श्री स्वामी समर्थाच्या चरित्रातील गोष्टींचा आमच्या जीवनातील घडामोडींशी काही संबंध आहे का? याचा शोध आपण या लेखमालेद्वारे घेत आहोत. डोळस राहून चरित्राचा विचार आपण करीत आहोत.
श्री स्वामी समर्थाच्या चरित्रातील गोष्टींचा आमच्या जीवनातील घडामोडींशी काही संबंध आहे का? याचा शोध आपण या लेखमालेद्वारे घेत आहोत. डोळस राहून चरित्राचा विचार आपण करीत आहोत. श्री स्वामी समर्थ चरित्र हे काही पुराण कथांचे भांडार नाही किंवा चमत्कारांचे गोष्टीरूप दर्शनही नाही. तर स्वामी समर्थ चरित्र हे ज्ञान, विज्ञान, भक्ती परंपरेचा उत्तम वस्तुपाठ आहे.
जीवनाचे मार्गदर्शन त्यामध्ये आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे. कोणते चूक व कोणते बरोबर याचा स्पष्ट निकाल देणारे न्यायालय आहे. सत्व, रज, तम यांना समतोलीत ठेवणारे गुणशास्त्र आहे. संसाराच्या दैनंदिन व्यवहारात घडणा-या गोष्टींतून बोध देणारे भांडार आहे.
अनुभव सिद्धता ही स्वामी चरित्राची ओळख आहे. माणसांच्या विविध स्वभावाचे दर्शन त्यामध्ये आहे. त्यावर योग्य उपाय सांगणारे स्वामी महाराज हे सर्वगुण संपन्नाचे मानबिंदू आहे तसा प्रगट होताना दिसत नाही. स्वत:ला उगीचच प्रशंसेचे आवरण घेऊन प्रगट होण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. त्यातून तो फसतो हे त्याला माहीत असतानासुद्धा असा उद्योग करू पाहतो. त्यावर महाराज प्रत्येक वेळी समजावून सांगतात हे या चरित्रातून दिसते. म्हणून श्री स्वामी चरित्र हे ज्ञानाचे भांडार आहे.
औदार्य ते तरी दांभिक।
आम्हासी मोठे म्हणतील लोक।।
बाह्यरंग दाखवावया अनेक।
शब्दसंकेत चालती।।
श्री गुरुलीलामृत ग्रंथातील सहाव्या अध्यायातील पंधरावी ओवी फारच सुंदर आहे. चुकीच्या मार्गाने मिळविलेल्या धनाचे प्रदर्शन करण्यामध्ये लोक स्वत:ला धन्य समजतात. मग ते धन असेल, शक्ती असेल, ज्ञानाचे असेल, परंतु ते सगळं तोकडं प्रदर्शन करण्यात गुंतून राहतात. त्यात मोठा अहंकार दडलेला असतो. असे करण्याचे एकमेव कारण म्हाणजे लोकांनी त्यांना फुकटचे मोठेपण द्यावे. यांच्या बाह्यरंगानेच लोक भुलावेत, खोटी प्रतिष्ठा द्यावी, असे लोक समाजात भरपूर आहेत.
महाराजांनी असल्या लोकांचा चांगलाच पाणउतार केलेला आहे. असला अहंकार काय कामाचा? परंतु लोक असल्या अहंकारालाच चिकटून बसतात. यातून द्वेष वाढतो. मत्सर जागा होतो. मत्सर मोहाला कारणीभूत होतो. मग क्रोध (राग) मोहातूनच निर्माण होतो. महाभारतातील एक कथा दृष्टांत पाहू.
एकदा बलराम, श्रीकृष्ण व सात्यकी तिघे जण हस्तिनापुराहून द्वारकेला चालले होते. एक घनदाट जंगल लागले. चालून चालून तिघेही थकले होते. रात्र झाली. जवळ असलेली शिदोरी तिघांनी खाल्ली. परंतु झोपण्यापूर्वी प्रत्येकाने तीन तास जागावे असे ठरले. सात्यकी म्हणाला, मी सर्वात लहान आहे. ९ ते १२ मी जागतो. तुम्ही दोघे झोपा. दोघे झोपले. तेवढयात राक्षस आला.
