स्वातंत्र्योत्तर भारतात देशाचा चांगला औद्योगिक विकास झाला. मोठमोठी धरणे आली. वैज्ञानिक प्रगती झाली. रोगराईवर मात करण्यात आली.
स्वातंत्र्योत्तर भारतात देशाचा चांगला औद्योगिक विकास झाला. मोठमोठी धरणे आली. वैज्ञानिक प्रगती झाली. रोगराईवर मात करण्यात आली. नागरिकांचे आयुर्मान वाढले. फुले-आंबेडकरी चळवळीमुळे दलित समाज शिकू लागला. सावित्रीबाई फुलेंनी शेणसडयाचा मारा सहन करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यामुळे स्त्रिया शिकून नोक-या करू लागल्या. देश आता महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे. माहिती-तंत्रज्ञानाचे युग अवतरले आहे. संगणक क्रांती झाली आहे.
भारतीय नागरिक मोठया प्रमाणात परदेशात स्थायिक होऊन खो-याने पैसा ओढू लागला. नव्या आíथक धोरणामुळे उच्चभ्रू, उच्चमध्यमवर्गीयांची श्रीमंती गगनाला गवसणी घालत आहे. त्याच वेळी या देशातील अंदाजे १३ कोटी भटका-विमुक्त समाज कमालीच्या विपन्नावस्थेत जगतो आहे. त्यांना गाव नाही. घर नाही. जमीन नाही. मतदारयादीत त्यांचे नाव नाही. त्यांच्याकडे जातीचा दाखला नाही. रेशनकार्ड नाही. बँकेत खाते नाही.
व्यसनाधिनता, धर्माचा पगडा, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा व जातपंचायतीच्या माणुसकीशून्य निर्बंधाच्या साखळदंडानी भटक्या-विमुक्तांचे जगणे जखडबंद केले आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या-विमुक्तांचे दाहक जगणे प्रशांत पवार यांनी ‘३१ ऑगस्ट १९५२’ या पुस्तकात ज्या संवेदनशीलतेने चितारले आहे, ते संवेदनशील मनाला निश्चितच अस्वस्थ करणारे आहे.
भटक्या समाजावर ब्रिटिशांनी जो जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का मारला होता, तो देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यानी ३१ ऑगस्ट १९५२ रोजी नष्ट करून भटक्यांना विमुक्त म्हणजे विशेष मुक्त असे नामाभिधान दिले. या घटनेलाही आता ६३ आणि देशाच्या स्वातंत्र्याला ६८ वर्षे उलटून गेली. पण तरीही भटक्या-विमुक्तांचे सर्वस्तरीय अमानुष शोषण संपलेच नाही. याचा मन विषण्ण करणारा प्रत्यय सदर पुस्तक वाचताना प्रकर्षाने येतो हे विशेष.
प्रशांत पवारांच्या लेखनाचे वैशिष्टय़ असे की, त्यानी केबीनमध्ये बसून भटक्या-विमुक्तांचे सामाजिक दु:ख चितारले नसून, गावोगाव फिरून व भटक्यांच्या पालावर राहून त्यांचे भणंग जिणे शब्दबद्ध केल्यामुळे त्यांचे पुस्तक निश्चितच संवेदनशील मनाचा ठाव घेणारे ठरले आहे.
लेखकाने महाराष्ट्रातील मसणजोगी, नाथपंथी, डवरी समाज, पोतराज, वासुदेव गोंधळी, बहुरूपी, कोल्हाटी, अस्वल, साप-माकडवाले, डोंबारी, रायरंदं, गोपाळ, डक्कलवार या भटक्या समजाचं जिणं जसं जवळून पाहिलं तसेच गुजरातमधील छारा, राजस्थानचे कंजर, बिहारमधील मुसहर जमातीचे कफल्लक, लाचार समाज जीवनही अभ्यासल्यामुळे पवारांच्या लेखनात एक जिवंतपणा आला आहे.
मसणजोग्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यामुळे तो दररोज कुणाच्या तरी मरणाची वाट पाहत असतो, गडकिल्ले उभारणारा, मंदिरे बांधणारा वडार समाज दारिद्रयात पिचतो, बहुरूप्याचे सोंग घेऊन पोटाची खळगी भरणा-या नाथजोग्यांना चोर समजून दगडाने चेचून मारण्यात येते.
