भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबईसह राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबई- भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबईसह राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शांततेत बंद पार पडला. पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, नालासोपारा, मनोर, जव्हार आदी परिसरात काही किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागसह पेण, श्रीवर्धन, नागोठणे, माणगाव, महाड, पोलादपूर या शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात बंदचे तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे ट्रॅकवर उतरून लोकल रोखून धरली. तर मुंबई आणि पुण्यात संतापलेले भीमसैनिक रस्त्यावर उतरले. कायदा व सुव्यस्था बिघडू नये म्हणून ठाण्यामध्ये ४ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी ४८ बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी जाळपोळीचा प्रयत्न देखील करण्यात आला. ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केले. वांद्रे खेरवाडी परिसरात पश्चिम द्रुतगती मार्गावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामुळे वाहतूक खोळंबली. तर चेंबुर नाका परिसरात स्कूल बस फोडण्यात आल्याने या भागात स्थिती तणावपूर्ण झाली.
घोडबंदर रोड येथे पहाटे अज्ञात व्यक्तीने ब्रह्मांड सिग्नल दरम्यान टायर जाळून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्वरीत आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली. अनेक शाळा-महाविद्यालये शाळा प्रशासनाने स्वत:हून बंद ठेवल्या. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक आंदोलकांमुळे विस्कळीत झाली होती. पण सायंकाळी महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर दुपारी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. तसेच, स्टीलच्या खुर्च्या आणि टयुबलाईट, वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते.
दुसरीकडे, कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असला तरी या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले. महाद्वार रोडवर हिंदुत्ववादी कार्यकर्तेही समर्थनार्थ उतरले आणि रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. गुजरीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या संरक्षणासाठी कडे केले. तथापि आंदोलकांचा संताप अनावर झालेला होता. दरम्यान, राज्यभरातील अनेक जिल्ह्यात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असला तरी अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले.
महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन केली. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे हेच आहेत. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा. तसेच, त्या दोघांना सरकारने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. याचबरोबर काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. महाराष्ट्र बंद मागे घेत असून राज्यातील ५० टक्के जनता आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाली होती. आजचा बंद शांततेत पार पडला. तसेच, आजचा संप फक्त दलित बांधवाचा नव्हता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. या बंदला समविचारी आणि डाव्या संघटनांचा पाठिंबा मिळाला. दोन-तीन घटनांचा अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडला, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. काही जण विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि जिग्नेश मेवानी यांची नावे घेतली जात आहेत, पण त्यांचा याच्याशी संबंध नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांना यावेळी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्र बंद दरम्यान काही हिंसक घटना घडल्या, त्याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, जोपर्यंत माझ्या हातात होते तोपर्यंत मी आंदोलन शांत ठेवण्याचे काम केले. महाराष्ट्र बंदमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे आता यापुढे सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.
नांदेडमध्ये पोलिसांच्या लाठीमारात विद्यार्थ्याचा मृत्यू
हिमायतनगरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शीघ्र कृती दलाचे एक वाहन हदगावहून आष्टीमार्गे हिमायतनगरकडे जात असताना जमावाने जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनातील जवानांनी उतरून लाठीमार सुरू केला. यात योगेश प्रल्हाद जाधव या दहावीत शिकणा-या मुलाच्या मानेवर फटका बसला. नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यास हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर वाळकीफाटा येथे दगडफेकीत कारमधून प्रवास करणारी चिमुकली जखमी झाली.
शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत आंदोलकांनी पोलीस वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, जमादार गणेश कानगुले, चालक शिवाजी मुंडे हे जखमी झाले. यापैकी गोविंद मुंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन जातीवाद वाढवताहेत- मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
आजच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान राज्यभरात घडलेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. हिंसक घटनांच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे. या पडताळणीअंती योग्य ती कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. भीमा कोरेगाव येथील झालेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, महाराष्ट्रात काही बाहेरचे लोक येऊन जातीवादाचे मुद्दे मांडत आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्यावर केली आहे. ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत तेच अशाप्रकारे तणावपूर्ण वातावरण निर्माण करतात. मात्र, आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता याला बळी पडणार नाही. विचारांच्या संकुचितपणामुळे काही लोक परस्परविरोधी उभे ठाकलेत. ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनीच हा अकारण वाद निर्माण केला आहे. आज लोकांना तणावमुक्ती आणि विकास हवा आहे. विकास हा शांततेतच शक्य आहे. जी घटना झाली ती दुर्दैवीच आहे. पण, त्या घटनेचा राजकीय लाभ उकळण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि तशी संधी माध्यमांनीही कुणाला देऊ नये, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत ४८ बसची तोडफोड, ४ बसचालक जखमी
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला हिंसक वळण लागल्याने मुंबईत बेस्टच्या ४८ बसची तोडफोड करण्यात आली. या घटनेत काचा लागून ४ बसचालक जखमी झाले आहेत.