तो म्हणाला, मी यांना खातो तू माझ्याशी मैत्री कर. सात्यकीने नकार दिला व दोघांचे रक्षण करीत असल्याचे सांगितले. सात्यकी व राक्षसात तुंबळ युद्ध झाले. सात्यकीने भरपूर मार खाल्ला. बारा वाजले. वेळ संपली. मार खाऊन सात्यकी झोपला. बळीरामदादा उठले. राक्षस म्हणाला, तू तरी माझ्याशी दोस्ती कर. पहिल्याने मार खाल्ला आहे. बलरामदादा भडकले. खूप तुंबळ युद्ध झाले.
गर्वाने नांगर फिरवित होते. परंतु राक्षसापुढे निभाव लागेना. दादांनी खूपच मार खाल्ला, तोपर्यंत तीन वाजले. दुसरा शो संपला. सात्यकी, दादा झोपले. भगवान श्रीकृष्ण उठले. थंडी सुटली. भगवंतांनी शेकोटी पेटविली. शेकत बसले. राक्षस आला म्हणाला तुला जर वाचायचे असेल तर माझ्याशी दोस्ती कर. मी या दोघांना खाऊन टाकतो. देव म्हणाले, हवेत खूपच गारठा आहे. तुम्ही पण माझ्या बरोबर शेकत बसा.
राक्षसाने ओळखले हा नुसताच गप्पाडया दिसतोय. असे म्हणून त्यांने श्रीकृष्णाला एक जोरात ठोसा लगावला. देवाने तो सहन करून राक्षसाला विचारले, आपण मोठे धिप्पाड पहिलवान दिसता. त्याबरोबर राक्षसाने दुसरा ठोसा लगावला. देवाने तो चुकविला आणि त्याची खूप स्तुती केली. आपण मोठे बलाढय़, उस्ताद आहात. त्याने तिसरा ठोसा दिला. तसे देव म्हणाला, आपण बदाम, खारीक, तूप खाता वाटतं. राक्षसाची स्तुती केली की तो आकाराने लहान लहान होत होता.
पहिल्या दोघांनी त्याला प्रतिकार केला तसा तो मोठा मोठा होत गेला होता. हा राक्षसाला मिळालेला शाप होता. राक्षसाने चौथा ठोसा लगावला, देव म्हणाले, तुमच्या एवढा शूर, वीर या जगात नाही. तुमच्यासारखे तुम्हीच. अशी स्तुती ऐकताच राक्षस चेंडू एवढा झाला. परत्म्याने त्याला रुमालात गुंडाळून ठेवले.
अंहकार, द्वेष नावाचा तो राक्षस आपल्या सगळय़ांच्यामध्ये आहे. आपण भांडत राहिलो तर विनाकारण शक्ती, युक्ती, पैसा, वेळ तो वाया घालवितो. पण मैत्री केली तर अहंकार फुगून टम्म होतो. फुटून जातो. द्वेष राक्षस कमी कमी होत जाऊन नाहीसा होतो. दांभिकपणा नष्ट होतो.
श्रोते हो, एक सुभाषित किती बोलके आहे पाहा. कुणावर टीका म्हणून नाही तर ती वस्तुस्थिती आहे.
ब्राह्मणी गणको वेशा
सारयेश्च कुक्कुट:।
तुष्टश्वन्येषु कुप्यन्ति
नटो मंत्री च याचक:।
ब्राह्मण, पोपटवाला ज्योतिषी, वेश्या, कुत्री, कोंबडे, नट, मंत्री आणि भिकारी हे आणि अशांच्या स्वभावाशी मिळतीजुळती, आठ जणं केव्हाही एकमेकांवर सतत जळतात. मराठीत म्हटले जाते. दोन कुत्री, दोन शास्त्री, दोन मिस्त्री, दोन बुवा, दोन जावा, दोन आवा (स्त्रिया), दोन चालक यांचे कधीच पटत नाही.
खरेच फार सुंदर कथा आहे,द्य्यंवाद