भारतीय सैनिकांची मुंडकी कापणा-या पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका, अशा डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी येत असताना तोंड घट्ट मिटून घेतले.
मुंबई– भारतीय सैनिकांची मुंडकी कापणा-या पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका, अशा डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी येत असताना तोंड घट्ट मिटून घेतले असून, त्यांचा कुणीही नेता वा प्रवक्ता यासंदर्भात तोंड उघडायला तयार नाही.
सातत्याने पाकिस्तानविरोधाचे भांडवल करणा-या शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रिपदे खुणावत असून जर मोदी यांच्या या कृतीला विरोध केला तर तोंडाशी आलेला घास जाईल या लाचारीपोटी शिवसेनेने ही मिठाची गुळणी धारण केली आहे.
शिवसेना नेतृत्वाने आजवर पाकिस्तानविषयी कायम कट्टर भूमिका घेतली आहे. कारगील युद्धानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आणि कलाकारांना भारतात पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. भारत-पाकिस्तान क्रिकेपटूंचा सामना मुंबईत होणार होता, तेव्हा शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खोदली होती. त्यानंतर अनेक वर्षे भारत-पाक संघाचा सामना भारतात होऊ शकला नव्हता.
पाकिस्तानच्या कलाकारांसंदर्भातही शिवसेनेने अशीच ताठर भूमिका घेतली होती. अनेक कलाकारांचे संगीत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम उधळून लावले. पाकिस्तान कलाकारांना घेऊन बनवण्यात आलेले चित्रपट शिवसेनेने बंद पाडले. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी बँडची मुंबईतील पत्रकार परिषदही शिवसेनेने उधळली होती.
अलीकडेच चार भारतीय सैनिकांचे शीर पाकिस्तानच्या सैनिकांनी कापल्यानंतर शिवसेनेने अकांडतांडव केले होते. ‘भारतीय सैनिकांचे मुंडके छाटणा-या पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका’, असे आवाहन त्यांनी काँग्रेसच्या सरकारला केले होते.एकीकडे शिवसेनेचा असा विरोध सुरू असतानाच, नरेंद्र मोदी निवडून आले तर पाकिस्तानला धडा शिकवतील, असा प्रचार त्यांच्या समर्थकांनी केला होता. मात्र त्यांनीच आता पाकिस्तानी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पायघडय़ा घालून त्यांच्या प्रचारकांबरोबरच शिवसेनेचीही पुरती कोंडी केली आहे.
काँग्रेसला सुनावणा-या शिवसेनेकडे मोदींना विरोध करण्याचा स्वाभिमान नाही, हे गेल्या काही दिवसांत स्पष्ट झाले आहे. याचवेळी श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना शपथविधीसाठी आमंत्रित केल्याबद्दल एनडीएचा घटक पक्ष आणि तामिळनाडूतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या वायको यांच्या एमडीएमकेने संताप व्यक्त केला आहे.
राजपक्षे यांनी शपथविधीला येऊ नये या निर्णयाशी ते ठाम राहिले. विशेष म्हणजे या पक्षाचा एकही खासदार लोकसभेत निवडून आलेला नाही. तरीही वायको यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ यांची भेट घेऊन राजपक्षे यांच्या भेटीला विरोध केला होता. पाकिस्तान विरोधाची सतत पुंगी वाजवून स्वत:ची पोळी भाजून घेणारी शिवसेनेची आता मात्र दातखिळी बसली आहे. शिवसेनेचे हे मौन म्हणजे सत्तेसाठी लाचारी हे यामुळे स्पष्ट झाले आहे. मोदींसमोर त्यांचे काही चालणार नाही. शिवाय विधानसभेच्या तोंडावर मोदींना दुखावले तर त्याचा फटका शिवसेनेलाच बसणार आहे. या सर्व बाबी पाहता ‘तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार’ खाण्याशिवाय शिवसेनेकडे पर्याय उरलेला नाही.
शिवसेनेच्या प्रवक्त्यांचे मौन
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला नवाज शरीफ यांची उपस्थिती या बाबत शिवसेनेची नक्की भूमिका काय हे सांगण्यापासून प्रवक्त्यांनीच पळ काढला. खासदार संजय राऊत यांना सतत संपर्क करूनही त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर हा विषय आपल्या अखत्यारीत नसल्याचे सांगत निलम गो-हे यांनी याबाबत बोलणे टाळले. त्यामुळे शिवसेनेची याप्रकरणी चांगलीच कोंडी झाली आहे.
भाजपने खडसावले
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधीसाठी निमंत्रित करणे हा परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. त्यात कुठल्याही स्थानिक मुद्दय़ांची लुडबुड कुणी करू नये. आंतरराष्ट्रीय संबंधांशी स्थानिक संदर्भ जोडले जाऊ नयेत, असे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केले. शरीफ यांना विरोध करणा-यांना पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद घरी आलेला कसा काय चालतो, असा प्रश्नही या वेळी भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेची मिठाची गुळणी का?
सतत पाकिस्तानला विरोध करणारी शिवसेना आता तोंडात मिठाची गुळणी घेऊन शांत का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. काँग्रेसने सगळ्याच देशांबरोबर द्विपक्षीय संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न केला. पण त्याच वेळी शिवसेना आणि भाजपने विरोध केला होता. काँग्रेसची सत्ता आली असती आणि त्यांनी शरीफ यांना निमंत्रित केले असते तर शिवसेनेने काय भूमिका घेतली असती, असा बिनतोड सवाल काँग्रेसने विचारला आहे. शिवसेनेची मतलबी आणि संधीसाधू भूमिका यामुळे पुन्हा एकदा सर्वाच्या समोर आली आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
शरीफ उद्या भारतात
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिल्यानंतर शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हे निमंत्रण स्वीकारून भारतात येणार असल्याचे जाहीर केले. या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर ते देशातील नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री सरताज अझिझ, विशेष सहायक तारिक फतेमी, परराष्ट्र सचिव ऐजाज चौधरी आणि इतर नेते असणार आहेत.
फार चांगले लिहिले आह भिक्मंगे सत्ते साठी झाले नंगे मोदींच्या कुबड्या वर उड्या मारणार आहेत तर दोन हाथ कसे करणार जनता सुज्ञ अह्हे सर्व काही पाहत आह गुजराथी च्या टिके नंतर घरो घरी जावून त्यांच्या पाया पडले मोदींच्या लाटेत पांच वर्षे लाथ खात बसवायचे आहे हे विसरू नका म्हणजे झाले जे मिळेल ते गुपचूप पदरात पडून घ्या जास्थ नाटके कराल तर पस्तावाल माधव भंडारी जे म्हणाले ते लक्षात घ्या मोदींच्या हत्ती पुढे तुम्हाला शेपटी जवळच राहावयाचे आहे बाळासाहेब हयात असताना असे होत नव्हते सर्व सूर्याजी पडले असले तरीही ते पडून राहणार नाहीत हे लक्षात असुद्या