रूढी-परंपरा तर इतक्या भयंकर की, परपुरुषाचा हात लागला तर देह बाटतो म्हणून अडलेल्या बाईला वा आजा-याला जसे येथे दवाखान्यात नेण्यात येत नाही, तसेच काही भटक्या जातीत नवविवाहित मुलीला कौमार्याची परीक्षाही द्यावी लागते आणि जातपंचायतीच्या या दुष्ट रूढीस निसर्गनियमानुसार एखादी मुलगी न उतरली तर तिचा विवाह मोडला जातो. चो-या करणे, दारू गाळणे व भीक मागणे हे भटक्यांचे जीवन आहे.
राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील भटक्या जातीत वेश्या व्यवसाय हेच जीवन जगण्याचे एक साधन मानले जाते, असे एकाहून एक भयंकर मती गुंग करणारे प्रकार लेखकाने पुस्तकातून नमूद केले आहेत. जे मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.
स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही भटक्या विमुक्तांची गुलामगिरीच्या समाजव्यवस्थेतून मुक्तता होत नसेल तर याचा अर्थ असा की, शासन या समाजाच्या विकासाबाबत उदासीन आहे. भटक्यांचे मतदारयादीत नावच नसल्यामुळे सत्ताधा-यांनी भटक्या-विमुक्तांची उपेक्षा करणे हे आपल्या क्षुद्र-सोयवादी राजकारणास धरून असले तरी जातीग्रस्त समाजव्यवस्थेस भटक्यांच्या प्रती आस्था असण्याचेही काही कारण नाही.
उच्चभ्रू, गर्भश्रीमंतांचा तर प्रश्नच नाही. ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाद्वारे मुसहार समाजाच्या दशरथ मांझीचे जीवन छोटया पडद्यावर आणणारा आणि अलीकडेच गुन्हेगार सलमान खानला भेटायला जाणारा अमिर खानही म्हणूनच उपासमारीने होरपळणा-या दशरथ मांझीच्या कुटुंबास दोन आठवडयात आíथक मदत करतो, असे सांगून आपला शब्दच पाळत नाही, परिणामी दशरथ मांझीची सून औषधोपचार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडते. असा जिथे लबाडीचा खेळ सुरू आहे, तिथे भटक्यांचे शोषणग्रस्त जीवन बंदिस्त राहिले तर नवल ते कोणते? जातीव्यवस्थेमुळे जातीचे फायदे घेणारे उच्चभ्रू समाज जातीच्या पलीकडे जाऊन भटक्या-विमुक्तांचा माणूस म्हणून विचार करायलाच तयार नाही, ही या भटक्या समाजाची खरी शोकांतिका आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये साबरमती किनारी राहणारी छारा ही भटकी जमातही पशूतुल्य जीवन जगते. पण या संदर्भात रामसिंह छारा यांनी महाश्वेता देवी, डॉ. गणेश देवी आणि लक्ष्मण गायकवाड यांना म. गांधींशी संबंधित जी गोष्ट सांगितली तिच्या विश्वासार्हतेविषयी मात्र शंका वाटते. रामसिंह छाराचे म्हणणे असे की, आपण लहानपणी म. गांधींच्या साबरमती आश्रमात जायचो.
गांधी चांगल्या गोष्टी सांगायचे. ते त्यांच्या बकरीला काजू, बदाम चारायचे, एकदा आमच्या वस्तीवर उपासमार ओढवली व गांधींच्या अनुपस्थितीत आम्ही त्यांची बकरी पळविली. गांधींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यानी आम्हाला आश्रमाचे दार बंद केले. म. गांधींच्या सामाजिक दृष्टिकोनाबाबत मतभिन्नता जरूर आहे. पण म्हणून गांधी त्यांची बकरी चोरल्यामुळे रामसिंह व त्यांच्या मित्रांना आश्रमाचे दारच बंद करतील, हे संभवत नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भटके-विमुक्त परिषदेच्या माध्यमातून संजय विभुते, नरसिंग झरे यांच्यासारखे काही कार्यकत्रे भटक्या समाजाचे प्रबोधन करून त्यांचे काही अंशी पुनर्वसन करण्याचा जो प्रयत्न करीत आहेत, तो दखलपात्रच आहे. पण संघ पुरस्कृत संघटनांच्या वतीने भटक्या समाजात जे उपक्रम राबविले जातात ते जातीअंताच्या लढयास पूरक आहेत काय? हा खरा प्रश्न आहे.
३१ ऑगस्ट १९५२ : प्रशांत पवार
साकेत प्रकाशन
पाने : १८४
मूल्य : २०० रु.
Nice- I need this book,
Pls cal 9623872499