असलेल्या ६३ जागा या पक्षाने पुन्हा जिंकल्या तरी विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी सेनेला आणखी ८२ जागा जिंकाव्या लागतील, तरच सेनेला बहुमताचा १४५ हा आकडा गाठता येईल. गेली काही वर्षे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सहभागी आहे, पण या काळात कोणतेही कौतुकास्पद काम शिवसेनेकडून झालेले नाही. मात्र अगदी रोजच्या रोज न चुकता भाजपवर टीका करायची, त्यांच्याबद्दल लिखाण करायचे हा प्रकार मात्र सेनेकडून चालू असतो. आपण भाजपच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काम करतो याची जाणीव ठेवण्याऐवजी आम्ही मंत्रीपदाचे राजीनामे खिशात घेऊन फिरतो, अशी उन्मत्त भाषा सेनेचे काही मंत्री करताना आढळतात.
राज्य पातळीवरील निवडणुकांत अपयशी ठरणारा पक्ष अशी शिवसेनेची प्रतिमा प्रदीर्घ काळ होती. त्यामुळे नगरपालिका किंवा महापालिका निवडणुकांत हा पक्ष काही प्रमाणात विजय मिळवायचा आणि त्यावरच त्या पक्षाचे नेते समाधान मानायचे. कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांच्या दुर्दैवी निधनामुळे परळ मतदारसंघात विधानसभेची जागा रिक्त झाली आणि १९६८ साली शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक यांनी कृष्णा देसाई यांच्या पत्नीचा पराभव करून ही पोटनिवडणूक जिंकली. या निवडणुकीमुळेच वामनराव महाडिक यांच्या रूपाने शिवसेनेला पहिले लोकनियुक्त आमदार लाभले, पण पुढे १९७२ साली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि परळ मतदारसंघात काँग्रेसच्या गजानन लोके यांनी वामनराव महाडिक यांचा पराभव केला. विधानसभेत शिवसेना शून्यावरून कशी-बशी आली, पण त्याचवेळी प्रमोद नवलकर यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा वर आणले. गिरगावमधून नवलकर ७२च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून निवडून आले. १९७२ नंतर १९७८ आणि १९८० च्या निवडणुकांत शिवसेना पुन्हा अपयशी ठरली. १९८५ च्या निवडणुकीत या पक्षाला पुन्हा विधानसभेत जागा मिळाली ते संख्याबळही एक एवढेच होते. म्हणजे १९६८ साली एक आमदार, १९७२ साली एक आमदार आणि त्यानंतर थेट १९८५ साली या पक्षाचा एकच आमदार निवडून आला तो छगन भुजबळ यांच्या रूपाने. १९९० च्या निवडणुकीतच शिवसेना-भाजप युती सत्तेवर येईल, असा अंदाज हमखासपणे वर्तविला जात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी तडाखेबंद प्रचार करून महाराष्ट्र हलवून सोडला होता, पण ९० साली सत्तेवर येण्याचे सेनेचे स्वप्न ऐनवेळी काँग्रेसमध्ये आलेल्या शरद पवार यांनी उधळून लावले. तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांनी शरद पवार यांना १९८६ साली काँग्रेसमध्ये आणले ते त्यांचा समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून. पवारांनी बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे १९९० मध्येच विधानसभा जिंकून महाराष्ट्र ताब्यात घेण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आणि मंत्रालयावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकावला. आम्ही खूप त्वेषाने प्रचार करतो, आमच्या सभाना लोक लाखा-लाखांची गर्दी करतात आणि मोक्याच्या क्षणी काँग्रेसला मते देऊन काँग्रेसचा उमेदवार निवडून आणतात याचे वैशम्य वाटते असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. त्यांच्या बोलण्यात तथ्यही होते. निवडणुकांच्या काळात शिवाजी पार्कवर बाळासाहेबांची सभा असली की लाखोंच्या गर्दीने मैदान फुलून जायचे. निवडणुकीत हे मैदान ज्या दादर मतदारसंघात आहे, त्या मतदारसंघात सेनेचा उमेदवार हमखास पराभूत व्हायचा आणि काँग्रेस उमेदवार निवडून यायचा, अपवाद १९९० सालचा. त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी काँग्रेस उमेदवार भाऊराव पाटील यांचा पराभव करून निवडून आले होते.
शिवसेनेची ही वाटचाल इतक्या विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात शिवसेनेची ताकद दखल घेण्याइतपत वाढली आहे. मात्र तरीही पूर्ण बहुमत मिळवून राज्याची सत्ता या पक्षाच्या हाती येईल इतकी राज्यातील राजकीय परिस्थिती शिवसेनेला अनुकूल आहे, असा दावा ठामपणे करता येणार नाही. सध्याच्या ६३ आमदारांखेरीज जवळपास आणखी ८२ जागा वाढविण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे, मात्र त्या दिशेने वाटचाल करताना या पक्षाच्या विद्यमान आमदारांपैकी काही जणांना पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम महाराष्ट्रात सेनेची ताकद आधीच तोळामासा आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील नेते अनिल बाबर हे गेली काही वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासूनही दूर होते. दोन्ही पक्षांनी असेच वाळीत टाकले तर आपले राजकारणच संपूर्ण जाईल हे लक्षात आले तेव्हा २०१४ सालच्या निवडणुकीपूर्वी अनिल बाबर ऐनवेळी, शिवसेनेच्या मांडवात दखल झाले. या मतदारसंघातील तत्कालीन काँग्रेस आमदार सदाशिव पाटील यांच्या राजकारणाला त्या मतदारसंघातील जनताही विटली होती. त्यामुळे अनिल बाबर शिवसेनेत दाखल होताच आणि सेनेनेही त्यांना उमेदवारी देताच लोकांनी त्यांना भरभरून मते देऊन निवडून दिले. सांगली जिल्ह्यात हे घडत असताना बाजूच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सेनेचे आमदार मात्र पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे मध्यंतरी दिसून आले होते. त्यामुळे नवीन आमदार निवडून आणण्याची समीकरणे तयार करताना पक्षाचे विद्यमान आमदार पराभूत होणार नाहीत याची काळजी सेनेच्या नेतृत्वाला घ्यावी लागेल. मंत्रिमंडळाच्या कामगिरीबाबत भाजपवर टीका करताना आपलीही कामगिरी फारशी चांगली होत नाही हेही सेनेच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे.
१४५ सोडा ६३ चे ३६(भाजप बरोबरचा आकडा) झाले नाही म्हणजे मिळविली!