काँग्रेसनेच ही दंगल पेटवली, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा आरोप
भाजपा खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काँग्रेसवर आरोप करताना तीन वर्षात महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. विकासाचा अजेंडा रोखू शकत नसल्याने काँग्रेसने ही दंगल पेटवली आहे असा आरोप केला. शांतता राखण्यासाठी आमचे सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ते बुधवारी लोकसभेत भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या मुद्द्यावरील चर्चेत सहभागी झाले होते. काँग्रेससह विरोधकांकडून भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी संघ परिवार आणि भाजपाला जबाबदार धरले जात आहे. मात्र, रावसाहेब दानवे यांनी चर्चेला उत्तर देताना विरोधकांवरच दंगल घडवल्याचे आरोप केले आहेत.
भीमा कोरगाव घटनेचे लोकसभेतही पडसाद पहायला मिळाले. काँग्रेस आणि भाजपा खासदारांना एकमेकांवर आरोप करत गोंधळ घातला. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खासदारांना शांत करत दलितांचं भलंही नको आणि राजकारणही करायचं आहे हे चालणार नाही अशा शब्दांत सुनावलं. या घटनेवर राजकारण करु नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ब्रिटिशांनंतर काँग्रेस तोडा आणि राज्य करा निती अवलंबत आहे. काँग्रेस परिस्थिती भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. आग विझवण्याऐवजी ती भडकावण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राहुल गांधी करत आहेत असा आरोप भाजपाने केला. शिवाजीराव अढळराव पाटील यांनी या प्रकरणावर निवेदन देताना काही लोकांनी राजकारण करण्यासाठी, जातीय तेढ वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे असा आरोप केला. पोलीस परिस्थिती हाताळू शकत नसल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला मदत पाठवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मनोहर भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल
कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून या प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे मनोहर भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पिंपरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दंगल भडकविण्याप्रकरणी भारतीय दंड विधान ३९५, ३०७ कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी बंदला हिंसक वळण
भिवंडी शहराच्या मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असताना सुध्दा शिवाजी चौक याठिकाणी संपूर्ण भिवंडी शहर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक एकत्रित झाले होते. ज्यांना किरण चन्ने, नगरसेवक विकास निकम, महेंद्र गायकवाड यांनी सूचना दिल्या. त्यानंतर वंजारपट्टी नाका मार्गे उपविभागीय कार्यालयाकडे कूच करीत असताना वंजारपट्टी नाका ते चावींद्रा या रस्त्यावरील काही दुकाने उघडी दिसल्याने युवकांच्या एका गटाने तिकडे धाव घेत मारहाण करीत दुकाने बंद केली. रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचांवर दगडफेक करून नुकसान पोहचवले. एवढेच नव्हे तर वंजारपट्टी येथील उड्डाणपुलावर वाहतुकीत अडकून पडलेल्या वाहनांच्या सुध्दा काचा युवकांनी फोडल्या असल्याने या बंदची झळ शहरातील सर्व परिसरात जाणवत होती.
डोंबिवलीत तिकीटघर फोडले
कोरेगाव-भीमा परिसरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शांततेत महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन करूनही या आंदोलनाला काहीसे हिंसक वळण लागले. मुंबईत आणि मध्य रेल्वेवर डोंबिवली स्थानकावर तोडफोड करण्यात आली. डोंबिवली स्टेशनवरील पूर्व भागातील तिकीटघर जमावाने फोडले. दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. डोंबिवली स्टेशन आणि कल्याण दरम्यान पत्री पुलाजवळही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रोखल्या होत्या.
परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा दिलासा
मुंबई विद्यापीठाच्या बुधवारी दुपारच्या सत्रातील सर्व परीक्षा नियमित वेळेत घेतल्या जातील. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. मात्र, जे विद्यार्थी परीक्षेला वेळेवर उपस्थित राहणार नाहीत त्यांची स्वतंत्ररित्या वेगळी परीक्षा घेतली जाईल. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याचे विद्यापीठाने आज जाहीर केले.
मुंबईत सकाळपासून लोकल सेवा अनेकवेळा विस्कळीत झाल्याने दुपारच्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलायच्या की आजच घ्यायच्या याविषयी परीक्षा विभागाची दुपारी एक तातडीची बैठक झाली. यावेळी दुपारी ३ ते ६ या वेळेत होणारे पदवी, पदव्युत्तर आणि विविध व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे ९ विषयांचे पेपर आजच घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या परीक्षेला जे विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत, त्यांची माहिती घेऊन पुढील आठवड्यात स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.
संसदेत आरएसएसवर हल्लाबोल
भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘समाजात फूट पाडण्यात कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचे लोक यांचा हात आहे. त्यांनीच हे काम केले आहे’, अशा शब्दात मल्लिकार्जुन खरगे यांनी आरएसएसवर हल्लाबोल केला. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवड करावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गप्प बसू शकत नाहीत. त्यांनी यावर उत्तर द्यावे. ते या मुद्द्यावर मौनी बाबा झाले आहेत’, असेही ते म्हणाले. याआधी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजप आणि आरएसएसवर टीका केली. त्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनीही आरएसएस आणि भाजपवर हा हिंसाचार घडवून आणल्याची टीका केली.
औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवेसहीत शाळा, बस बंद
खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली होती. तसे आदेशच पोलीस आयुक्तांनी दिले होते. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या. शाळांनी स्वत:हून हा निर्णय घेतला. पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये, असा शाळांकडून निरोप देण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आजचे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.
वसईतही ‘रेल रोको’चा प्रयत्न, परिस्थिती नियंत्रणात
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद वसई विरारमध्येही पहायला मिळाले. सकाळी विरार रेल्वे स्थानकात संतप्त जमावाने रेल रोको केला होता. तर वसई स्टेशन परिसरातील दुकानेही बंद होती. सकाळी सुरु असलेली एसटी सेवा ही आंदोलनकर्त्यांनी बंद पाडली. नालासोपारा – अचोले रोड ही बंद केला होता. तर वसई रेंज ऑफिस नाका ही बंद करण्यात आला होता.
शांतता टिकवणे आता मुख्यमंत्र्यांच्या हातात – प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्र बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. जो पर्यंत मला शक्य होते तितकी मी परिस्थिती नियंत्रणात ठेवून शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आता यापुढे शांतता कशी टिकवायची ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.
भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्मृती स्तंभाला अभिवादन करण्याचे ठरले. त्यासाठी अनेक संघटना एकत्र आल्या होत्या. या सर्व संघटनांची वेगवेगळी मते आहेत. त्या सर्व संघटनांना मी नियंत्रणात ठेऊ शकत नाही त्यामुळे शांतता कशी टिकवायची ते आता मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा बुधवारी संध्याकाळी प्रकाश आंबेडकर यांनी केली. भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आहेत. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा. तसेच, त्या दोघांना सरकारने अटक करावी, अशी मागणी केली. याचबरोबर काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
महाराष्ट्र बंद मागे घेत असून राज्यातील ५० टक्के जनता आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाली होती. आजचा बंद शांततेत पार पडला. तसेच, आजचा संप फक्त दलित बांधवाचा नव्हता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे
भीमा कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी केली आहे. भीमा कोरेगावमध्ये जे घडलं ते मूळ प्रकरण अनेक प्रकारे रंगवून सांगितलं गेलं त्यामुळे परिस्थिती बिघडली. सोशल मीडियावरही चुकीची माहिती पसरवली गेली त्यामुळे दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी केली.
भीमा कोरेगाव घटनेला संपूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे. भीमा-कोरेगाव दोन गट समोरासमोर येणार नाहीत याची पोलिसांनी काळजी घ्यायला हवी होती. भीमा कोरेगावच्या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप सकल मराठी क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी यावेळी करण्यात आला. असा आरोप सकल मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला.
दलित समाजाच्या भावनांशी आम्ही समरस आहोत. पण हिंसाचाराचे समर्थन करत नाही असे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी सांगितले. मराठा समाजाने शांततेच्या माध्यमातून 58 मोर्चे काढले. मराठा विरुद्ध दलित वाद निर्माण करण्याच्या जो प्रयत्न सुरु आहे त्याचा आम्ही निषेध करतो असे सकल मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले.
राज्यभरात तणाव असताना रामदास आठवले पुस्तक प्रकाशनात मग्न
राज्यात भीमा कोरेगावच्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र तणाव असताना दलित नेते म्हणवून घेणारे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आपल्या पुस्तक प्रकाशनात मग्न होते. दलित समाज पक्षानिवेश बाजूला ठेवून आपला आक्रोश बंदच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. अशावेळी त्याच समाजाचे नेते स्वत:चा उदोउदो करणारे पुस्तक प्रकाशित करत आहेत. याची दखल आंबेडकरी अनुयायी पुढील काळात नक्की घेतील, असा इशाराच कार्यकर्त्यांनी दिला आहे. कोरेगावाच्या हल्लेखोरांना अटक व्हावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी आमची माफक अपेक्षा आहे, असे आंदोलनकारी संजय भालेराव यांनी म्हटले. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या राजकीय जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राजीव सुमन आणि प्रमोद रंजन यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
” चांगल्या व वाईटाची ,दोन्हीची जबाबदारी घायची हिम्मत दाखवावी …………!!!!!!!!
बंद कोणिका पुकारो , त्याला जनता कधीही समर्थन करणार नाही !!!!!
उलट बंद पुकारणारे व त्यात भाग घेणारे लोक हे उपद्रवी ,तोडफोड-जाळपोळ करणारे आहेत असेच मेसेज समाजात जातो .
महाराष्ट्र-बंद मध्ये जे नुकसान झाले व जे लोक जखमी झाले , त्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी व ज्या संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता त्यानीं घ्यावी.