सध्या भात लावणीचा हंगाम चालू आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५८६० हेक्टर क्षेत्रात भात पेरणी करण्यात आली होती. त्यामुळे सुमारे ६२०० हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली येणार आहे.
मसुरे- सध्या भात लावणीचा हंगाम चालू आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५८६० हेक्टर क्षेत्रात भात पेरणी करण्यात आली होती. त्यामुळे सुमारे ६२०० हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली येणार आहे.
अद्यापपर्यंत सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाली असून उर्वरित लावणीची कामे लवकरच संपणार आहेत. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेने या वर्षी वरुण राजाने कृपादृष्टी अद्याप तरी चांगली ठेवल्याचे दिसून येत आहे. दर्जेदार भातपिकासाठी लावणीची कोणतीही एक पद्धत उत्कृष्ट असल्याचा दावा कोणीही करू शकत नाही त्यामुळे प्रयोगशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी आणि बजुर्गाच्या एकत्रित अनुभवावरून लागवड पद्धत वापरण्याचा निर्णय घेणे फायद्याचे ठरणार आहे.
कोकणातील जास्तीत जास्त क्षेत्रावर लावणीद्वारे भातपिकाची लागवड केली जाते. भात रोपांची काढणी झाल्यानंतर पुनर्लागवड हा महत्त्वाच टप्पा असतो. नांगरणी नंतर चिखलणी करून या क्षेत्रात लावणी केली जाते. पारंपरिक लावणीबरोबरच जिल्ह्यात आता चारसूत्री भात लागवड, श्री पद्धत, तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने रायसिंग टाईप पेडी ट्रान्सप्लांटर या भात लागवडीच्या मशीनचा वापर लावणीसाठी करण्याचे प्रात्यक्षिक सुद्धा शेतक-यांना गतवर्षी दाखविण्यात आले होते.
चारसूत्री भात लागवड
चारसूत्री भात लावणी करताना चिखलणीच्या वेळी एकरी ५०० ते ६०० किलो गिरीपुष्पाचा पाला चिखलात गाडावा. भात रोपांची १५ – १५ सें. मी. अंतरावर लावणी करावी. यासाठी १५, २५, सेंमी अंतरावर खुणा केलेली नायलॉन दोरी वापरावी. लावणीनंतर युरिया आणि डीएपी या मिश्रणातून तयार केलेल्या ब्रिकेट्स एकरी ६५ किलो या प्रमाणात वापराव्यात असे कृषी तज्ज्ञ सांगतात.
भाताची श्री लागवड पद्धत
श्री पद्धतीचे यश ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ते म्हणजे रोपांचे वय १२ ते १५ दिवसांचे असणे महत्त्वाचे आहे. पारंपरिक लावणी करताना कोवळ्या वयाच्या रोपांची लावणीसाठी वापरण्याची सवय नसल्याने बहुतांश शेतकरी हीच गोष्ट चुकवतात. १२ ते १५ दिवस वयाच्या रोपांना २० ते २५ फूटवे येतात आणि म्हणूनच प्रचंड उत्पादन पदरात पडते.
भात रोपांची दोरीच्या सहाय्याने २०-२० सेंमी. किंवा २५-२५ सेंमी. अंतरावर एका ठिकाणी एकच रोप अशा पद्धतीने लावणी करावी. लावणी पूर्वी चांगला चिखल करून साचलेले पाणी काढून टाकावे लागते. आणि नंतरही नियंत्रित पाणी द्यावे. कमी पाण्यावर भरघोस पीक हे श्री पद्धतीचे तत्त्व आहे.
यांत्रिक पद्धतीची लावणी
कोकणात ही पद्धत आज प्रचलित नसली तरी भविष्यात मजूरबळ कमी होऊ लागल्याने अशा पद्धतीची लावणी सुद्धा पाहावयास मिळणार आहे. यासाठी मॅट नर्सरी तयार करावी लागते व मोड आलेले बियाणे प्रत्यक्ष बेडवर पसरावे लागते. पॉलिथीन शिटवर मातीचे चौकोनी आकाराचे केक तयार झाल्यानंतर यावर मोड आलेले बियाणे अलगद पसरले जाते. सुरुवातीस बेडवर झारीने पाणी घालणे आवश्यक असते.
यांत्रिक लावणीसाठी १२ ते १५ सेंमी. उंचीची रोपे लागतात. भात लावणी करण्यासाठी एका वेळी आठ ओळींची लावणी करणारे यंत्र जास्त फायदेशीर ठरते असे कृषितज्ज्ञ सांगतात. एका लावणी यंत्राद्वारे ३-४ माणसांच्या सहाय्याने एका दिवसात अडीज ते तीन एकर लावणी सहज करता येऊ शकते.
मजुरांची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, बाजारपेठेची मागणी आणि उत्पादन खर्च या सर्व गोष्टींचा विचार करून शेतक-यानी भात लागवडीच्या सुधारित पद्धतीचा अवलंब केल्यास भात शेतीमध्ये शाश्वती येऊ शकते. शेतीमध्ये बदलत्या काळानुसार नवनवीन बदल होत आहेत.
एकत्र कुटुंब पद्धती बदलून विभक्त कुटुंब पद्धती उदयास आल्याने शेती करण्याकडे कल कमी होऊ लागला आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शेतीच्या कामांची विभागणी होत असल्याने सर्व कामे चांगल्या प्रकारे होत असत. नेमकी याच्या उलट परिस्थिती सध्या दिसून येत आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी असल्यास अशा आधुनिक पद्धतीचा अवलंब करता येणं शक्य आहे.
यासाठी गावागावात कृषी विभागाचे कर्मचारी आपल्या मार्गदर्शनासाठी असतातच. शेतकरी मित्रांनो आता यापुढील काळात लावणीसाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता यावरच उत्पादन अवलंबून असणार आहे. नाही तर आहेच आपली नेहमीची पद्धत! नांगरणी, चिखलणी व शेवटी लावणी.
Ya yantrachi price Kay aahe
किंमत किती आहे आणि कुठे मिळेल…?